My Blog List

Thursday 15 February 2018

मार्केटिंगचे अजब तंत्र.. अन भरकटलेला समाज...


मार्केटिंगचे_अजब_तंत्र.. अन_भरकटलेला_समाज...


एक मल्याळी चित्रपट येऊ घातला आहे. नाव.. 'ओरू अदार लव. चित्रपटातील अठरा वर्षीय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारीयर हिने सद्या प्रसिद्धीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तिचा या चित्रपटातील २८ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मूळची केरळ राज्यातील त्रिसूरमधील असणारी प्रिया प्रकाश चोवीस तासात सहा लाख फालोअर मिळवीत देशभर प्रसिद्धीच्या झोतात आली.
'व्यालेंटाइन डे' ची संधी साधून या चित्रपटातील काही सीन्स, व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल केले गेले. आणि सोशलमीडियावर चोवीस तास ऑनलाईन असणार्यांनी हे व्हिडिओ शेअर करण्याचा धडाका लावला. सध्या कुठेही निवडणुका नसल्यामुळे, दंगल नसल्यामुळे, रोजगाराची गंभीर समस्या असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर तरुण लोखंसंख्येच्या हाताला काम नाही. त्यामुळे हे व्हिडिओ हातोहात शेअर होऊन बहुतेक मोबाईलच्या इनबिल्ट मेमरीत जाऊन पोचले. व्हिडीओ पाहिल्यावर हा चित्रपट 'शाळा- कॉलेजमधील भिन्नलिंगी आकर्षण' हा विषय केंद्रबिंदू ठेऊन बनवला आहे हे अगदी शेंबड पोरगं सांगेल. फक्त यात एक फरक दिसतो तो म्हणजे मुलीने यात आघाडी घेतली आहे.
मार्केटिंग मध्ये सोशलमीडियाला आलेले अनन्यसाधारण महत्व धंदेवाईक प्रवृत्तीने बरोबर ओळखून चित्रपटाची जाहिरात केली. व्यवसायच्या दृष्टीने चित्रपट निर्मिती यंत्रणा त्यांच्या जागेवर ठीक आहे.  *एका मल्याळी चित्रपटात शाळेत शिकत असणारी मुलगी तिच्याच वर्गातील मुलाला डोळा मारते... आणि मुलगा खल्लास!* असा हा व्हिडीओ पाहून अनेकजण असे काही चेकाळून जातात की त्या मुलीने यांनाच डोळा मारला की काय? हा प्रश्न पडतो.
चित्रपट हिट होईल, तो अनेक भाषेत प्रदर्शित होईल, ती मुलगी उद्या कदाचित मोठी अभिनेत्रीही होईल इतपर्यंत सर्व ठीक आहे.
पण याचा समाजमनावर किती पगडा पडावा? माध्यमातून किती चर्चा व्हावी? 'तरुण तुर्क अन म्हातारे अर्क' किती चेकाळावेत? यातून नव्या पिढीने काय घ्यावे? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.
या एका व्हिडीओमुळे, दक्ष समजल्या जाणाऱ्या सोशलमीडियातुन सगळे गंबीर प्रश्न, मुद्दे कसे बाजूला पडतात हे या निमित्ताने दिसून आले.
सोशलमीडिया व्यक्त होण्याचे माध्यम आहे. सोशलमीडियावरून क्रांती वैगेरे काही होणार नाही व तिथे समाजहिताच्या गोष्टींनाही जास्त महत्व नाही. वाद-विवाद निर्माण करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, जाती धर्मात तेढ वाढवण्यासाठी, राजकीय प्रचार प्रसारासाठी सोशलमीडियाचा भरपूर उपयोग होत आहे. सामान्य जनता गुड मॉर्निंग आणि गुड नाइटच्या पलीकडे पोचलेली नाही. फॉरवोर्ड खेळ खेळनारे फॉरवोर्ड केल्या जाणाऱ्या बातमीची, घटनेची सत्यता तपासून बघण्याचे कष्टही घेत नाहीत. त्यातूनच मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या देशासाठी फाशी गेलेल्या थोर क्रांतिकारकांच्या बलिदानाचा दिवस बदलला जातो. आणि व्यालेंटाइनला विरोध करण्यासाठी त्याचा आधार घेतला जातो. व्यालेंटाइन साजरा करावा का नाही हा वेगळा विषय आहे. मुळात प्रिय व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज असतेच असं नाही. पण बाजारपेठेला विविध 'डे' ची गरज असते. व ती गरज भागविण्यासाठी असे 'डे' प्रसिद्धीच्या झोतात आणले जातात.
अनलिमिटे इंटनेट पॅक मुळे सोशलमीडिया वापरताना वेगळा खर्च होत नाही असा एक सार्वत्रिक (गैर)समज आहे. परंतु ज्या वेळी आपण एखादी गोष्ट विनामोबदला वापरत असतो, सतत वापरत असतो त्या वेळी आपण त्यांच्यासाठी एक प्रॉडक्ट् असतो. त्यांच्यासाठी आपण वस्तू असतो.. ते(सोशलमीडियातुन स्वताचे हित साधणारे) आपल्याला त्यांच्या फायद्यासाठी वापरतात. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आपण आपल्या व समाजाच्या उन्नतीसाठी सोशलमीडियाचा प्रभावी वापर करुन देशहित पाहणे गरजेचे आहे.
व्यालेंटाइन व प्रिया प्रकाशाच्या व्हिडीओ मुळे विस्मृतीत गेलेल्या घटना पाहू...
काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्यांचा तीव्र हल्ला झाला असतानाच, १० फेब्रुवारीच्या पहाटे सुंजवानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना चाललेल्या सलग तीस तासांच्या ऑपरेशनमध्ये पाच दहशतवादी ठार झाले. आपलेही पाच जवान हुतात्मा झाले. हा हल्ला शनिवारी पहाटे झाला. पाठोपाठ सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी श्रीनगरच्या crpf तळावर दहशतवादी हल्ला झाला यात crpf जवानांनी दोन दहशतवादी ठार मारले तर आपला एक जवान हुतात्मा झाला. देशात पाकपुरस्कृत दहशतवाद कारवाया व सीमेवरील चकमकी वाढल्याने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जवान आपल्या प्रणाची बाजी लावत आहेत. देशात दहशतवादी संकट असताना, इकडे महाराष्ट्रात आस्मानी संकट आले. अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला रब्बी पिकाचा घास हिराऊन घेतला व त्यांच्या चिंतेत भर घातली. यावर चर्चा होऊन झालेले नुकसान टळणार नाही. आपण बंदूक घेऊन सीमेवर जाणार नाही. किंवा लगेचच शेतकऱ्यांची शेती तोट्यातून फायद्याची होणार नाही. परंतु या गोष्टींवर किमान चर्चा झाली तर आपल्यासाठी कोण कोण कष्ट उपसत आहे याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव उत्पन्न होईल.
सोशलमीडियाचा कमालीचा वापर करून बहुतेक सर्व स्थरातील लोकसंख्येला त्यात गुंतवून मुख्य समस्येपासून दूर घेऊन जाणे हे काही लोकांच्या फायद्याचे असते. त्यासाठी विविध यंत्रणा विविध स्थरावर काम करत असतात. अश्या यंत्रणा जाळे टाकून ठेवतात... माणसांची झालेली मेंढरे त्या जाळ्यात धावत जाऊन स्वतःला अडकवून घेतात, हे नित्याचे झाले आहे. समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे.
अखंड सावधान असावे... एवढेच आपल्या हाती आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
🙏🙏🙏🙏

