My Blog List

Friday 2 March 2018

निमित्त:होळी, धुलीवंदन, रंगपंचमी

निमित्त_होळी_धुलीवंदन_रंगपंचमी

काल होळी झाली.. आज धुलीवंदन (धुळवड) आहे. अजून चार दिवसांनी रंगपंचमी येईल. भारतीय संस्कृतीत सण-उत्सव यांची एक परंपरा आहे. निसर्गाच्या बदलाप्रमाणे व कृषिसंस्कृतीशी नाते सांगणारे वेगवेगळे सण साजरे करणारा भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे. जगातील इतरही देशात त्यांच्या संस्कृतीनुसार उत्सव साजरे होतात पंरतु वर्षाच्या बाराही महिन्याला येणारी सणांची माळ बहुदा आपल्याच देशात असेल. भारतात वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या भाषेनुसार सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या खंडप्राय  देशात खान-पान, राहणीमान, भाषा जश्या वेगवेगळ्या आहेत तसे सण साजरे करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.
आपल्या राज्याचा विचार करता चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा करून नवीन वर्षाची सुरवात होते तर फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीने, होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुलीवंदनाने व धुलीवंदनाच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीने वर्षाची सांगता होते. होळी ते रंगपंचमी हा एकच सण मानला जातो.

शेकडो वर्षांपासून होळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. ^^काहींच्या मते होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम होलिका किंवा होलाका, ढूंढा, पूतना यांच्यासारख्या पुराणकाळी लहान मुलांना पीडा देणा-या राक्षसींच्या दहनाच्या कथेत आहे, तर काही लोक त्‍याचे कारण मदन दहनाच्या कथेत असल्‍याचे सांगतात. पुराणात याबाबत दिलेल्या कथेनुसार, पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नावाची राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा देऊ लागली तेव्हा लोकांनी तिला शिव्या व शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला पळवून लावले. तेव्हापासून त्या उत्सवात शिव्या, बोंबा मारण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. परंतु विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपुजनाच्या परंपरेतून साजरा होतो आहे.^^
होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. काही ठिकाणी होळीची राख पाण्यात मिसळून एकमेकांच्या अंगाला लावली जाते. उत्तर भारतात धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची होळी खेळण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात उत्तर भारतीय मोठ्या प्रमानार स्थलांतरित झाल्यामुळे व चित्रपटातील सेलिब्रेटींना हाताशी धरून विविध कंपन्यांनी धुलीवंदनाचे मार्केटिंग केल्यामुळे आजच्या दिवशी रंगांची होळी(होली) खेळली जाते. त्यामुळे मोठ्या शहरात मराठीसण असणारी रंगपंचमी कुठेतरी मराठी भाषेसारखीच हरवत चालली आहे.

कोकणात होळीला शिग्मो म्हणतात. तर उर्वरीत महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी शिमगा म्हणतात.
शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढतात त्याला शिमग्याने सोंग म्हणतात. काही ठिकाणी तर वेगळीच तरा असते... कुठे शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बोरीचा बार यासाठी प्रसिद्ध आहे. काही गावामध्ये जावयाची गाढवावरून धिंड काढली जाते. धिंड झाल्यावर जावयाला सुहासिनिकडून उटण्याने आंघोळ घातली जाते व पोशाख देऊन सन्मान केला जातो. जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा असते. त्‍यामुळे गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते. नाशिक जिल्ह्यातील वंडांगळी या गावात अशी पध्द्त असल्याचं वाचनात आलं आहे. अजूनही वेगवेगळ्या खेडोपाडी वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा आहेत.
कोणत्याही रूढी परंपरांचा काही अर्थ असतो. चुकीच्या रूढी परंपरा बंध झाल्या पाहिजेत व कालांतराने त्या बंधही होतात. काही चांगल्या परंपरांचे जतन करणे हेही सर्वांचे काम आहे. वाईट रूढी परंपरा बंध होताहोता आता दारू पिऊन धुळवड साजरी करण्याची नवी परंपरा काही ठिकाणी चालू होताना दिसते आहे. आषाढ आमावस्याची गटारी आमावस्या झाली. त्याचप्रमाणे धुलीवंदन(धुळवड) म्हणजे पिणाऱ्यांसाठी पर्वणीच अस काहीसं चित्र तयार होत आहे.
अलीकडे राजकीय धुळवड असाही शब्दप्रयोग वारंवार ऐकायला मिळतो आहे. यातून राजकीय विचारांचे पतनच सुचवायचे असते. नुकत्याच झालेल्या विविध निवडूनकामधून राजकीय धुळवड दिसून आली आहे.

