My Blog List

Thursday 1 February 2018

अक्षरनिष्ठांची मांदियाळी ग्रंथशोध आणि वाचन-बोध

अक्षरनिष्ठांची_मांदियाळी
ग्रंथशोध आणि वाचन-बोध

लेखक:- डॉ. अरुण टिकेकर
प्रकाशन:-रोहन प्रकाशन
पृष्टे:- 173
किंमत:- 140
(अक्षरधाराच्या पुणे येथील पुस्तक प्रदर्शन व विक्री यामध्ये 11 जानेवारी 18 रोजी 25% डिस्कउंड वर खरेदी केले आहे)
रुंदी 110mm ×उंची180mm(रेग्युलर पुस्तक साइजपेक्षा लहान)

पुस्तकावरील पुस्तक या प्रकारातील हे तिसरे पुस्तक मी वाचून संग्रही ठेवले आहे. सुरवातीला 'बखर शिक्षणाची' हे शिक्षण क्षेत्रातील धडपड्या व शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींची माहिती असलेले पालक- शिक्षकांना अतिशय उपयुक्त असे हेरंब कुलकर्णी यांचे पुस्तक वाचले. नंतर बहुचर्चित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे निरंजन घाटे यांचे पुस्तक वाचले व माझ्या शब्दात जमेल तसे त्यावर लिहून इतर वाचकांसाठी माहिती देण्याचा प्रयत्न केला. याच पठडीतील डॉ. अरुण टिकेकर यांचे अक्षरनिष्ठांची_मांदियाळी' हे पुस्तक वाचून पूर्ण केले.


या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला ‘ग्रंथ-शोध’ तर दुसरा 'वाचन- बोध'.
लेखक लोकसत्ताच्या संपादकपदी असताना 'लोकमुद्रा' या पुरवणीत डिसेंबर 2000 ते डिसेंबर 2001 या काळातील लेख ग्रंथ शोध या भागात आहेत.
मदिराप्राशन आणि ग्रंथवाचन या दोन्हीमुळे कैफ चढतो पण या कैफातील गुणात्मक फरक सांगत पुस्तकाची सुरवात होते.
ग्रंथ-शोध या भागात लेखकांनी आपल्या नोकरीतील 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव अश्या ठिकाणी दुर्मीळ व जुन्या ग्रंथखरेदी बद्दल व त्या अनुभवाबद्दल लिहले आहे. रद्दीच्या दुकानात व जुन्या पुस्तकांच्या दुकानात भरपूर वेळ घालवला त्याच्या आठवणी, त्याचप्रमाणे अश्या ठिकाणची त्या दुकान मालकाबद्दलच्या स्नेहाची हकीकत सांगितली आहे.
  पुस्तकांना वाळवी, कृमी, लागू नये म्हणून वेखंडच्या मुळ्या पुस्तकाच्या कपाटात ठेवाव्या, ग्रंथ मुलासारखे सांभाळावे लागतात त्यांची काळजी घ्यावी लागते नाहीतर मोठ्या प्रमाणावरील ग्रंथसंचय घरातील इतरांना कसा तापदायक होऊ शकतो, सवलत न देणारे ग्रंथ विक्रेते व सर्वसामान्यांना परवडेल अशी भरगोस सवलत देणारे 'पद्मश्री टी. एन. शानभाग' आणि त्यांचे 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल' अशा अनेक आठवणी त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. लेखकांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ कसे मिळवले, पैसे नसल्यामुळे काही वेळा काही ग्रंथ हातचे गेले, तर काही परवडत नसतानाही खरेदी केले याबद्दल माहिती देतात. महनीय व्यक्तींच्या सही असलेलेे किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या संग्रहातील ग्रंथ रस्त्यावर कसे येतात, जिवंतपणी आपल्या ग्रंथसंग्रहाची योग्य रीतीने काळजी घेतो तशी मृत्यूनंतर त्याचे काय करायचे हेही स्पष्ट होण्यासाठी मृत्युपत्र करावे अथवा जिवंतपणी योग्य हातात ते सोपवावे असे मत लेखक व्यक्त करतात. आपल्या देशातून खुपसारे दुर्मिळ ग्रंथ परदेशी गेले आपल्याला ते सांभाळत आले नाहीत याचे लेखकांना वाईट वाटते. परंतु आपल्या येथील एकूण परिस्थिती पाहता झाले ते बरेच झाले असंही खेदाने म्हणतात. महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ व त्याची झालेली आबाळ, दुर्मिळ ग्रंथ जपणूक करण्यात झालेला हलगर्जीपणा, त्याचप्रमाणे इंग्लड मधील हे-ऑन-वाय हे पुस्तकांचे गाव याबद्दल माहिती देतात.