Thursday 8 February 2018

शेतकरी आत्महत्या... देशाला लागलेला शाप!

शेतकरी आत्महत्या... देशाला लागलेला शाप!


देशातील प्रत्येक नागरीक प्रजासत्ताकाचा ६९ वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत होता. त्याच वेळी धर्मा पाटील या ८४ वर्षाच्या शेतकऱ्यावर सरकारी अनास्थेला कंटाळून राज्याच्या मंत्रालयात विष पिण्याची वेळ आली. त्यातच २८ जानेवारी २०१८ ला त्यांचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे सर्वत्र शेतकरी आत्महत्या मुद्दा चर्चिला गेला. भरपूर गदारोळ झाला. राजकीय धुरळा उडाला. सोशलमीडिया वर राग- चीड व्यक्त झाली. आणि आता ते तापलेले वातावरण,राग,गदारोळ  मात्र शांत,शांत झाला. असे का झाले? असे का होतेय?

  गजनी या हिंदी चित्रपटात नायकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला अगदी अलीकडे घडलेली घटना आठवत नाही. कोणतीही गोष्ट त्याच्या विस्मृतीत जाते. त्याला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असं म्हंटल जातं. आज समाजमनाचे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की हा आजार बहुतेक सर्व भारतवासीयांना जडला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक अप्रिय घटना घडत असतात. लोक जेवढ्यास तेवढे दुःख व्यक्त करतात. पुढे चालायला लागतात. कोणालाच कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना शोधण्याची गरज वाटत नाही.
                सर्वसामान्यांचा रोजच्या रोज पोटाची खळगी भरण्यासाठीची लढाई लढण्यातच वेळ जात असेल. ही त्याची मजबुरी ही असेल. पण शासन-प्रशासनाचं काय? ते हा वेळकाढूपणा का करतात? शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना व त्याबद्दल समाजात, शासन स्तरावर निर्ढावलेपणा आलेला आहे. कोणत्याही अप्रिय घटनेतून बोध न घेता पुढील घटनेला तेवढ्याच निर्ढावलेपणानं तोंड देण्यासाठी आम्ही कसे तयार आहोत. हे दाखवण्याची सद्या सर्वत्र स्पर्धा दिसून येते. यातून या सर्वांना झालेल्या 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' या आजाराची दाहकता समजते.
       शेतकरी वेगवेळ्या कारणांच्यामुळे आत्महत्या करत आहेत. अस्मानी संकटे येतात ती रोखली जाऊ शकत नाहीत. मात्र कृत्रिम संकटं निश्चित कमी केली जाऊ शकतात. वाढत्या आणि न थांबणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा जणू भारतदेशाला लागलेला शाप आहे.
याची सुरवात कशी झाली?कोणते घटक याला जबाबदार आहेत? काही उपाय केले तर या आत्महत्या कमी होऊ शकतात का? या बद्दल हा ऊहापोह.....
     'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' अशी म्हण किंवा विचारसरणी काही दशकापूर्वी जनमानसात रुजली होती. कारण त्या वेळी तशीच समाजरचना होती. देश स्वतंत्र झाल्यावर हळूहळू ही मानसिकता बदलू लागली पुढे हा बदल 'उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती' असा झाला. तर सद्या उत्तम नोकरी, उत्तम व्यवसाय, मध्यम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि शेती मात्र कनिष्ट, त्रासदायक ते अति त्रासदायक ठरली आहे. हा बदल सर्वसाधारण पणे चाळीस ते पन्नास वर्षात झालेला बदल आहे. याला जागतिक व देशपातळीवरील धोरणे व अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. सर्वदूर प्रगतीचे वारे वाहत असताना शेती व शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडत गेला.. त्याला शासनाने आधार दिला नाही.आणि समाजातील इतर घटकांनीही आधार दिला नाही.
       भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे शाळेत शिकवले गेले.. अजूनही शिकवले जाते. याच शाळेत शिकुन डॉक्टरची मुलं डॉक्टर होऊन पुढे तो व्यवसाय चालवतात. (सेवेचा व्यवसाय झाला आहे), इंजिनियरची मुलं इंजिनियर किंवा इतर क्षेत्रात चमकावी म्हणून इंजिनियर कष्ट घेतो, व्यावसायिकाची किंवा बिझनेसमनची मुलं पुढे जाऊन तो व्यवसाय करतात किंवा त्यांनी तो करावा अशी त्या व्यावसायिकांची इच्छा असते. सनदी सेवेत असणाऱ्या बहुतेकांची मुलं त्या क्षेत्राकडे वळतात किंवा त्यांचे पालक त्यासाठी मार्गदर्शन करतात.सर्वसामान्य नोकरदारही आपली मुलं शिकुन मोठी व्हावी. त्यांना चांगली नोकरी आणि सुंदर छोकरी मिळावी. ही इच्छा बाळगतात. राजकीय नेत्यांची मुलं वंशपरंपरेने त्यांच्या गादीवर बसतात किंवा बसवली जातात. हे सर्व समाजघटक आपापली मुलं आपापल्या व्यवसायात, उद्योगधंद्यात, राजकारणात, उच्च पदावर जावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यांनी तसा प्रयत्न करणे चूक आहे किंवा करू नये असे ही नाही. पण हे सर्व होत असताना कोणत्याही शेतकऱ्याला आपला मुलगा शेतकरी व्हावा किंवा आपल्या मुलीला शेतकरी नवरा जोडीदार म्हणून मिळावा असं वाटत नाही. असा प्रयत्न करताना तो दिसत नाही. हे असं का? जगाचा पोशिंदा म्हणून सगळ्यांनी डोक्यावर घेतले असताना, जय किसान म्हणून जयजयकार केला जात असताना, शेतकऱ्याला किंवा कोणाही व्यावसायीक, उच्चपदस्थांना, राजकीय नेत्यांना आपली पुढची पिढी शेतकरी व्हावी असं का वाटत नसावं? मग जगाचा पोशिंदा म्हणणे. जयजयकार करणं हे खोटं आहे का? 
