My Blog List

Thursday 15 February 2018

मार्केटिंगचे अजब तंत्र.. अन भरकटलेला समाज...


मार्केटिंगचे_अजब_तंत्र.. अन_भरकटलेला_समाज...


एक मल्याळी चित्रपट येऊ घातला आहे. नाव.. 'ओरू अदार लव. चित्रपटातील अठरा वर्षीय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारीयर हिने सद्या प्रसिद्धीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तिचा या चित्रपटातील २८ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मूळची केरळ राज्यातील त्रिसूरमधील असणारी प्रिया प्रकाश चोवीस तासात सहा लाख फालोअर मिळवीत देशभर प्रसिद्धीच्या झोतात आली.
'व्यालेंटाइन डे' ची संधी साधून या चित्रपटातील काही सीन्स, व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल केले गेले. आणि सोशलमीडियावर चोवीस तास ऑनलाईन असणार्यांनी हे व्हिडिओ शेअर करण्याचा धडाका लावला. सध्या कुठेही निवडणुका नसल्यामुळे, दंगल नसल्यामुळे, रोजगाराची गंभीर समस्या असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर तरुण लोखंसंख्येच्या हाताला काम नाही. त्यामुळे हे व्हिडिओ हातोहात शेअर होऊन बहुतेक मोबाईलच्या इनबिल्ट मेमरीत जाऊन पोचले. व्हिडीओ पाहिल्यावर हा चित्रपट 'शाळा- कॉलेजमधील भिन्नलिंगी आकर्षण' हा विषय केंद्रबिंदू ठेऊन बनवला आहे हे अगदी शेंबड पोरगं सांगेल. फक्त यात एक फरक दिसतो तो म्हणजे मुलीने यात आघाडी घेतली आहे.
मार्केटिंग मध्ये सोशलमीडियाला आलेले अनन्यसाधारण महत्व धंदेवाईक प्रवृत्तीने बरोबर ओळखून चित्रपटाची जाहिरात केली. व्यवसायच्या दृष्टीने चित्रपट निर्मिती यंत्रणा त्यांच्या जागेवर ठीक आहे.  *एका मल्याळी चित्रपटात शाळेत शिकत असणारी मुलगी तिच्याच वर्गातील मुलाला डोळा मारते... आणि मुलगा खल्लास!* असा हा व्हिडीओ पाहून अनेकजण असे काही चेकाळून जातात की त्या मुलीने यांनाच डोळा मारला की काय? हा प्रश्न पडतो.
चित्रपट हिट होईल, तो अनेक भाषेत प्रदर्शित होईल, ती मुलगी उद्या कदाचित मोठी अभिनेत्रीही होईल इतपर्यंत सर्व ठीक आहे.
पण याचा समाजमनावर किती पगडा पडावा? माध्यमातून किती चर्चा व्हावी? 'तरुण तुर्क अन म्हातारे अर्क' किती चेकाळावेत? यातून नव्या पिढीने काय घ्यावे? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.
या एका व्हिडीओमुळे, दक्ष समजल्या जाणाऱ्या सोशलमीडियातुन सगळे गंबीर प्रश्न, मुद्दे कसे बाजूला पडतात हे या निमित्ताने दिसून आले.
सोशलमीडिया व्यक्त होण्याचे माध्यम आहे. सोशलमीडियावरून क्रांती वैगेरे काही होणार नाही व तिथे समाजहिताच्या गोष्टींनाही जास्त महत्व नाही. वाद-विवाद निर्माण करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, जाती धर्मात तेढ वाढवण्यासाठी, राजकीय प्रचार प्रसारासाठी सोशलमीडियाचा भरपूर उपयोग होत आहे. सामान्य जनता गुड मॉर्निंग आणि गुड नाइटच्या पलीकडे पोचलेली नाही. फॉरवोर्ड खेळ खेळनारे फॉरवोर्ड केल्या जाणाऱ्या बातमीची, घटनेची सत्यता तपासून बघण्याचे कष्टही घेत नाहीत. त्यातूनच मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या देशासाठी फाशी गेलेल्या थोर क्रांतिकारकांच्या बलिदानाचा दिवस बदलला जातो. आणि व्यालेंटाइनला विरोध करण्यासाठी त्याचा आधार घेतला जातो. व्यालेंटाइन साजरा करावा का नाही हा वेगळा विषय आहे. मुळात प्रिय व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज असतेच असं नाही. पण बाजारपेठेला विविध 'डे' ची गरज असते. व ती गरज भागविण्यासाठी असे 'डे' प्रसिद्धीच्या झोतात आणले जातात.
अनलिमिटे इंटनेट पॅक मुळे सोशलमीडिया वापरताना वेगळा खर्च होत नाही असा एक सार्वत्रिक (गैर)समज आहे. परंतु ज्या वेळी आपण एखादी गोष्ट विनामोबदला वापरत असतो, सतत वापरत असतो त्या वेळी आपण त्यांच्यासाठी एक प्रॉडक्ट् असतो. त्यांच्यासाठी आपण वस्तू असतो.. ते(सोशलमीडियातुन स्वताचे हित साधणारे) आपल्याला त्यांच्या फायद्यासाठी वापरतात. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आपण आपल्या व समाजाच्या उन्नतीसाठी सोशलमीडियाचा प्रभावी वापर करुन देशहित पाहणे गरजेचे आहे.
व्यालेंटाइन व प्रिया प्रकाशाच्या व्हिडीओ मुळे विस्मृतीत गेलेल्या घटना पाहू...
काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्यांचा तीव्र हल्ला झाला असतानाच, १० फेब्रुवारीच्या पहाटे सुंजवानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना चाललेल्या सलग तीस तासांच्या ऑपरेशनमध्ये पाच दहशतवादी ठार झाले. आपलेही पाच जवान हुतात्मा झाले. हा हल्ला शनिवारी पहाटे झाला. पाठोपाठ सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी श्रीनगरच्या crpf तळावर दहशतवादी हल्ला झाला यात crpf जवानांनी दोन दहशतवादी ठार मारले तर आपला एक जवान हुतात्मा झाला. देशात पाकपुरस्कृत दहशतवाद कारवाया व सीमेवरील चकमकी वाढल्याने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जवान आपल्या प्रणाची बाजी लावत आहेत. देशात दहशतवादी संकट असताना, इकडे महाराष्ट्रात आस्मानी संकट आले. अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला रब्बी पिकाचा घास हिराऊन घेतला व त्यांच्या चिंतेत भर घातली. यावर चर्चा होऊन झालेले नुकसान टळणार नाही. आपण बंदूक घेऊन सीमेवर जाणार नाही. किंवा लगेचच शेतकऱ्यांची शेती तोट्यातून फायद्याची होणार नाही. परंतु या गोष्टींवर किमान चर्चा झाली तर आपल्यासाठी कोण कोण कष्ट उपसत आहे याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव उत्पन्न होईल.
सोशलमीडियाचा कमालीचा वापर करून बहुतेक सर्व स्थरातील लोकसंख्येला त्यात गुंतवून मुख्य समस्येपासून दूर घेऊन जाणे हे काही लोकांच्या फायद्याचे असते. त्यासाठी विविध यंत्रणा विविध स्थरावर काम करत असतात. अश्या यंत्रणा जाळे टाकून ठेवतात... माणसांची झालेली मेंढरे त्या जाळ्यात धावत जाऊन स्वतःला अडकवून घेतात, हे नित्याचे झाले आहे. समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे.
अखंड सावधान असावे... एवढेच आपल्या हाती आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment