My Blog List

Thursday 19 April 2018

एका सार्वजनिक मंडळाची अनोखी स्वप्नपूर्ती....

एका_सार्वजनिक_मंडळाची_अनोखी_स्वप्नपूर्ती....
किल्ले_आग्रा_ते_कोपर्डे_हवेली(ता:कराड;जि:सातारा) मार्गे_किल्ले_श्रीरायगड शिवज्योत प्रवास...

महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या जयंती निमित्त शिवस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवरुन शिवज्योत(मशाल) पेटवून आणण्याची परंपरा खुप वर्षांपासून सुरू आहे.
शिवस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणी जाऊन प्रेरणा मिळते. इतिहास समजून घेण्याची लालसा निर्माण होते. शिवजयंतीचे औचित्य साधून अशा ठिकाणाहून शिवज्योतिच्या रूपाने प्रेरणा घेऊन, तरुण मंडळे आपल्या मूळ गावी परततात. जे लोकं गडकोटांवर जाऊ शकत नाहीत त्यांना या शिवज्योतिच्या दर्शनाचे समाधान लाभते. धर्मवीर_संभाजी_मंडळ कोपर्डे हवेली, ता कराड, जि सातारा. यांनी ही परंपरा गेली तीस वर्षे अखंडपणे जपलेली आहे.
  कराड तालुक्यातील कृष्णाकाठी वसलेले #कोपर्डे_हवेली हे दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. शेती हा मुख्य आधार असलेल्या या गावात सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी धपडणारी अनेक तरुण मंडळे आहेत. धर्मवीर संभाजी मंडळ हे त्यापैकीच एक. मंडळाची स्थापना १९८८ साली झाली. गेली ३० वर्षे शिवजयंतीउत्सव, गणेशोत्सव अखंडपणे साजरा केला जात आहे. या तीस वर्षात तरुणांच्या तीन पिढ्या झाल्या.  १९८८ ते १९९८, १९९८ ते २००८ आणि २००८ ते २०१८ अश्या दहा दहा वर्ष्याच्या कालखंडात जुनी पिढी नोकरी धंद्यानिमित बाहेर पडली आपल्या संसाराला लागली. पुढील पिढीने मंडळाचे काम नेटाने चालवले. सध्या पहिली पिढी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. दुसरी पिढी आता थोडी मागल्या पावलावर आहे आणि तिसरी पिढी मंडळाची धुरा सांभाळून आहे. आपले शिक्षण, रोजगार पाहून प्रतिकूल परिस्थितीत सामजिक काम करत एकमेकांप्रती स्नेह, मैत्री, जिव्हाळा जपून, सर्व जुने जाणते सदस्य मार्गदर्शक म्हणून तर नवीन पिढी धडाडीचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून मंडळातील सदस्यांनी एक स्वप्न पाहिले होते.... शिवस्पर्शाने पावन झालेल्या आग्ऱ्याच्या किल्ल्याहून कोपर्डे हवेलीत शिवज्योत आणायची.

साधनांची कमतरता, आर्थिक परिस्थिती, व प्रत्येवेळी काहीतरी अडथळा त्याचबरोबर धकाधकीच्या आयुष्यात दहा बारा दिवस वेळ काढणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. या व अश्या कारणामुळे हे स्वप्न दिवास्वप्न ठरतंय कि काय अशी स्थिती झाली. मी ज्यावेळी या मंडळाचा सक्रिय सभासद म्हणून काम पाहू लागलो तो काळ म्हणजे १९९८ ते २००८/०९ त्यावेळीही तेच स्वप्न तीच चर्चा शिवजयंतीच्या दरम्यान दरवर्षी चालू असायची. तोपर्यंत तरी जिल्ह्यातून १७०० किलोमीटरचा एवढा मोठा प्रवास करून शिवज्योत कोणी आणलेली नव्हती. हे कार्य पार पाडायचे असं एकदा नियोजनही झालं. या दरम्यानच्या काळात मंडळाचे अनमोल रत्न 'दत्तात्रय चव्हाण' काळाने हिराऊन घेतले.😢 पुढे असेच दोन धक्के बसले. आणि पुन्हा हा विषय लांबणीवर पडला. गेल्या पाच सहा वर्षात मंडळाची तिसरी पिढी कामाला लागली. जेष्ठांची पहिली पिढी सदैव पाठीशी तर दुसरी पिढी आर्थिक भार उचलायला नेहमी तयार राहिली..... आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी हे शिवधनुष्य उचलले..... तीस वर्षाचं स्वप्न सत्यात उतरणारा तो दिवस आला...
दि.५ एप्रिल २०१८ रोजी बारा 'मावळे' आग्ऱ्याच्या दिशेने कूच झाले. लक्ष्मण कृष्णत साळवे(दादा), जयवंत उर्फ सिद्धनाथ बाबुराव चव्हाण, अभिजित सुदाम चव्हाण, गोरख रामचंद्र चव्हाण, गणेश भीमराव चव्हाण, विक्रम भानुदास चव्हाण, गणेश बाबासो साळवे, नितीन अरुण तुपे, कृष्णत सुभाष भोसले, सचिन अर्जुगडे, अंकुश लक्ष्मण शिंदे आणि वाहन चालक अनिकेत गोसावी ही ती मंडळी होय.
आयशर ट्रक, एक सायकल, एक मोटरसायकल, जेवन बनवण्यासाठी गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, जेवणाचे साहित्य इत्यादी आवश्यक गोष्टी बरोबर घेऊन ही मंडळी कराड-पुणे-गुजरात मार्गे- राजस्थान(जयपूर)- दिल्ली(लाल किल्ला)- आग्रा असा प्रवास करून ९ एप्रिलच्या सकाळी आग्ऱ्याच्या किल्यावर पोचली. किल्ला पाहून दुपारी शिवज्योत पेटवली. आणि सायकलरुन प्रवास चालू झाला... किल्ले आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली.