     शेतीत कष्टाच चीज होत नाही. वाढलेल्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक उत्पन्नाची शाश्वती नाही. हे देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्याने सिद्ध केले आहे. देशात शेतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असणारी संख्या मोठी आहे. जवळपास एकूण लोकसंख्येच्या ५० ते ६०% म्हणजे जवळपास ६०ते ७०कोटी लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत.
शहरात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असतात त्यामुळे शहरी लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून नसते. असली तरी ते प्रमाण नगण्य असते. त्यामुळे लोकसंख्येचे स्थलांतर ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणावर होत आहे यातून नव नवे प्रश्न निर्माण होत आहेत. 
     सद्या ग्रामीण भागात राहणारी बहुतांशी लोखसंख्या प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामा शिवाय रोजगाराचे इतर पर्याय नाहीत.असले तर ते खूप कमी आहेत. ग्रामीण भागात पर्याय नाहीत म्हणून शेती केली जाते... शेतीला पूरक जोडधंदेही केले जातात. तर शहरी भागातील लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती (खरेदी) करतात. टॅक्स वाचवण्यासाठीही शेती करणारे व शेतकरी होणारे शेतीप्रेमी शेतकरी आपल्या याच देशात आहेत.
      ग्रामीण भागात राहणाऱ्या व पूर्णपणे शेतीवर उपजीविका असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांचे खूप मोठे प्रश्न व समस्या आहेत. त्या समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. असे असताना अलीकडच्या दिवसात काही घटना घडल्या त्याचा थोडा आढावा घेऊ.
     १)नुकताच 'वर्ल्ड इकॉनॉमी फोरम' (WEF) या जागतिक परिषदेत 'ऑक्सफॅम' या संस्थेने एक चिंताजनक अहवाल प्रस्तुत केला. या अहवालात नमूद केल्यानुसार, भारतातल्या १ टक्का श्रीमंताकडे ७३ टक्के संपत्ती एकवटली आहे. भारतातल्या त्या १ टक्का श्रीमंतांची संपत्ती ही २०.९ लाख कोटींनी वाढली. ही रक्कम भारताच्या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाइतकी मानली जाते. 
2)गेल्या दोन दशकामध्ये संसदेतील लोकप्रतिनिधींचे वेतन १२५० टक्के वाढले.अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाली.
तर ५६/५७ वर्षात महाराष्ट्रातील आमदारांचे वेतन दीड रुपया ते दीड लाख रुपये वाढले. हेही प्रिंट मीडियात छापून आलं आहे.
३)सरकारी व खाजगी बँकांचे Non-performing asset (NPA) थकीत कर्ज आठ लाख कोटीच्या जवळ जाऊन पोचले आहे. यात सरकारी बँकांचा वाटा सहा लाख कोटींचा आहे. यापैकी तीन लाख कोटी हे बुडीत कर्ज आहे.
भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जाचा आकडा हा तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या माजी डेप्युटी गव्हर्नरनी केला आहे. 
४)'पद्मावत’ चित्रपटातचे तिकीट २४०० रूपयांवर गेले.
५)श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर असा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला.
६)देशातील एकूण शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे. असाही अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
    वर नमूद केलेले सहा मुद्दे पाहिले तर वेगवेगळे व वेगवेळ्या क्षेत्राशी निगडती आहेत. पण त्यांचा शेती व शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांशी अप्रत्यक्ष संबध आहे. कसा ते पाहू...
      संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत आहेत. ज्यांनी गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढणाऱ्या दरीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ते सर्व राज्याचे व केंद्राचे धोरणकर्ते, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी स्वतःचं हित साधताना पक्षभेद विसरून एक होताना दिसून येतात. पण सामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी एकत्र येत नाहीत. लोकप्रतिनिधीच्या मध्ये काही सन्माननीय अपवाद आहेत. पण त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. लोकप्रतिनिधी पूर्ण ताकतीने किंवा निस्वार्थीपने सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत.अनेक संकटात शेतकरी असताना लोकप्रतिनिधी आपले पगार, भत्ते, सोई-सुविधा या बाबतीत कमालीचे दक्ष असतात. 
      मोठे उद्योगपती हजारो कोटींचे कर्ज काढतात, थकवतात, बुडवतात, शिवाय आलिशान आयुष्य जगतात, अगदीच वेळप्रसंगी देश सोडून पळून जातात. त्यांना कोणतेही राज्यकर्ते शासन करत नाही. बँका त्यांची कर्जे पुन्हा पुन्हा रिन्यू करतात. व्याजात सूट देतात. त्यांना  सेलिब्रेटीची वागणूक देतात. त्याच्या उलट  सामान्य शेतकऱ्यांना बँका दारात ही  उभ्या करत नाहीत. सन्मानजनक वागणूक देत नाहीत. थोड्या थकबाकीसाठी जप्तीच्या नोटिसा पाठवतात. अब्रूच्या भीतीने मग शेतकरी आत्महत्या करतो. तरीही त्याचे कर्ज माफ होत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला ते फेडावे लागते. अशा वेळी प्रशासन ती आत्महत्या शेतकरी आत्महत्या आहे का नाही हे ठरवत बसते.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातलगांना कागदपत्रांची पूर्तता करत बसावे लागते.
