My Blog List

Friday 11 September 2020

पक्षीमित्र

 सालीम अली



"मत्यूनंतर तुम्हाला विस्मृत व्हायचं नसेल तर वाचण्यासारखं काही लिहा किंवा तुमच्यावर काही लिहावं असं करून दाखवा." बेंजामिन फ्रॅंकलिनने सांगीतलेल्या या दोन्ही गोष्टी ज्यांनी सत्यात उतरवल्या अशी अनेक श्रेष्ठ माणसं आपल्या भारत देशात होऊन गेली. सालीम अली त्यापैकीच एक.. नव्हे त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातील ते एकमेवाद्वितीय!

ज्या अभ्यासाला समाजात स्थान नाही, प्रतिष्ठा नाही, लौकिकदृष्ट्या जो मार्ग चाकोरीबाहेरचा आहे अशा पक्षीनिरीक्षणशास्त्राचा त्यांनी साठ वर्षे ध्यास घेतला. संशोधन केले. निरीक्षणे नोंदवली. त्यावर शेकडो लेख आणि कित्येक पुस्तके लिहली. त्यांनी भारतात एका नव्या अभ्यास शाखेची मुहूर्तमेढ रोवली. म्हणूनच त्यांना 'बर्डमॅन ऑफ इंडिया' म्हणून संबोधले जाते. 

सालीम अलींना बालपणापासूनच विविध पक्षांच्या निरीक्षणाचा आणि शिकारीचा छंद होता. त्यांना भेट मिळालेल्या बंदुकीने पक्षी टिपण्यात ते पटाईत होते. पक्ष्यांची शिकार करता करता पक्षांच्या जीवनशैलीचा, अभ्यासाचा ध्यास त्यांनी घेतला. १९४३ मध्ये 'द बुक ऑफ इंडियन बर्डस' हे पुस्तक त्यांनी लिहिलं. या पुस्तकासह त्यांनी लिहलेली इतर अनेक पुस्तके पक्षीप्रेमी-पक्षीअभ्यासक यांच्यासाठी लाखमोलाची ठेव आहे. पक्ष्यांवर प्रेम करताना कृषिप्रधान देशात शेती आणि मानवी जीवनात पक्ष्यांचे अर्थशास्त्रीय आणि महत्वपूर्ण स्थान त्यांनी ओळखले. शेतकऱ्यांचे खरे शत्रू कीटक आहेत पक्षी नव्हेत असं स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण मत त्यांनी मांडले. निसर्गातील सजीव साखळीतील पक्षी हा मुख्य घटक आहे, जंगल आणि शेती वाचवायची असेल तर पक्षी जगले पाहिजेत असं ते स्पष्टपणे सांगत असत.

सालीम अलींचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ आणि मृत्यु  २० जून १९८६ रोजी झाला. ९१ वर्ष निरोगी आयुष्य लाभलेल्या सालीम अलींच्या पत्नी मात्र १९३९ साली तारुण्यातच निर्वातल्या… सालीम अलींचे घरटे जणू उन्मळून पडले. सावलीसारखी नेहमी पाठीशी असणारी पत्नी गेली, मुलबाळ नाही त्यामुळे त्यांचं जगणं नीरस बनले. काही दिवस नैराश्यानेही त्यांना घेरले. मात्र अल्पावधीतच त्यांनी या नैराश्यावर मात करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली. या दुःखद घटनेनंतर जवळपास चार दशके त्यांनी पक्षीनिरीक्षण, संशोधन, जंगल भ्रमंती आणि पुस्तके या गोष्टींनाच आपला संसार मानला. 

शालेय जीवनात साधारण विद्यार्थी, गणिताची परिस्थिती चिंताजनक, वडीलढाऱ्यांच्या सल्ल्यानुसार दादर कॉलेजमध्ये कमर्शिल लॉ आणि अकौंटन्सी शिकणारा विद्यार्थी पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला कसा आला आणि जगभरात ख्याती कसा पावला हे समजून घ्यायचे असेल तर सालीम अलींची साठ वर्षाची तपश्चर्या आपल्याला अभ्यासावी लागेल. सालीम अलींना सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये प्राणिशास्त्र, पक्षीशास्त्रात पदवी घ्यायची होती परंतु या शाखेतील काही विषय त्यांना अवघड वाटले त्यामुळे या कॉलेजचे नियमित विद्यार्थी ते होऊ शकले नाहीत. नंतर इथेच त्यांना औपचारिक शिक्षण घेण्याची अनुमती मिळाली. (म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचा विद्यार्थी म्हणून नव्हे तर एक जिज्ञासू विद्यार्थी म्हणून) पक्षीविज्ञानशास्त्रातील भीष्म पितामह होण्यासाठी त्यांना कोणत्याही डिग्रीची आणि त्या शाखेतील नियमित विद्यार्थी होण्याची आवश्यकता भासली नाही. त्याकाळची पक्षीनिरीक्षण आणि अभ्यास करण्याची पद्धत मोडून काढून त्यांनी स्वतः नवीन पद्धती अवलंबल्या. इंग्रजांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केला. अनेक दिग्गज्यांच्या चुकीच्या निष्कर्षांना संशोधन आणि पुराव्यानिशी खोडून काढले. आणि हे घडले कारण त्यांनी यासंदर्भात स्वतःचं सर्वस्व झोकून काम केले. कामालाच ईश्वर आणि अल्ला मानले. पद्मभूषण, पद्मविभूषण आणि इतर शेकडो पुरस्कार त्यांना मिळाले. सरकार दरबारी मोठा दबदबा वाढला. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली, आवृत्यावर आवृत्त्या छापल्या गेल्या... परंतु सालीम अलींचे पाय मात्र जमिनीवरच राहिले. ते नेहमी साधेपणाने.. कोणत्याही डामडौलाविना अगदी सामान्य व्यक्तिप्रमाणे वावरले. आज अशी ऋषितुल्य माणसं खूप अपवादात्मक हयात असतील. एखाद्या ध्येयासाठी जीवन समर्पित करणारेही विरळच!

 पक्षांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या डॉ.सालिम अली यांची जयंती 'पक्षी दिन' म्हणून साजरी केली जाते. या

निसर्गाच्या हानीसोबतच अनेक पक्षी जातींचे नामशेष होणे ही आज चिंतेची बाब बनली आहे. अशा वेळी आपल्याला सालीम अलींची उणीव निश्चितच जाणवते.

Sandip R Chavan


संदर्भ: 

सालिम अली- वीणा गवाणकर (मराठी पुस्तक)

विकिपीडिया

गुगलवरती सालीम अली यांच्यासंदर्भात उपलब्ध असणारे वेगवेगळे लेख.