सामान्य घरातील पोरं जेव्हा एखाद्या स्वप्नाने वेडी होतात तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी खूप धडपडतात. आणि असामान्य काम करून दाखवतात. जे लोकं काहीतरी करण्याचे स्वप्न पाहतात ते त्या दिशेने कृती करतात. जीे लोकं स्वप्ने पाहतच नाहीत, त्यांना काहीच करता येत नाही. स्वप्न पाहणे हा अर्धा भाग असतो, ही स्वप्ने व्यवहारात साकार करणे हा उरलेला अर्धा भाग असतो. जे फक्त स्वप्नेच पाहतात ते फार तर कवी होऊ शकतात. ज्यांच्यात काही करून दाखवण्याची धमक असते ते स्वप्नांच्या पुर्तीसाठी झटतात.

गेली पावणेचारशे वर्षे 'शिवाजी' नावाची जादू सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर राज्य करत आहे. आपल्या देशात एखाद्या राजाला ईश्वरी अंश मानले गेले, त्याला देवत्व बहाल केले असे एकमेव शिवछत्रपती!! कोट्यवधींच्या कल्याणाची स्वप्न पाहणाऱ्या राजाचा इतिहास भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना कळावा, त्यांच्या उपसलेल्या कष्टाचा एक अंश जीवन आपण जगून पहावं म्हणून 'आग्रा ते रायगड' शिवज्योत आणणे हा प्रपंच!!

या मोहिमेत सहभागी बारा मावळ्यांनी जातानाच्या प्रवासात घरूनच सोबत न्हेलेल्या शिदोरीवर दिवस काढले. तर परतीच्या प्रवासात स्वतः अन्न शिजवून पोट भरले. हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत खाऊन जिभिचे चोचले भागवण्यासाठी हा एवढा मोठा प्रवास नाही. त्यासाठी आलोही नाही याचे भान त्यांनी ठेवले. शिवरायांच्या मावळ्यांना सुपारीच्या खांडाच व्यसन नव्हतं, हे आमच्यावर आमच्या वडीलधार्यांनी कायमच बिंबवलेलं आहे. त्यामुळे दारू पिऊन शिवजयंती करतात हे बोलणार्यांनी अशा तरुणांची एकदा भेट घ्यायला हवी. प्रतिकूल परिस्थितीत कसे रहायचे. त्या परिस्थितीत कसा संघर्ष करायचा. आपल्या ध्येयापर्यंत कसे पोचायचे. त्यासाठी नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा, चारित्र्य या गोष्टी कशा महत्वाच्या असतात याचे बाळकडू शिवचरित्रात आपल्याला वाचायला मिळते. आग्रा ते रायगड प्रवास करताना तसे जगायला मिळते.

हा प्रवास करताना या तरुणांनी दिवसरात्र आलटून पालटून सायकल चालवली. त्यांच्या अनुभवावरून त्यांना असं जाणवलं की बाहेरच्या राज्यात शिवरायांना मानणारा, त्यांच्या बद्दल कुतुहल असणारा खूप मोठा वर्ग आहे. शिवरायांची प्रतिमा, डिजिटल फेक्स, भगवा झेंडा ई. ट्रकला लावले असल्यामुळे लोक आस्थेने चौकशी करायचे. दिल्लीसारख्या शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश नसलेल्या ठिकाणीही त्यांची अडवणूक झाली नाही. (वाहनाची सर्व कागदपत्रे, इन्शुरन्स, पियुसी असे कायदेशीर सर्व आवश्यक बाबी सोबत होत्या.) गडबड गोंधळ, उगाचच घोषणाबाजी असला प्रकार नसल्यामुळे व मितभाषी स्वभावामुळे पोलिसांपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांनी मदतच केली. मध्यप्रदेश मध्ये लोक सायकल व त्यापाठोपाठ असणारी मोटरसायकल थांबवून आर्थिक मदत करायचे. आस्थेने विचारपूस करायचे. जेवण्यासाठी आग्रह धरायचे. हे प्रेम का बरं देत असतील... त्यांचं आमचं नात काय?? या प्रश्नांच उत्तर म्हणजे छत्रपती शिवराय!!