      महाराष्ट्रात अगदी अलीकडे गाजलेली आत्म(हत्या) म्हणजे धर्मा पाटील यांची आत्म(हत्या) होय. शेतीच्या योग्य मोबदल्यासाठी ८४ वर्षाचा शेतकरी बलिदान देतो... त्यावेळी पद्मावत चित्रपट पाहण्यासाठी याच देशाच्या मातीतील काही घटक आनंदाने २४००रु मोजतात... त्यांना शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचं किंवा कोणत्याही शेतकरी आत्महत्येबद्दल काही देणंघेणं नसतं. खा-प्या-मजा करा ही संस्कृती वाढत आहे. तर सामाजिक संवेदना नष्ट होऊ लागल्या आहेत. याचा परिणाम साहजिकच उपेक्षित घटकावर होतो. शेतकऱ्यांची नवी पिढी शिकली आहे. व्हाट्सअँप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशी सोशल माध्यमे वापरत आहे. त्यांना ही सामाजिक परिस्थिती दिसते. आमची कदर तुम्ही करणार नसाल तर तुमची कदर आम्ही का करू? हा रोकडा सवाल घेऊन ती उभी राहिली तर इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष टोकाचा होऊ शकतो. आणि ही गोष्ट सगळ्यांना त्रासदायक ठरू शकते. त्याची झलक नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाच्या वेळी दिसून आली होती.
     हे सगळं घडत असताना जगातील सर्वात श्रीमंत देशात आपल्या देशाचा सहावा नंबर लागतो. असाही एक सर्व्हे रिपोर्ट आला. तसा पूर्वीपासूनच आपला देश श्रीमंत होता. *सोने की चिडीया* असं इंग्रज आपल्या देशाला संबोधत होते. भारतीय लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघायचा असंही बोललं जायचं. म्हणजे संपन्नता आताही आहे पूर्वीही होती. शेतकरी, कष्टकरी तेव्हा सामान्य जीवन जगत होता अन आता मात्र हालाखीचीचं जीवन जगतो आहे. मग या सर्व्हेमधील श्रीमंती कोणाची?? हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांच्याकडे संपत्ती आली म्हणजे देश श्रीमंत झाला का? याचा विचार होणे आवश्यक आहे. तो होणार नसेल तर आपण स्वतःलाच फसवतोय असं होईल.
      पूर्वी काही प्रमाणात का होईना शेतकरी समाधानी होता. त्याच्याजवळ खूप पैसा नसला तरी गरजा कमी असल्यामुळे त्या भागत होत्या. पाऊसपाणी वेळेवर झाला की सुगी चांगली व्हायची...शेतकरी आनंदी व्हायचा.... गाईगुरांना भरपूर चारा उपलब्ध व्हायचा. शेतकरी आपल्या घरी आलेल्या धान्यांतील काही भाग इतरांना भरभरून द्यायचा. सुगी संपली की खेडोपाडी यात्रा भरायच्या. पाव्हणे-रावळे भेटायचे. सगळं कसं ठीक चाललेलं असायचं. ही परिस्थिती कायमच असायची असं नाही.. दुष्काळही पडायचा, कधी अतिवृष्टी व्हायची, पीकं पाण्यावाचून अथवा पाण्यामुळे हातची जायची. पण शेतकरी कधी नाउमेद झाला नव्हता. त्यानं स्वतःला संपवल नव्हतं. घरच्यांच्या पाठींब्यावर तो बिकट परिस्थितीचा नेटाने सामना करीत उभा राहत होता. आर्थिक संकटे यायची पण त्यातून तो उभारी घेत होता. 
    परंतु ही परिस्थिती पुढे पालटत गेली. शेतीचं तुकडे झाले एका हिश्श्याचे दोन, चार, सहा तुकडे झाले. आज ७०% शेतकरी अल्पभूधारक आहेत.बरेच शेतमजूर भूमिहीन आहेत.एक टक्के शेतकऱ्याकडे दहा हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे. त्यातही कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. तुकडीकरणामुळे शेतीचा मशागत खर्च वाढत आहे. उत्पन्न हवं तसं निघत नाही. यांत्रिक शेती करण्यात अडचण येते. त्यातच खाणारी तोंडे वाढली. महागाई वाढली. शिक्षणाची गंगा खेडोपाडी आली. मुलं मुली शिकू लागल्या. शेतात राबणारे हात कमी झाले. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढल्या. काही प्रमाणात उत्पन्न वाढले पण खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचबरोबर निसर्गाचा प्रकोपही वाढू लागला. वेळी,अवेळी अवकाळी पाऊस पडतोय. तर कधी दुष्काळ. चांगला पाऊस झाला अन पिकं चांगली आली तर पिकाला भाव नसतो. मातीमोल भावाने पीकं विकावी लागतात. रक्ताचं पाणी आणि पिकाचा लाल चिखल हे सद्याच्या शेतकर्याच्या पाचवीला पूजलेलं आहे. सर्व औदयोगिक उत्पादक स्वतःच्या मालाचा दर स्वतः ठरवतात पण हे भाग्य शेतकर्याच्या नशिबात नाही. पिकलेल्या पालेभाज्या नाशवंत असतात. तर धान्य साठवणुकीसाठी जागा नसते. असली तरी पैशाची निकड असते. त्यामुळे येईल त्या भावात हाती आलेलं पीक विकावं लागते. निसर्ग झोडपतो. दलाल लूट करतात. ग्राहक फुकट मिळतंय का ते बघतो. राज्यकर्ते ग्राहकांचं हित जपतात. आणि उत्पादक शेतकरी मात्र देशोधडीला लागतो. अशी परिस्थिती सद्या आहे.
       शेतीत घातलेला पैसा मिळेल का नाही, कष्टाचं चीज होईल का नाही, याची शाश्वती नाही. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागेनासा झाला की तो मेळ बसवायला कर्ज काढतो. ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज. मग व्याज देण्यासाठी तिसरं कर्ज. कर्ज... आणि कर्ज..!! बँका कर्ज देत नसतील तर सावकाराकडून कर्ज घेतो. सावकारी कर्जाचे व्याज हे खूप जास्त असते. या कर्जासाठी घरातील लक्ष्मीच्या अंगावरील किडुक मिडुक डाग गहाण ठेवतो. कधी कधी शेतही गहाण ठेवतो.अशा चक्रव्युहात शेतकरी अडकला,की त्याला हे चक्रव्युह सहजासहजी भेदता येत नाही. पैशाचे सर्व मार्ग बंद झाले की खाणारी तोंडे बोलू लागतात. मुलं ऐकत नाहीत. प्रत्युत्तर करतात. बायको अबोला धरते. चार लोकात किंमत राहत नाही. समाजात प्रतिष्ठा मिळत नाही,प्रतिष्ठा संपते. असं दुःख शेतकरयांच्या वाट्याला येतं. यातून हा शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो. मग कधी तो व्यसनाचा आधार घेतो. आणि बुडत्याचा पाय अधिक खोलात जातो. 
