My Blog List

Saturday 24 November 2018

आलोक
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथासंग्रह,२०१६)

‘ज्यांची मुळं अजूनही मातीत आहेत’ अशांना अर्पण केलेला ‘अलोक’ हा सहा कथांचा कथासंग्रह म्हणजे बदलेल्या ग्रामीण जीवनाची वास्तवता सांगणाऱ्या जणू सहा कादंबऱ्या आहेत.
ग्रामीण कथा म्हणजे किस्से आणि इरसाल गोष्टी अशा समिकरणातून ग्रामीण कथेला यशस्वीपणे बाहेर काढण्याचे काम लेखक आसाराम लोमटे यांनी केलेले आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काही दशके खेडे आणि शहर यात बराच फरक होता. उत्तरोत्तर शहर आणि खेडे यांच्या सीमारेषा धुसूर होऊ लागल्या. आजच्या घडीला खेडं कुठं संपतं आणि शहर कुठं सुरू होतं हेही लक्षात येत नाही. सगळी सरमिसळ जाणवते.
शहर आणि खेडं यांच्यातील फरकाने ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ अशी वर्गवारी केली होती. इंडियाने भारताचे शोषण केले ही वास्तवता असली तरी भरतातल्या भारतातही शोषणव्यस्था होती/आहे. त्याचाच शोध घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकानी ‘आलोक’ या कथासंग्रहात केलेला आहे.

या कथासंग्रहात एकूण सहा दीर्घकथा आणि एक परिशिष्ट आहे. यातील प्रत्येक कथेची मांडणी, त्यातील बोलीभाषा, प्रसंगाचे वर्णन वाचकाला गुंग करून टाकते.  कथेतील सर्व प्रसंग आपल्याच समोर घडतायत, जणू आपण एखादा चित्रपट पाहतोय असं वाचकाला जाणवतं.

खेड्यातला माणूस म्हणजे केवळ शेतकरी नव्हे तर शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया, मुलं/मुली, शाळेचे शिक्षक, छोटे मोठे व्यावसाईक इत्यादी सर्व घटकांचे मिळून खेडं बनतं. खेड्यातील या माणसांचं संघर्षम जगणं, या जगण्यातले ताणतणाव, त्यांना रोज भेडसावणाऱ्या अनंत अडचणी, त्या अडचणींचा सामना करताना आणि प्राप्त परिस्थितीशी झगडा देताना त्यांच्या मनाची होणारी तगमग, त्यांच्या जीवाची होणारी घालमेल, जीवन जगण्यासाठीचा त्यांचा चिवट जीवनसंघर्ष, संघर्ष करताना येणारं अपयश, गमावलेला आत्मविश्वास, आणि तरीही उठून उभा राहण्याचा प्रयत्न, काहींच्या वाट्याला आलेलं धडपडत जगणं, आणि जगण्यासाठीची धडपड तर काहींच्या वाट्याला आलेली पद-प्रतिष्ठा-सत्ता-संपत्ती, त्याबरोबरच खेड्यापाड्यापर्यंत पोचलेलं भ्रष्ट- वेडंवाकडं राजकारण, राजकारणात सरळ माणसाचे होणारे खच्चीकरण, खेड्यातील वाढती व्यसनाधीनता, जमीन-जुमल्यावरून होणारी भांडणं- मारामाऱ्या त्यातून होणारे खून, इतक्या साऱ्या प्रसंग-घटना-परिस्थितीचे वर्णन ‘आलोक’ या कथासंग्रहात येतं. यातील सर्व कथा मनाच्या आतपर्यंत उतरतात. काही कथा मनाला गदगदून हलवून सोडतात तर काही मनाला चटका लाऊन पापण्याच्या कडा ओलावुन जातात.

#ओझं’ ही मनाला चटका लावणारी अशीच एक कथा. या कथेत आपल्यापेक्षा सात-आठ वर्षानी मोठ्या पण आत्महत्या केलेल्या शेतकरी भावाशी प्राध्यापक भावानं केलेला संवाद आहे. मोठा भाऊ लग्न झाल्यावर, आठव्या इयत्तेत असणारी एक पोर पदरात असताना, सततची नापिकी, वाढत्या कर्जाला कंटाळून व्यसनाच्या आहारी जातो. आर्थिक विवंचना, वाढते कर्ज आणि दुष्काळी परिस्थितीमुळे गावाकडील भाव कमालीचा खचून जातो आणि आत्महत्या करतो. 
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही मृत भावाची बायको जणू निवडुंगातून वाट काढण्यासाठी खंबीर उभी राहते. तिचं आयुष्य म्हणजे जत्रा पांगल्यासारखं, वैशाखातील उन्हांन आयुष्यभरासाठी पाल ठोकावं तसं. आता साऱ्या घराचा डोलारा तिच्यावर.
ज्या घरात कर्त्या माणसाची आत्महत्या होते त्या घरातील लोकांना कोणत्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते, विशेषतः गेलेल्या व्यक्तीच्या बायकोला नवऱ्याच्या पश्चात कच्चीबच्ची वाढवताना कोणत्या हालअपेष्टा सोसाव्या लागतात, सामन्य शेतकरी कुटुंबात कोणत्या प्रश्नांना तोंड द्यावे लागते याची कल्पना या कथेतून येते.

