घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती…
शिकार करून पोट भरणारा आदिमानव हळूहळू शेती करू लागला आणि घर बांधून स्थिरावला. सुरवातीला एखादी नैसर्गिक गुहा त्याचे घर होते तर पुढे झोपड्या बांधून तो समूहाने राहू लागला. उन्ह, वारा, पाऊस यापासून घर त्याचे संरक्षण करू लागले. तो वेगवेगळ्या सुधारणा करून घराची रचना अधिक पक्की करत गेला. कुडा-मेढीची, मातीची, विटा-सिमेंटची, कौलारू, पत्र्याची, आरसीसी, घर स्वतःचे, घर भाड्याने घेतलेले.. असे अनेक बदल होत प्रत्येकाच्या कुवतीनुसार घरं बनत गेली. गरीब असो की श्रीमंत त्याला हवे असते किमान एक घर. त्या घरात जीवनावश्यक वस्तू आणि सुख-दुःख वाटून घेणारी माणसं. माणसांशिवाय घर नाही आणि घराशिवाय कुटुंबसंस्था नाही. माणूस आणि घर यांचा असा घनिष्ठ संबध असतो. घर माणसाचं सुरक्षाकवच असते. दिवसभर वणवण करून रात्री त्याची पावले घराकडे वळतात. डोक्यावर छप्पर असले की माणूस थोडा निर्धास्त असतो. एका एका घरात तीन-तीन, चार-चार पिढ्या जन्मतात, मोठया होतात आणि तिथेच खस्त होतात. माणसं बदलली तरी घरं तशीच असतात. नवीन पिढ्या त्याला आपलंसं करतात. घर म्हणजे केवळ खांबाभिंतींवर तोललेल्या छपरांची, विटा-माती-सिमेंटची निर्जीव इमारत नसते. त्या घरातील माणसांनी ती जिवंत वास्तू बनलेली असते.
माणसं माणसांवर प्रेम करतात तशी आपापल्या घरावरही प्रेम करतात. ज्यांना घर सोडून दूर रहावे लागते त्यांना एखाद्या प्रियतम व्यक्तीसारखंच घर भासते. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर असणारी मंडळी दूर असल्यास महिन्या-दोन महिन्यातून, जवळ असल्यास आठ-पंधरा दिवसातुन घराकडे चक्कर मारतात. घराकडे जायला जेव्हा कोणी निघतो तेव्हा घरी कधी पोचतो आणि कधी नाही अशी ओढ प्रवासात व्यक्तीला लागलेली असते. घर अनेक कडू-गोड आठवणींचे कोंदण असते. घर माणसांनी भरलेले गोकुळ असते. घर, घराचा परिसर, शेजार-पाजार, आंगण- परसबाग, सोफा-मधले घर-आतले घर, हॉल-किचन-बेडरूम, जिना-माडी, माळा-पोटमाळा, खिडक्या-दरवाजे-साने-दिवळ्या, पोपडलेल्या भिंती-प्लॅस्टरच्या भिंती.. प्रत्येक घर वेगळे. त्यात राहणारी माणसं वेगळी. परंतु घराबद्दल प्रेमाची भावना मात्र जवळपास सगळ्यांची सारखीच असते.
काही अपवाद असतात यालाही... घरातील सततचे कज्जे-सतत भांडण तंटा, शिव्यागाळ, मारहाण, अपमान, डावलले जाण्याची भावना यामुळे काहींना घर नकोस वाटतं. त्यामुळे घरापासून दूर कुठेतरी जावं असं काहींना वाटतं पण हे प्रमाण खूप कमी असते.
घराची सत्वपरिक्षा होते ती अशा वावटळात- संकटकाळात. भांड्याला भांड लागतं, वादविवाद घडतात, कोणी दुखावलं, कोणी दुरावलं, मानसामानसात बेबनाव झाला, घर फुटायची वेळ आली तर घर अस्वस्थ होतं. भांडण तंटा, बेबनाव उंबऱ्याच्या आत असतो तोपर्यंत घरं टिकून असतात. बेबनाव वाढला की घराच्या वाटण्या होतात. सोफा-हॉलची विभागणी होते. मध्ये विटा मातीच्या भिंती उभारल्या जातात…. घर दुभांगते आणि माणसांची मनेही!
त्याच प्रमाणे घरातील कर्त्या माणसाचं अचानक निघून जाणं घराला पोरकेपन आणतं. कितीही रंगरंगोटी केलेली असली तरी ते घर भकास दिसू लागतं. अशा वेळी मागे राहिल्यालेल्यांनी घर सावरायचचं असतं. सगळ्यांनी मिळून गेलेल्या माणसाची स्वप्न पूर्ण करायची असतात. घराला पुन्हा नेटानं उभं करायचचं असतं.
अलीकडे दोन तीन दशकात गावखेड्यातून तरुनपिढी मोठ्याप्रमाणावर नोकरी-धंद्यानिमित्त खेडी सोडून शहरात कायम किंवा तात्पुरती स्थिरावली. गावाकडील घरात एखादा भाऊ, आई-वडील असले की दशके गेली तरी घराची नाळ घट्ट राहते. मुळं मजबूत राहतात. परंतु काही कुटुंबातील सगळीच पाखरं अन्नपाण्यासाठी दाहिदीश्या उडालेली असतात. घरात उरलेली म्हातारी खोडं शून्यात नजर लावून बसतात. 'या चिमन्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या' ही आर्थ हाक मनातल्या मनात मारत असतात. सणावाराला त्यांच्या चिल्यांपिल्यानी घर भरले की त्यांना काय करू नी काय नको असं होतं. सुट्टी संपली पाखरं उडाली की पुन्हा म्हातारे डोळे पाझरू लागतात. एकाला दुसऱ्याची साथ असेल तर आला दिवस मागं लोटून दिवस काढले जातात. पिकलं पान कधीतरी गळून पडेल पण मागे उरेल त्याला एकटेपणा खाऊन टाकेल ही भीती दोघांच्या मनात असते. पाखरं त्यांच्या नव्या घरट्यात त्यांना बोलावत असली तरी ही म्हातारी खोडं आपलं गाव आणि कित्येक पिढ्यांनी कसलेली माती सोडायला तयार नसतात. त्यांचा हा हट्ट दोघांतील एकाला घेऊन जातो. मागे उरलेल्याच्या मनाला चुटपुट लावतो. राहिलेल्या एकाला कोणत्यातरी एका पाखराच्या घरट्यात मनाच्या विरुद्ध मनावर मनामनाचे दगड ठेवून घर सोडावं लागतं… आता त्या घर नावाच्या गोकुळाच्या फक्त भिंती उरलेल्या असतात.. ते घर आता पोरकं झालेलं असतं.. अगदी पोरकं! 😥
No comments:
Post a Comment