    तर कधी याच्या उलट परिस्थिती असते. घरातील लोकांना पूर्ण परिस्थितीची जाणीव असते. ते सर्व निमूटपणे सहन करत असतात. आपल्या बापाचे, आपल्या नवऱ्याचे मन दुखावणार नाही अशीही काळजी बायको मुलं घेत असतात, कष्टाची कामे करून सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न घरातील प्रत्येकजण करत असतो, मुलं अकाली प्रौढ होतात, मनातील अनेक इच्छा मारायला शिकतात, घरधणीन फाटक्या साडीला ठिगळे लावून तीच साडी नेसते. पण आबाळच फाटलं तिथं हे उपाय तोकडे पडतात..कुटुंबाला सतत चिंता सतावते... अश्या एकूण परिस्थितीत आपण घर चालवायला लायक नाही हा विचार शेतकर्याच्या मनात घर करतो. घरातील बायका मुलांच्या गरजा भागवता येत नसल्यामुळे कर्ता शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो. मुलांचं शिक्षण, मुलींची लग्ने, घरातील एखाद्याच मोठं आजारपण यात तो पूर्ण कोसळून पडतो. आता यातून मार्ग नाही, अस मनाशी पक्क होत जातं. कर्ज कसं फिटायचं?मुलांचं शिक्षण कस व्हायचं? मुलीचं लग्न करायला अन आई- वडिलांच्या आजारपणावर उपचार करायला पैसा कुठून आणायचा? बायकोला तर लग्नापासून साधा फुटका मनी घेतला नाही. होता तोही गहाण ठेवला.याचं दुःख शेतकऱ्याला होत असत.आपल्या जीवनाला अर्थ नाही.आपल्याला जगण्याचा हक्क नाही. असा विचार कर्जाच्या चक्रव्हूवात सापडलेला शेतकरी करत असतो. आणि त्याला या सर्वातून शेवटी एकच मार्ग दिसून येतो. तो म्हणजे आत्महत्या आणि आत्महत्या!
      शेतकरी आत्महत्या हा कृषिप्रधान(?) भारत देशाला लागलेला शाप आहे. आपल्या महाराष्ट्राचा यात पहिला नंबर आहे. शेतकरी आत्महत्या हा खूप गंभीर व सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. साहेबराव शेषराव करपे. राहणार चिलगव्हाण, जिल्हा यवतमाळ. यांनी संपूर्ण कुटुंबासह १९ मार्च १९८६ या दिवशी आत्महत्या केली. ही अधिकृत पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या मानली जाते. अधिकृत यासाठी की आधीही शेकडो शेतकरी आत्महत्या झाल्या असतील पण त्याची सरकारदरबारी नोंद नसल्यामुळे त्या अधिकृत मानल्या जात नाहीत. गेल्या एकतीस बत्तीस वर्षात सरकारदरबारी नोंद झालेल्या आत्महत्यांची देशभरातील आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. २००७ पर्यंत दोन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या अस एका संशोधन प्रबंधात वाचण्यात आले. तर २०१७ पर्यंत हा आकडा ३ लाखावर पोचला आहे.
सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार २०१३ पासून प्रतिवर्षी १२ हजारापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत.म्हणजे दिवसाला सरासरी ३०ते४० शेतकरी मृत्यूला जवळ करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, समाजाला अपयश आलं आहे. 
      आता वेळ आली आहे आत्महत्या विरुद्धची लढाई शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने लढण्याची, लढवण्याची. गावकी- भावकीच्या वादात अन टुकार राजकारणाच्या फंदात न पडता शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शड्डू ठोकून मैदानात उतरायला हवे. जमेल तेवढे शिक्षण, मिळेल ते काम,नवनवीन उद्योगधंदा याकडे वळून काबाडकष्ट करून आपल्या शेतकरी बापाला वाचवण्याची जबाबदारी आता आपण घ्यायला हवी. शासन काही करेल की नाही, समाज काय भूमिका घेईल. हे पाहण्यात आता वेळ दवडून चालणार नाही.शेतकरी आत्महत्येचा वणवा आपल्या घरापर्यंत यायच्या आधी शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याची भूमिका महत्त्वाची आहे. खोटी प्रतिष्ठा, लग्नामधील अनाठायी खर्च,जावळ-जत्रा, इतर करतात म्हणून वाढदिवसाचा दिखावा, कर्ज काढून सोसायट्यांची ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणे, गरज नसताना चारचाकी घेणे, उगाचच बुलेटचा थाट करणे, शेतातील कामात कामचुकारपणा करून गावातल्या चौकात किंवा पारावर बसून वेळ घालवणे, गल्ली पुढार्यांच्या नादाला लागून पूर्ण दिवस वाया घालवणे, अश्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हौसेला मोल नसते हे जरी खरं असले तरी हौस करणारा कर्जाच्या विळख्यात सापडू नये.म्हणून हे उपाय केले पाहिजेत. थोडक्यात रिन काढून सण करण्याची पद्धत कुठं तरी थांबली पाहिजे. अनावश्यक खर्च टाळलेे पाहिजेत. सर्वांनी 'एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' यामार्गाने जाणे हिताचे आहे. तरुण शेतकर्यांनी अडचणीत खचून न जाता आपलं दुःख कुणाजवळतरी बोललं पाहिजे. प्रत्येक समस्येवर उपाय असतात. प्रश्न असले की उत्तरही असते. आत्महत्या करून प्रश्न संपणार नाहीत. ते अधिक वाढतील. आपल्या आईवडिलांना, बायको- मुलांना, मित्रांना आपली गरज आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करणार नाही. असा ठाम निश्चय सर्व शेतकरी बंधूनी करावा ही हातजोडून त्यांना एका शेतकऱ्याच्या पोराची विनंती आहे.
    बहिणाबाई चौधरी आपल्या पेरणी या कवितेत म्हणतात...
पेरणी पेरणी,अवघ्या जगाच्या कारनी।
ढोराची चारनी,कोटी पोटाची भरणी।

शेतकरी स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी शेती करतो, ढोर मेहनत करून पिकं पिकवतो. साऱ्या जगातील लोकांच्या पोटाची तो काळजी घेतो. लोकांसाठी, गुराढोराच्यासाठी तो शेतात राबतो. म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात.
'लाख मेले तर चालतील.पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे' अशी मराठीत म्हण आहे. आज लाखोंचा पोशिंदा किड्यामुग्याप्रमाणे रोज मरतोय. भारतदेशाच्या कपाळी लागलेला शेतकरी आत्महत्येचा शाप पुसुन टाकण्यासाठी, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी समाजातील सर्वस्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. या कामी शक्य ते सर्व उपाय समाजातील सर्वस्तरातून व्हायला हवेत.
....संदिप रामचंद्र चव्हाण.











मुद्दा क्र 1 ते 6 चे संदर्भ..
1)संपत्तीचे केंद्रीकरण https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/why-is-indias-wealth-inequality-growing-so-rapidly/articleshow/62679685.cms
2)खासदारांचे वेतन (https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/varun-gandhi/articleshow/62763017.cms)
आमदारांचे वेतन 
(http://prahaar.in/mla-salary-increased-now-give-result/)
3)NPA
http://www.lokmat.com/business/banks-bad-debts-amount-rs-20-lakh-crore/