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। 
यशवन्त, कीर्तिवन्त। सामर्थ्यवन्त,वरदवन्त।
पुण्यवन्त, नीतिवन्त। जाणता राजा।। 

या जाणत्या राजाने जात- पात, धर्म, राज्यांच्या सीमा याचा विचार कधीच केला नाही. एतद्देशीयांचे म्हणजे स्वकीयांचे, प्रजेचे राज्य यावे, म्हणून ते आयुष्यभर झटले, झगडले, लढले. आज महापुरुषांना जातीच्या, धर्माच्या चौकटीतून पाहणारे करंटे आपण, महापुरुषांच्या विचारांची राखरांगोळी करतोय याचे भान ठेवत नाही.

९ एप्रिलला सायकवरून चालू झालेला प्रवास मजल दरमजल करत १४ एप्रिल रोजी पुण्यात पोचला. सातारच्या मातीतून पुण्याच्या कर्मभूमीत स्थिरावलेल्या सातारकरांना मग काय आनंद झाला. 'सातारा मित्र मंडळ' आणि पुणे स्थित 'कोपर्डे हवेली युवा मचं' यांनी या बारा मावळ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी बारामावळात केली. सर्वांच्या डोई मानाचे फेटे बांधले. छोटेखानी स्वागत सभा झाली. मस्त गोड जेवण बनवले गेले. अनेक दिवस स्वतः शिजवून जेवण खाणाऱ्या मावळ्यांचे घरच्या लोकांनी केलेल्या प्रेमाच्या जेवणाने मन तृप्त झाले. आता थोडी तरतरी आली. 'अन्नदाता सुखी भव' या सदिच्छा देऊन मावळ्यांनी रायगडच्या दिशेने कूच केले. या मित्रांचा उत्साह पाहून 'कोपर्डे हवेली युवा मचं' ज्यांच्या प्रेरणेने स्थापन झाला ते संजय चव्हाण(आबा) या सवंगड्यांसोबत पुणे-रायगड-कोपर्डे हवेली या प्रवासात सामील झाले.

हे तेरा मावळे १५ एप्रिलच्या संध्याकाळी रायगडवर पोचले. श्रीशिवछत्रपतींच्या पायावर मस्तक ठेऊन, आग्ऱ्याहुन आणलेली ज्योत होळीच्या माळावर असणाऱ्या सूर्याच्या चरणी ठेवली. समाधीचे दर्शन घेतले. जगदीश्वराचे दर्शन घेतले. शिवतीर्थ रायगडची धूळ मस्तकाला लावली आणि जन्मभूमीकडे कूच केले.
या प्रवासात सर्वसाधारणपणे सर्वांनी दीडशे ते दोनशे किलोमीटर सायकल आलटून पालटून चालवली. अभिजित चव्हाण यांनी एका दमात ८०/९० किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केला व एकूण प्रवासात २०० किलोमीटपेक्षा जास्त सायकल चालवली. गणेश चव्हाण २२५ व कृष्णत भोसले यांनी २९० किलोमीटर सायकल(रात्रीची) चालवली. कोणताही सराव नसताना किंवा सायकलपटू नसताना फक्त जिद्दीने हा प्रवास केला.(या मोहिमेत सहभागी असलेले गणेश चव्हाण हे प्रवसासाठी वापरलेल्या आयशर ट्रकचे मालक आहेत. त्यांचे मोठे बंधु 'बजरंग चव्हाण' हा माझा वर्गमित्र व गावातील एका सहकारी संस्थेचा चेअरमन आहे. सामाजिक कामात आपली वाहने(ट्रक, ट्रॅक्टर) कोणत्याही आर्थिक फायद्याविना ते देत असतात या व्यवहारीक जगात तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्या ठाई आहे. राज्याच्या सीमा ओलांडून एवढ्या दूरच्या प्रवासाला, एवढ्या दिवसाचे उत्पन्न बुडवून फक्त डिझेलच्या खर्चावर ट्रक देणे ही साधी गोष्ट नव्हे.)

शिवज्योतीचा प्रवास पुढे सुरू झाला... रायगडहुन पोलादपूर- महाबळेश्वर असा प्रवास करत सातारा जिल्ह्यात आगमन झाले, जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत झाले. सातारा जिल्ह्यातून (बहुतेक)प्रथमच कोणी आग्र्याहून शिवज्योत आणत असल्यामुळे लोकांना कुतूहल वाटले.
दि १७ एप्रिल रोजी भगवे फेटे बांधून कोपर्डे गावातील तरुण मंडळी स्वागतासाठी कराडच्या वेशीवर मोठ्या संख्येने उपस्थित होती. कराड शहरातून भव्य मिरवणूक काढून, दत्त चौकातील अश्वारूढ शिवमूर्तीचे दर्शन घेतले. नंतर शिवज्योत कोपर्डे हवेली गावात आली. 'वरुणराजाच्या' साक्षीने गावातून मिरवणूक काढली गेली....  तीस वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती झाली!!
(कोपर्डे गावात अनपेक्षित घडलेल्या दुःखद घटनेंमुळे मर्दानी खेळाचा कार्यक्रम तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द केले. शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांचा छोटेखानी सत्कार केला गेला.)