‘वाचन-बोध’ या दुस-या भागात, ‘वाचन’ या विषयावर दिलेले व्याख्यान आहे. या भागात लेखकांचे आवडते व त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या फक्त इंग्रजी ग्रंथांविषयी लिहिले आहे. (त्यामुळे फक्त मराठी वाचनार्यांची निराशा होऊ शकते). यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज किती महत्वाची आहे, योग्य मार्गदर्शक मिळाल्यास अनावश्यक वाचन व त्यामुळे वाया जाणारा वेळ कसा वाचू शकतो या बद्दल सांगितले आहे.
एखादं पुस्तक वाचले की आपणाला वाटतं... काय छान पुस्तक आहे. परंतु काय छान आहे हे सांगता येत नाही. फक्त Value judgement म्हणजे चांगलं आणि वाईट यापलीकडे सांगता येत नाही... म्हणून 'लर्निंग टू फिलॉसफाइझ' अशी पुस्तक मराठीत हवीत अस लेखक सुचवतात.
लेखकांच्या मते काव्य, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत.
बहुतेक वाचक आत्मचरित्र या पायरीपर्यंत जातात. तत्वचिंतन, तत्वचर्चेची पायरी ही वाचनाची प्रगतावस्था म्हणायला हवी, व ही अवस्था फारश्या लोकांनी गाठलेली नसते.कारण तसं शिक्षणच दिल जात नाही. अस मत ते व्यक्त करतात.
वाचक ते ग्रंथसंग्राहक अवस्था खूप मार्मिकपणे वर्णन केली आहे, खूप लोकांना ती आपलीच कहाणी वाटू शकते.
लेखक वाचकाचे चार प्रकार सांगतात... 1) वाचतो पण काय वाचतो याचे निकष त्याच्याजवळ नसतात 2) न वाचता पुस्तकांवर बोलणारे, 3) चांगलं-वाईट काय हे बरोबर ओळखणारे 4)समीक्षक जे की चांगलं काय, वाईट काय हे जाणतात. समीक्षक लेखक-वाचक-प्रकाशक यांना सांधनारा दुवा असतात.

कोणत्याही पुस्तकाची पूर्ण माहिती किंवा त्या विषयातील सखोल अभ्यास नसताना समीक्षा करू नये अस लेखकांचे मत आहे. समीक्षा करताना त्या विषयाचा अभ्यास नसेल तर लेखकावर अन्याय होऊ शकतो असही मत ते व्यक्त करतात...अजूनही बरच काही या पुस्तकात आहे.
एकूणच डॉ. अरुण टिककेकर यांच्या समृद्ध वाचन-लेखन जीवनाचे काही प्रमाणात दर्शन घडवणारे व वाचकांसाठी मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे.

(पुस्तक छान आहे पण नेमकं छान म्हणजे कसं.. हे मला सांगणं जमलंच आहे असं नाही... वाचलेल्या सर्वच पुस्तकावर लिहलं पाहिजे असही नाही... परंतु जे समजले किंवा लिहताना आठवले ते इतर वाचकांना उपयोगी पडेल व पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल या उद्देशाने हा लेखन प्रपंच.... चांगल्या समीक्षकांनी अजून योग्य शब्दात या बद्दल माहिती लिहून प्रसिद्ध करावी ही विनंती..संदिप रामचंद्र चव्हाण)

No comments:

Post a Comment