https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/public-sector-banks-npa-hits-rs-7-34-lakh-crore-at-september-end/articleshow/62231730.cms
4)पद्मावत चित्रपट तिकीट दर
http://www.tarunbharat.com/news/552597
5)श्रीमंत देशात भारत सहावा
http://zeenews.india.com/marathi/india/india-ranks-6th-in-wealthiest-country-in-the-world/410055
6) शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
https://www.krushiking.com/newsdetail.php?goytrarenyarjf&100102584

Thursday 1 February 2018

अक्षरनिष्ठांची मांदियाळी ग्रंथशोध आणि वाचन-बोध

अक्षरनिष्ठांची_मांदियाळी
ग्रंथशोध आणि वाचन-बोध

लेखक:- डॉ. अरुण टिकेकर
प्रकाशन:-रोहन प्रकाशन
पृष्टे:- 173
किंमत:- 140
(अक्षरधाराच्या पुणे येथील पुस्तक प्रदर्शन व विक्री यामध्ये 11 जानेवारी 18 रोजी 25% डिस्कउंड वर खरेदी केले आहे)
रुंदी 110mm ×उंची180mm(रेग्युलर पुस्तक साइजपेक्षा लहान)

पुस्तकावरील पुस्तक या प्रकारातील हे तिसरे पुस्तक मी वाचून संग्रही ठेवले आहे. सुरवातीला 'बखर शिक्षणाची' हे शिक्षण क्षेत्रातील धडपड्या व शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींची माहिती असलेले पालक- शिक्षकांना अतिशय उपयुक्त असे हेरंब कुलकर्णी यांचे पुस्तक वाचले. नंतर बहुचर्चित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे निरंजन घाटे यांचे पुस्तक वाचले व माझ्या शब्दात जमेल तसे त्यावर लिहून इतर वाचकांसाठी माहिती देण्याचा प्रयत्न केला. याच पठडीतील डॉ. अरुण टिकेकर यांचे अक्षरनिष्ठांची_मांदियाळी' हे पुस्तक वाचून पूर्ण केले.