या मोहिमेत मी ज्यांना दादा म्हणतो, मला जे दादा म्हणतात (मोठा भाऊ या नात्याने) व माझे अगदी समवयस्क असे सवंगडी सामील झाले. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझ्या बालपणीच्या मित्रांनी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात एवढा मोठा पल्ला मोठ्या जिद्दीने सायकलवरून पार केला. आम्हाला जमले नाही ते करून दाखवले. मंडळाचे स्वप्न साकार केले. मला दुःख या गोष्टीचे होते की मी या क्षणांच्या अनुभवाला, या क्षणांचा साक्षीदार होण्याला मुकलो. मी दिल्ली, आग्रा पाहिले नाही असे नाही, ते पाहिले आहे. पण पर्यटक म्हणून...तिथे फक्त पर्यटन होते, इथे मनाचे संवर्धन आहे. आताच्या काळात आग्र्याला किंवा कुठूनही कुठे जाणे काहीच अवघड नाही. पण त्या ठिकाणी एका अनामिक ओढीने, धेय्याने, पडेल ते कष्ट हसत हसत सहन करून जाणे वेगळे! म्हणून त्याचे महत्वही वेगळे!!

कोणतेही चांगले सामजिक,सांस्कृतिक काम होण्यासाठी किंवा झालेल्या कृतीपाठीमागे, कृतींच्या स्फुर्तीमागे तितक्याच चांगल्या दृष्य आणि अदृष्य शक्ती असतात, आशीर्वाद असतात, शुभेच्छा असतात, सदिच्छा असतात. दृष्य गोष्टी दिसून येतात. त्या लोकांना सहज समजतात. अशा कृतीपाटीमागचे अदृष्य हात सहसा कोणाला दिसत नाहीत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास त्या हातांनी दिलेला असतो. तो विश्वास कृती करणाऱ्यांचे मनोबल वाढवतो. यात प्रकर्षाने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे..
सुदाम मारुती चव्हाण(तात्या), बाळासाहेब चव्हाण(नाना), शिवाजी अधिकाराव चव्हाण(दादा), गुरुदत्त चव्हाण(काका) या दोन जेष्ठ व दोन युवा आधारस्तंभांनी कायमच अशा कार्यात मंडळाला साथ दिली आहे. त्याच्या साथीनेच हे कार्य तडीस गेलेे आहे.
हरिपाठ मंडळ कोपर्डे हवेली, गावातील सर्व सार्वजनिक मंडळे, बजरंग चव्हाण(ट्रक देणारे), अशोक चव्हाण(मंडप डेकोरेशन), अंकुश शिंदे (मोटरसायकल देणारे), मनोज चव्हाण(सायकल देणारे), आणि बहुसंख्य कोपर्डेकर तरुण, ग्रामस्थ यांचे सहकार्य कालच्या कराडमधील मिरवणुकीत व एकूणच सर्व कार्यक्रमात लाभले.

गुरुवर्यांनी सांगितलेला एक श्लोक सांगून माझं लांबलेल माहितीपर मनोगत पूर्ण करतो..
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा!
जयच्या स्मृतीने जळे म्लेंच्छ बाधा!!
नुरे देश अवघा जयाच्या अभावी!
#शिवाजी' जपू राष्ट्रमंत्र प्रभावी!!
ज्यांनी 'शिवाजी' हा आपल्या जगण्याचा मंत्र केला त्यांना आयुष्यभर कसं वागावं याचं तंत्र अवगत होतं. आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी, दाखवलेले धाडस या जीवलगांना आणि मंडळाच्या इतर सदस्यांना कायम प्रेरणा देत राहील. या बद्दल शंका नाही.
अक्षय_त्रितीयेच्या_हार्दिक_शुभेच्छा!!
आपला मित्र...
©संदिप रामचंद्र चव्हाण





Sunday 15 April 2018

मराठी पुस्तक: छत्रपती शिवाजी महाराज जीवन_रहस्य

छत्रपती_शिवाजी_महाराज_जीवन_रहस्य

एखाद्या राष्ट्रपुरुषाला देवत्व बहाल केले, किंवा त्याला ईश्वरी अवतार मानले की त्याच्या जीवनातील संघर्षाचा, कर्तृत्वाचा, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायची आणि त्या राष्ट्रपुरुषाप्रमाणे आचरण करण्याचीही जबाबदारी राहत नाही. पळवाट शोधून पळायला सामान्य व्यक्ती नेहमीच तयार असतो. आपल्या देशात सध्या राष्ट्रपुरुषाना अशी देवत्व बहाल करण्याची स्पर्धा चालू आहे.

छत्रपती शिवरायांचा मानव्यपातळीवरून अभ्यास करायचा झाल्यास नरहर कुरुंदकर यांचे 'छत्रपती शिवाजी महाराज- जीवन रहस्य' हे अप्रतिम पुस्तक आहे. अवघ्या सहा प्रकरणात आणि साठ पानात त्यांनी शिवरायांचं 'जीवन-रहस्य' खूप मार्मिकपणे व्यक्त केलेलं आहे. 'श्रीमान योगी' या प्रसिध्द कादंबरीला कुरुंदकरांची प्रस्तावना लाभली आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य' हे त्याचं बहुदा शेवटचे पुस्तक आहे. या पुस्तकाची प्रस्तावना लिहताना कुरुंदकरांचे अकाली निधन झाले असा उल्लेख स.मा.गर्गे करतात.

जनतेला हा राजा ईश्वरीअंश का वाटला, यशाची खात्री नसतानाही औरंजेबाने स्वतः दख्खनच्या मोहिमेत उतरून शिवरायांचे राज्य संपवण्याचा विडा का उचलला, भारताच्या इतिहासात प्रथमच जनता राज्य वाचवण्यासाठी का लढली. याचा उहापोह केलेला आहे . शिवाय महाराजांचे धर्मविषयक धोरण, सैन्यउभारणी, आरमाराची बांधणी, प्रजेच्या हिताचा विचार, न्यायनिवाडे देण्याची रीत, युद्धातील यशापयश, शिवरायांचे नियोजन, नियोजनपूर्वक साहस, धक्कातंत्र, सैन्य व प्रजा यांचा संबध, शिवरायप्रती प्रजेची अभंग निष्ठा, राज्यभिषेक, औरंजेबच खरा शत्रू आहे व त्याच्या मुकाबल्याची तयारी, आरमाराची उभारणी, अनेपाक्षित मृत्यू या घटनांचा मागोवा या पुस्तकात लेखकांनी घेतला आहे. शिवचरित्राचा अभ्यास करताना हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.
कोणताही भपकेबाजपणा किंवा नाटकीपणा नसलेलं तरीही शिवरायांची खरी ओळख करून देणारं छोटंं पण मोठं पुस्तक..!!
संदिप रामचंद्र चव्हाण

मराठी पुस्तक:
छत्रपती शिवाजी महाराज- जीवन रहस्य
लेखक -नरहर कुरुंदकर
किंमत- ६०रु
प्रकाशन- इंद्रायणी साहित्य प्रकाशन, पुणे.
पृष्ठ :- ६०

Tuesday 10 April 2018

मामाचा गाव हरवलाय....

 मामाचा गाव हरवलाय ...आणि हरवलंय बालपण!
एकेकाळी सुंदर निसर्ग, प्रेमळ आजी-आजोबा, सुगरण मामी, बालहट्ट पुरवणारा मामा, मायेची मावशी-आत्या, लहान मोठे मामेभाऊ-आतेभाऊ ही सगळी मंडळी उन्हाळी सुटयामध्ये आजोळी भेटायची. उन्हाळ्याची सुट्टी म्हटले की ग्रामीण व शहरी भागातली मुले मामाच्या गावाला जायची. तेथे गेल्यावर भरपुर खेळायची, विटीदांडू, लगोऱ्या, आबाधबी, लपाछपी (इस्टॉप), चौलोस, गोट्टया, सुरपाट्या, लंगडी, सिगारेटची पाकिटे गोळा करून पाकिटाने खेळणे, पत्ते, सापशिडी असे खेळ असायचे. त्याचबरोबर सर्वजण पोहायला शिकायची, तास न् तास विहीरीत/नदीत डुंबायची, मौजमस्ती करायची. सुट्या लागल्या की मामा न्यायला येणार म्हणून बच्चेकंपनी खुश असायची. सर्व मावस भाऊ/बहीण आणि मामाची मुलं एकत्र आली की पायाला भिंगरी अन कानात वारा भरलेल्या वासरासारखी दिवसभर हुंदडायची.

आजची परिस्थिती मात्र झपाट्याने बदलत आहे.
एकेकाळच्या आठवणीतील सायकल गेली आणि बुलेट आली. बैलगाडीची जागा फोरव्हिलरने घेतली. सायकलवरून/बैलगाडीतुन फिरण्याची मजा बुलेट/फोरव्हीलरमध्ये कुठे आहे? खेळांचंही तेच झालं अंगणात, मैदानावर खेळले जाणारे खेळ बंध झाले. त्याची जागा मोबाईल, टॅबवरील गेम्सने घेतली. लोखसंख्या वाढीचा अन भोंगळ सरकारी नियोजनाचा फटका मैदानांना बसला त्यामुळे मैदाने कमी झाली आणि त्यावर मनसोक्त खेळणारी मुलंही.... ती गुंतली टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाइल मध्ये.

'गेले ते दिवस अन राहिल्या फक्त आठवणी' असे म्हणण्याची वेळ सद्या आली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनाचा, बदलत्या सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा फटका लहानग्यांच्या सुट्टीलाही बसला आहे. मामाचा चिरेबंदी वाडा कधीचाच ढासळला आहे. त्याजागी वन,टू,थ्री बीएचके फ्लॅट असणारी अनेक मजली अपार्टमेंट झाली आहेत. रो-हाउस, कडेकोड कंपाऊंड असणाऱ्या बंगलोंनी आपापली हद्दनिच्चीती केली आहे. अगदीच तसे नसले तरी प्रत्येक मामाची छोटीमोठी पण वेगवेगळी घरे झाली आहेत. एकत्र कुटुंब शोधून सापडत नाही. घरातील छोट्या मोठ्या वादविवादाने, प्रॉपर्टीसाठी होणाऱ्या भांडणाने, म्हातारा/म्हातारीचा (काही ठिकाणी म्हाताऱ्या आई वडिलांना बोलण्याची पध्द्त) सांभाळ कुणी करायचा यावरून भावाभावांचे पटत नाही. या कारणातून सक्के भाऊ पक्के वैरी होतात. मुलीला वडिलोपार्जित संपत्ती मध्ये हक्क मिळाल्यामुळे काही ठिकाणी सासुरवासिनीला माहेरच्या संपत्ती/शेतीवाडीत हक्क मागायला लावणारा नवरा, सासू-सासरे भेटतात. याकारणाने बहीण-भावाच्या नात्यात दुरावा येतो. मनं कलुषित होतात. त्याचा परिणाम भाच्यांचे आजोळ कायमचे तुटण्यात होतो.

काळाच्या ओघात आधुनिक मामा पोटापाण्यासाठी आजोळातून हद्दपार झाला. रोजगारासाठी दूरच्या शहरात, अगदी परदेशात स्थिरावला. मामाला वेळ असेल तेव्हा भाच्यांची शाळा असते व भाच्याना सुट्ट्या असतील तेव्हा मामाला वर्कलोड असतोे. त्यामुळे भाच्यांसाठी वेळ द्यायला मामाकडे वेळच नाही. 'मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीच्या नोटा....' बालगीतातील या ओळींचा खराखुरा प्रत्यय येऊ लागला आहे. मामा राहत असलेला गाव(शहर) खूप मोठा आहे. मामाकडे पैसाही आला आहे पण या मोठ्या गावात भाच्यांचा जीव लागत नाही. पैशाच्या नोटा त्यांना नको आहेत. त्यांना हवी असणारी मायेची माणसं त्या ठिकाणी भेटत नाहीत. मामाच्या मोठ्या गावी आणि नवीन घरी आजी आजोबांना स्थान नाही. असलेच तर घरात त्यांना किंमत नाही. एके काळी आजोबांचा असणारा दरारा आता राहिला नाही. सगळ्या घराचं ओझं वागवणारे आजी आजोबा आता मुलांना ओझं वाटत आहेत. आजी-आजोबा स्वतःच परावलंबी(?) असल्याने नातवंडांना हवं ते देऊ शकत नाहीत. जॉब करणाऱ्या मामीला स्वतःचाच डबा करायला वेळ नाही. असलाच वेळ तर टीव्ही, मोबाईलमधून सवड नाही अन स्वयंपाकाची आवड नाही. त्यामुळे 'रोज रोज पोळी शिकरण' हे बोलणं बालगीतापूरतं मर्यादित राहिलं आहे. त्यातच ती कॅलरी कॉन्शन असल्यामुळे रोज रोज पोळी शिकरण करण्याची शक्यताही नाही. या व अशा कारणाने भाच्यांचे मन इथे लागत नाही.

गेल्या पंचवीस/तीस वर्षाचा विचार केल्यास त्यावेळी असणारे भाचे/भाच्या आज मामा/मामीच्या व पालकाच्या भूमिकेत आहेत. हे नवपालक व अलीकडचे मामा/मामी जरा जास्तच जगरूक झालेत. आपल्या मुलांना सुट्टीमध्ये मनसोक्त खेळु बागडू न देता, वेगवेगळ्या व्हेकेशन कँम्पला, पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या ट्युशनक्लासला त्यांची ऍडमिशन घेतात. त्यांचं बालपण हिरावतात. त्रिकोणी, चौकोनी कुटुंबात सगळंच कस आखीव, रेखीव असतं. तिथे दंगामस्तीला वावच नसतो. शिस्तीचा तर अतिरेखच असतो. आपल्या लहानपणी आपण काय करत होतो याचा विसर पाडून मुलांचं बालपण हिरावून घेण्यात नवपालकांनी मोठीच आघाडी घेतली आहे. कुटुंबांच्या नॅनो आवृत्तीमुळे मुलांना अनेक नात्यांना मुकावे लागत आहे. त्याची परिणीती मामाचा गाव हरवण्यात होत आहे.

एकुलता एक, एकुलती एक या कारणाने मुलांवर अतिप्रेम. मुलांना कुणी रागावलेलं पालकांना चालत नाही. मुलं एकत्र येऊन वादविवाद होतात. एकत्र जमल्याचा निर्भेळ आनंद घ्यायचा सोडून माझी मुलं इतरांच्या मुलापेक्षा किती हुशार,ऍक्टिव्ह दाखवण्यात मुलांच्या 'मम्मी' वेळ दवडतात. काहीवेळा यातून माहेरी आलेल्या बहिणी बहिणीच्या नात्यात, नणंद भावजयच्या नात्यामध्ये दुरावा येतो. 
शिवाय आता सुट्ट्या चालू होण्याआधी वेगवेगळ्या प्रसिध्द, जगप्रसिद्ध ठिकाणी फ़िरायला जायचे प्लॅनिग झालेले असते. यातून वेळ मिळाला तर मामाचा गाव. तेही अगदी मोजके दिवस. जातानाच येतानाचे रिझर्व्हेशन नक्की केलेले असते. किती दिवस राहणार? याचे उत्तर त्यातच दडलेले असते. अशी सर्व परिस्थिती आहे.

काळ बदलला, वेळ बदलली. अनेक गोष्टी बदलल्या. याचा परिणाम मामा अन मामाच्या गावावरही झाला. रोजगाराचा प्रश्न मोठा असल्यामुळे खेडेगावातील/ छोट्या शहरातील तरुणांना गाव सोडून नोकरी धंद्याला बाहेर पडावेच लागते. या गोष्टीला पर्याय राहिला नाही. स्वतःच्या गावाबद्दल अन मायेच्या नात्याबद्दल कितीही ओढ वाटत असली तरी आहे त्या परिस्थितिचा स्वीकार केल्यावाचून गत्यंतर नसते. सगळ्याच भाच्याना मामाचा गाव दुरावलाय असं नाही. बदललेल्या परिस्थितीत ही भरपूर ठिकाणी आशादायक चित्र आहे. अजूनही कुटुंब एकत्र येतात. सणवार,उत्सव,लग्नकार्य,जावळ,जत्रा याचा आनंद घेतात. जमेल तसा वेळ काढून व काही तडजोडी करून ही मंडळी एकमेकांना भेटतात. 
काही ठिकाणी नवी पिढी अधिक समजूतदार वागताना दिसते. भाऊबंदकी, वाद विवाद टाळताना दिसते. भावा भावात पटत नसेल तर सामंजस्याने स्वतंत्र राहते. त्यामुळे कलह टळतात. दूर असले तरी नाती टिकून राहतात.

गाव असो की शहर, देश असो की परदेश कुठंही राहत असलो तरी ठराविक वयोगटापर्यंत मामाचा गाव प्रिय असतो. आता मात्र मामाचा गाव हरवलाय, ती मायेची माणसं हरवलीत, ते निरागस बालपण हरवलंय…... त्यांना शोधण्याचे, एकत्र आणण्याचे काम मामा-भाच्यांनाच करावे लागेल ना!!.. तर चला! या सुट्टीत सर्वांना एकत्र बोलावूया... हरवलेल्या बालपणाला पुन्हा शोधुया..... मामाच्या गावाला जाऊन सुट्टीचा आनंद द्विगुणीत करूया!😇
समाप्त.
©संदिप रामचंद्र चव्हाण.

एक होता मामाचा गाव... हा पहिला भाग वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
https://sandiprchavan.blogspot.in/2018/04/blog-post.html?m=1

Monday 9 April 2018

एक होता मामाचा गाव...

एक_होता_मामाचा_गाव...
वार्षिक परीक्षा संपल्या की वेध लागतात ते उन्हाळी सुट्ट्यांचे! उन्हाळी सुट्यांना काय काय करायचे हे बालगोपालांचे आधीच ठरलेले असते. एकूण नियोजनात मामाच्या गावाला जायचं हे नक्की असायचे. 'झुकु झुकु झुक आगीणगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया...' असं बालगीत वर्षोनीवर्षं लोकप्रियतेच्या शिखरावर असण्याचे कारण म्हणजे मामाच्या गावाबद्दल असणारं प्रेम, आकर्षण, जिव्हाळा होय. मामा-भाचे/भाच्या हे नाते कमालीचं प्रेमळ नातं. लहान मुलांना मामा सुपरहिरोपेक्षा काही कमी नव्हता. भाच्याना रानामाळात, नदीकाठी, डोंगरावर, फिरायला घेऊन जाणारा. विहरीत, नदीत पोहायला शिकवणारा. छान छान कपडे घेणारा, त्यांच्याशी खेळणारा, पुढे बसवून सायकलवरून फिरवणारा मामा म्हणजे भाच्यांच जणू सर्वस्व होतं! परिस्थिती कशीही असो भाच्यांचे शक्य ते सर्व बालहट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न मामा करत होता. 'मामा होणे' व 'मामा बनणे/बनवणेे' या साधर्म्य असणाऱ्या वाक्यप्रचाराचे वेगवेगळे अर्थ निघतात. 'मामा बनवणे' म्हणजे एखाद्याने फसवणे. वेड्यात काढणे इत्यादी अर्थ होतो. असे असले तरी मामाने ही गोष्ट कधी मनावर घेतली नाही आणि मामा भाच्याच्या नात्यात अंतरही कधी पडलं नाही.