होळीच्या आधी झाडांची पानगळ झालेली असते. तो पालापाचोळा गोळा करून, परिसरातील कचरा एकत्र करून त्यात आपल्या मनातील वाईट विचार टाकून होळी पेटवायला हवी. अनावश्यक वृक्षतोड व बहुमूल्य लाकूड, गोवऱ्या(शेण्या) जाळणे कुठेतरी थांबायला हवे. होळीच्या अग्नीत मनातील काम,क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर, अहंकार यांना जाळून टाकायला हवे. पण हे विकार मनात ओझं म्हणून वागवणारे आपले मन खूपच विचित्र असते. बहिणाबाई चौधरी एका कवितेत म्हणतात...

मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर।
अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।।

विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते. (मंत्राने विष उतरत नाही, शब्दशः अर्थ घेऊ नये) पण मनातील विष म्हणजे वाईट दुषवृत्तीवर कोणता इलाज?? आपल्या स्वभावातील दोष शोधून त्याचे निर्मूलन करणे हा होळीचा उद्देश व्हायला हवा.

धुलीवंदनाच्या दिवशी वसंतऋतुची सुरवात होते. शिशिरात पानझड झालेल्या झाडांना वसंतऋतुत नवी पालवी फुटते. होळीपासून वाढणाऱ्या उष्म्यात झाडांची नवी पालवी डोळ्यांना सुखावते. पशु पक्षांना आपल्या सावलीत घेते. ऋतूंचा राजा म्हणजे वसंतऋतु. वसंतऋतु हा तारुण्याचा निदर्शक आहे. जुनी जळमटे काढून नवी पालवी लेऊन आयुष्याचा मार्ग चालायचा असतो. असा काहीसा संदेश वसंतऋतु देत असतो. अडचणी आल्या, संकटे आली म्हणून निराश होऊ नका. वसंत होऊन नव्याने नवी सुरवात करा असाच संदेश तो देतो.

रंगपंचमी उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते.¶
सध्या रंगपंचमीला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का याची जागा कृत्रिम रासायनिक रंगांनी घेतली आहे. रासायनिक रंगांची मागणी वाढू लागली आहे. कृत्रिम रासायनिक रंग बाजारात उघडय़ावरही विकले जातात. या रंगाच्या वापराने त्वचेला इजा होऊ शकते, डोळ्यांना त्रास होतो. रंगपंचमीला कृत्रिम रंगापेक्षा नैसर्गिक रंग वापरण्यावर भर हवा. हुल्लडबाजीला आवर हवा. रंगाच्या पाण्याचे फुगे मारणे हा धोकादायक प्रकारही थांबायला हवा. या दिवशी रंगांची उधळण करून एकमेकाप्रति जिव्हाळा, मैत्री, स्नेह जपण्याचा प्रयत्न हवा.

वसंतोत्सवाचे स्वागत धुळवडीला कसे होते?? होळी साजरी कशी केली?? येणारी रंगपंचमी कश्या पध्दतीने साजरी करणार?? या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत. सणांच्या नावाखाली विभिस्तपणा होणार नाही याची काळची सर्वांनीच घ्यायला हवी. रंगांचा बेरंग होऊन धुळवडीच्या रस्त्याने आयुष्याची होळी आणि घराची राखरांगोळी होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष असायला हवे. आषाढ आमावस्या व धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या पुराची पातळी वाढत आहे. वेळीच बांधबंदिस्ती केली नाही तर वसंतऋतुरुपी तारुण्याची पालवी दारूच्या पुरात वाहून जाईल... नंतर उर बडवून झालेले नुकसान भरून येणार नाही. काल होळीची पोळी झाली आज नळी खायला हरकत नाही... पण दारूला तिथे थारा नको. व्यसनमुक्त युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती संपत्ती कमी व्हायला नको. त्यात वाढच अपेक्षित आहे.
सर्वांना होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

संदिप रामचंद्र चव्हाण.

^^ संदर्भ:- भारतीय संस्कृतिकोश, खंड दहावा
¶¶ संदर्भ:- मराठी विश्वकोश.

No comments:

Post a Comment