या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला ‘ग्रंथ-शोध’ तर दुसरा 'वाचन- बोध'.
लेखक लोकसत्ताच्या संपादकपदी असताना 'लोकमुद्रा' या पुरवणीत डिसेंबर 2000 ते डिसेंबर 2001 या काळातील लेख ग्रंथ शोध या भागात आहेत.
मदिराप्राशन आणि ग्रंथवाचन या दोन्हीमुळे कैफ चढतो पण या कैफातील गुणात्मक फरक सांगत पुस्तकाची सुरवात होते.
ग्रंथ-शोध या भागात लेखकांनी आपल्या नोकरीतील 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव अश्या ठिकाणी दुर्मीळ व जुन्या ग्रंथखरेदी बद्दल व त्या अनुभवाबद्दल लिहले आहे. रद्दीच्या दुकानात व जुन्या पुस्तकांच्या दुकानात भरपूर वेळ घालवला त्याच्या आठवणी, त्याचप्रमाणे अश्या ठिकाणची त्या दुकान मालकाबद्दलच्या स्नेहाची हकीकत सांगितली आहे.
  पुस्तकांना वाळवी, कृमी, लागू नये म्हणून वेखंडच्या मुळ्या पुस्तकाच्या कपाटात ठेवाव्या, ग्रंथ मुलासारखे सांभाळावे लागतात त्यांची काळजी घ्यावी लागते नाहीतर मोठ्या प्रमाणावरील ग्रंथसंचय घरातील इतरांना कसा तापदायक होऊ शकतो, सवलत न देणारे ग्रंथ विक्रेते व सर्वसामान्यांना परवडेल अशी भरगोस सवलत देणारे 'पद्मश्री टी. एन. शानभाग' आणि त्यांचे 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल' अशा अनेक आठवणी त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. लेखकांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ कसे मिळवले, पैसे नसल्यामुळे काही वेळा काही ग्रंथ हातचे गेले, तर काही परवडत नसतानाही खरेदी केले याबद्दल माहिती देतात. महनीय व्यक्तींच्या सही असलेलेे किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या संग्रहातील ग्रंथ रस्त्यावर कसे येतात, जिवंतपणी आपल्या ग्रंथसंग्रहाची योग्य रीतीने काळजी घेतो तशी मृत्यूनंतर त्याचे काय करायचे हेही स्पष्ट होण्यासाठी मृत्युपत्र करावे अथवा जिवंतपणी योग्य हातात ते सोपवावे असे मत लेखक व्यक्त करतात. आपल्या देशातून खुपसारे दुर्मिळ ग्रंथ परदेशी गेले आपल्याला ते सांभाळत आले नाहीत याचे लेखकांना वाईट वाटते. परंतु आपल्या येथील एकूण परिस्थिती पाहता झाले ते बरेच झाले असंही खेदाने म्हणतात. महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ व त्याची झालेली आबाळ, दुर्मिळ ग्रंथ जपणूक करण्यात झालेला हलगर्जीपणा, त्याचप्रमाणे इंग्लड मधील हे-ऑन-वाय हे पुस्तकांचे गाव याबद्दल माहिती देतात.

‘वाचन-बोध’ या दुस-या भागात, ‘वाचन’ या विषयावर दिलेले व्याख्यान आहे. या भागात लेखकांचे आवडते व त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या फक्त इंग्रजी ग्रंथांविषयी लिहिले आहे. (त्यामुळे फक्त मराठी वाचनार्यांची निराशा होऊ शकते). यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज किती महत्वाची आहे, योग्य मार्गदर्शक मिळाल्यास अनावश्यक वाचन व त्यामुळे वाया जाणारा वेळ कसा वाचू शकतो या बद्दल सांगितले आहे.
एखादं पुस्तक वाचले की आपणाला वाटतं... काय छान पुस्तक आहे. परंतु काय छान आहे हे सांगता येत नाही. फक्त Value judgement म्हणजे चांगलं आणि वाईट यापलीकडे सांगता येत नाही... म्हणून 'लर्निंग टू फिलॉसफाइझ' अशी पुस्तक मराठीत हवीत अस लेखक सुचवतात.
लेखकांच्या मते काव्य, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत.
बहुतेक वाचक आत्मचरित्र या पायरीपर्यंत जातात. तत्वचिंतन, तत्वचर्चेची पायरी ही वाचनाची प्रगतावस्था म्हणायला हवी, व ही अवस्था फारश्या लोकांनी गाठलेली नसते.कारण तसं शिक्षणच दिल जात नाही. अस मत ते व्यक्त करतात.
वाचक ते ग्रंथसंग्राहक अवस्था खूप मार्मिकपणे वर्णन केली आहे, खूप लोकांना ती आपलीच कहाणी वाटू शकते.
लेखक वाचकाचे चार प्रकार सांगतात... 1) वाचतो पण काय वाचतो याचे निकष त्याच्याजवळ नसतात 2) न वाचता पुस्तकांवर बोलणारे, 3) चांगलं-वाईट काय हे बरोबर ओळखणारे 4)समीक्षक जे की चांगलं काय, वाईट काय हे जाणतात. समीक्षक लेखक-वाचक-प्रकाशक यांना सांधनारा दुवा असतात.

कोणत्याही पुस्तकाची पूर्ण माहिती किंवा त्या विषयातील सखोल अभ्यास नसताना समीक्षा करू नये अस लेखकांचे मत आहे. समीक्षा करताना त्या विषयाचा अभ्यास नसेल तर लेखकावर अन्याय होऊ शकतो असही मत ते व्यक्त करतात...अजूनही बरच काही या पुस्तकात आहे.
एकूणच डॉ. अरुण टिककेकर यांच्या समृद्ध वाचन-लेखन जीवनाचे काही प्रमाणात दर्शन घडवणारे व वाचकांसाठी मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे.

(पुस्तक छान आहे पण नेमकं छान म्हणजे कसं.. हे मला सांगणं जमलंच आहे असं नाही... वाचलेल्या सर्वच पुस्तकावर लिहलं पाहिजे असही नाही... परंतु जे समजले किंवा लिहताना आठवले ते इतर वाचकांना उपयोगी पडेल व पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल या उद्देशाने हा लेखन प्रपंच.... चांगल्या समीक्षकांनी अजून योग्य शब्दात या बद्दल माहिती लिहून प्रसिद्ध करावी ही विनंती..संदिप रामचंद्र चव्हाण)