#वळण’ ही मनाचा ठाव घेणारी अशीच दुसरी कथा! शेळ्या राखणाऱ्या व त्यावर गुजराण करणाऱ्या बापाची लाडकी मुलगी प्रयाग उर्फ पगन. आठव्या इयत्तेत शिकणारी, सातवीला स्कॉलरशिप मिळवळलेली त्या शाळेतील एकमेव मुलगी. तिला शिक्षणाची आवड आहे. आईबापालाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे मोठे व्हावे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते.  ‘प्रयाग’ रोज वाडीवरून गावातील शाळेत चालत जाते. एक दिवस प्रयाग एकटीच जात असताना त्या वाटेवर कोणाचीतरी किंकाळी ऐकते, मागे वळून पाहते तर डोंगराच्या टेकडीवर तिला एक माणूस दिसतो. तिथे खून झालेला असतो. पुढे प्रयगच्या शिक्षणाचं काय होतं हे पूर्ण कथा वाचल्यावर समजतं.
या कथेत गरिबांची होणारी ससेहोलपट, त्यांना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या गळतीची कारणं, हातावले पोट असणाऱ्या लोकांच्या आयुष्यातील एक कोडं सुटावं तर दुसऱ्या कोड्यात फसावं अशी अवस्था. संवेदनशील वाचकाला अस्वस्थ करते.

#जीत ही कथा ग्रामपंचायत पोटनिवडणूक व त्यातील शह-काटशह यावर बेतलेली आहे. ग्रामपंचायत सदस्य असणारा नवरा अचानकपणे अपघातात गेल्यानंतर त्याच्या बायकोला पोटनिवडणुकीचा अर्ज भरायला कसं मजबूर केलं जातं. ग्रामीण भागात भावकीचे राजकारण कसं चालतं. निवडणुकीत पैसा, दारूचा पूर कसा वाहतो याच जिवंत चित्र या कथेतून डोळ्यासमोर उभं राहतं. 

#खुंदळण' ही कथाही राजकारणावर बेतलेली आहे. दत्ताराव हा एक सामाजिक आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ता सततच्या पराभवाला कंटाळून, लेकीच्या लग्नाला पैशाची चणचण असताना आमदाराने केलेल्या आर्थिक मदतीच्या ओझ्याखाली दबून पक्षांतर करतो. परंतु त्याचा पिंड या नव्या राजकीय संसारात रमणारा नाही. त्याच्या मनाची घालमेल, जुन्या साथीदारांचं टोचून बोलणं, नव्यानी त्याला उपरा मानणं. यात त्याची कमालीची घुसमट होते. राजकारणातील सामन्य कार्यकर्त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याचं वर्णन या कथेत आहे.

गावातल्या राजकारणात परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा होतो याचे दर्शन #कुभांड’ या कथेतून होते.

जमीन जुमल्यावरून खून होऊनही हैद्राबाद मुक्ती संग्रामात हुतात्मा म्हणून नोंद झालेल्या आणि आजोबाच्या पाठीमागे #चिरेबंदी’ वाड्यात एकटीच राहणाऱ्या आजीच्या शहरातून आलेल्या नातवाला त्या वाड्याबद्दल आत्मीयता न वाटण्याचे कारण चिरेबंदी या कथेत रेखाटलं आहे.

अशा सहा कथा संपल्यावर परिशिष्ट आहे. परिशिष्टात लेखकानी त्यांच्या लिहण्यामागची भूमिका, पत्रकारिता करताना त्यांना समाजात येणारे अनुभव, बदलत्या वास्तवाची झालेली जाणीव इत्यादी गोष्टींचा उवापोह केलेला आहे.

आसाराम लोमटे यांची लेखनशैली वर्तमानातील खऱ्याखुऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारी वाटली. शहरी व्यक्तीला या कथा किती जवळच्या वाटतील हे सांगता येत नाही. परंतु माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या व तिथल्या परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना हा कथासंग्रह म्हणजे आपल्या गावातीलच घटना आहेत असं वाटल्यास नवल ठरणार नाही.
या पुस्तकातील ‘नाहि रे ‘वर्गाच्या व्यथा सगळीकडे सारख्याच वाटतात. गावोगाव बदलेलं राजकारण, गरिबांचं होणारे शोषण, स्वार्थासाठी कुणाचेही नुकसान करणारी माणसं, वाढती व्यसनाधीनता, तरुण पिढीला आलेलं नैराश्य, वेळीअवेळी पडणारा पाऊस, सततचा दुष्काळ, भाऊबंदकीचे तंटे, उत्पन्न आणि खर्चाचा न बसणारा ताळमेळ आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी, शिक्षणासाठी करावी लागणारी धडपड आणि असंख्य तडजोडी, परिस्थितीमुळे अर्ध्यावर सोडावं लागणारं शिक्षण, कसतरी शिकलं तरी नोकरीचा आ-वासून असलेला प्रश्न, एखाद्या उद्योग धंद्यासाठी उपलब्ध न होणारं भांडवलं, शेतकरी मुलांची न होणारी लग्ने, इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली तरुण/तरुणी  या व अश्या कित्येक सामाजिक समस्यांनी उग्र रूप धारण करायला सुरुवात केलेली आहे. यातील बहुतेक समस्यांचे प्रतिबिंब लोमटे सरांच्या ‘आलोक’ मध्ये उमटले आहे असं मला वाटतं आणि ते संवेदनशील मनाला साद घालतं, जागं करतं. म्हणूनच प्रत्येक मराठी साहित्यप्रेमीनी हे पुस्तक एकदातरी अवश्य वाचावे असे माझं मत आहे.
@संदिप रामचंद्र चव्हाण.

आलोक
(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथासंग्रह,२०१६)
लेखक: आसाराम लोमटे
शब्द पब्लिकेशन
किंमत: ₹२५०
पृष्ठ संख्या: १८२ संख्या: १८२

No comments:

Post a Comment