मामाच्या गावात आणि चिरेबंदी वाड्यात अजून कोण कोण होतं?
काही वर्षांपूर्वी पर्यंत दोन मामा, चार मावश्या, मामाची मुलं, मावशीची मुलं, आजी, आजोबा असा खटला असायचा. सगळी भाचरं उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आजोळी आली की मामाचं घर गजबजून जायचं. नऊवारी साडी नेसणारी आजी नातवंडांवरून भाकर तुकडा ओवाळून त्यांना घरात घ्यायची. सुग्रण मामी छान छान स्वयंपाक बनवायची. त्यावर आजीची बारीक नजर असायची. नातवंडांना दूध दुपत, दही, ताक, लोणी, तूप भरपूर खायला मिळावं म्हणून दुधाची भरलेली किटली डेअरीकडे न जाता घरातच रीती व्हायची. विस्तवाच्या आरावर तापलेल्या दुधाची खरपूस साय नातवंडांना देणारी आजी राहिलेल्या साईचे दही लावायची. दह्याचे ताक रवीने घुसळायची. लोण्याचा गोळा काढून आवडेल त्याला द्यायची. राहिलेले लोणी कडवून तूप काढायची. तुपाची धार भातावर धरायची. अंगणात टाकलेल्या सतरंजीवर चांदण्याच्या प्रकाशात तूप- भात चारताना रामायण, महाभारतातील गोष्टी आजी सांगायची. आजीच्या लुगड्याला तोंड पुसून आकाशातल्या चांदण्या मोजत आणि आजीची गोष्ट ऐकत कधी झोप लागायची याचा सुट्टीला जमलेल्या नातवंडांना पत्ताच नसायचा.

कधी शेतातून तर कधी आठवडी बाजारातून जांभळं, बोरं, आंबे, द्राक्षे, कलिंगड, काकडी आणणारे व गारेगार बॉंम्बेगोळा घेण्यासाठी चार आने (बंध झाले) ते दोन, दोन रुपयाची नोट हातावर ठेवणारे, यात्रेत कुस्त्या, बैलगाडा शर्यत बघायला घेऊन जाणारे आजोबा म्हणजे आजोळच्या घरातील 'हेड ऑफ डिपार्टमेंट' असायचे. त्यांचे सगळ्यावर वजन असायचे. आजोबा घरी येताच सगळे चिडीचूप बसायचे. हा दरारा असला तरी नातवंडांना ते प्रेमाने जवळ घ्यायचे. आजोबा शेतात जाताना बैलगाडी जुंपायचे. सर्व भाचे मंडळी त्यात बसायची. आजोबा हातातल्या कासऱ्याला हिसका द्यायचे तसे बैलगाडीची चाकं करकर आवाज करत राणाची वाट धरायची. गाडीखाली 'मोत्या' नावाचा कुत्रा चालायचा. रानात गाडी सोडून बैलांना वैरण पाणी दाखवले की आजोबा आंब्याच्या कैऱ्या काढून त्याला हळद, मीठ लाऊन सर्वाना खायला द्यायचे. मामा आपल्या भाच्याना एक एक करून विहरीत पोहायला शिकवत असताना आजोबा विहरीच्या काठावर बसून लक्ष ठेवायचे. धोतर नेसणारे, तीन बटनाचा शर्ट, डोक्यावर टोपी किंवा कोशापटका बांधणारे आजोबा मोठेच रुबाबदार दिसायचे.
नातवंडांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे असे आजी-आजोबा ज्यांना लाभले ते भाग्यवान!

'माय मरो पण मावशी जगो' अशी ख्याती लाभलेली व स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रेम करणारी मावशी. न कंटाळता गोड-धोड स्वयंपाक करून देणारी मामी. आपली कपडे, अंथरून पांगरून, खेळणी 'शेअर' करणारी मामाची मुलं, अन आजी-आजोबा ही सर्व मायेची माणसं भेटतात ती आईच्या माहेरी व आपल्या आजोळी!  गरीब असो की श्रीमंत, राजा असो की रंक, माहेरची परिस्थिती कशीही असो, सासुरवासिनीला आपलं माहेर प्राणांहून प्रिय असतं. पुढे मुलं झाली की हे रक्ताचं माहेर मुलांना आजोळ म्हणून प्रिय असत.

बालपणात आईचं माहेर प्रिय असतं तर तरुणपणात त्याची जागा बायकोचं माहेर घेतं. वृद्धपकाळात पोटची मुलं सांभाळत नसतील तर मुलीच्या सासरचा आधार वाटतो. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या नात्यांचा त्याच्या वागण्यातील बदलाचा फरक जाणवतो. लहानपणी आईवडीलांना सर्वस्व मानणारे बाळ मोठं झालं की आईवडिलांना आडगळीत टाकतं आणि बायकोला सर्वस्व मानतं. पुढे ते प्रेम स्वतःच्या मुलांवर बसतं व मुलांना मुलं झाल्यावर तेच प्रेम नातवंडांवर बसतं. जीवनाचं रहाटगाडगगं असंच चालू असतं. आजोळही अशा बदलला अपवाद नसतं. काहीही असलं तरी वयाच्या एका टप्प्यापर्यंत मामाचा गाव अन त्याला वेगळाच भाव असतो. त्या वेगळ्याचं भावाचा सध्या अभाव जाणवतोय... मामाचा गाव मात्र, आता हरवतोय.....😢
क्रमशः

©संदिप रामचंद्र चव्हाण
पुढील भाग येथे वाचा..
https://sandiprchavan.blogspot.in/2018/04/blog-post_10.html?m=1