My Blog List

Thursday 19 April 2018

एका सार्वजनिक मंडळाची अनोखी स्वप्नपूर्ती....

एका_सार्वजनिक_मंडळाची_अनोखी_स्वप्नपूर्ती....
किल्ले_आग्रा_ते_कोपर्डे_हवेली(ता:कराड;जि:सातारा) मार्गे_किल्ले_श्रीरायगड शिवज्योत प्रवास...

महाराष्ट्रात शिवछत्रपतींच्या जयंती निमित्त शिवस्पर्शाने पावन झालेल्या गडकोटांवरुन शिवज्योत(मशाल) पेटवून आणण्याची परंपरा खुप वर्षांपासून सुरू आहे.
शिवस्पर्शाने, त्यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ठिकाणी जाऊन प्रेरणा मिळते. इतिहास समजून घेण्याची लालसा निर्माण होते. शिवजयंतीचे औचित्य साधून अशा ठिकाणाहून शिवज्योतिच्या रूपाने प्रेरणा घेऊन, तरुण मंडळे आपल्या मूळ गावी परततात. जे लोकं गडकोटांवर जाऊ शकत नाहीत त्यांना या शिवज्योतिच्या दर्शनाचे समाधान लाभते. धर्मवीर_संभाजी_मंडळ कोपर्डे हवेली, ता कराड, जि सातारा. यांनी ही परंपरा गेली तीस वर्षे अखंडपणे जपलेली आहे.
  कराड तालुक्यातील कृष्णाकाठी वसलेले #कोपर्डे_हवेली हे दहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. शेती हा मुख्य आधार असलेल्या या गावात सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी धपडणारी अनेक तरुण मंडळे आहेत. धर्मवीर संभाजी मंडळ हे त्यापैकीच एक. मंडळाची स्थापना १९८८ साली झाली. गेली ३० वर्षे शिवजयंतीउत्सव, गणेशोत्सव अखंडपणे साजरा केला जात आहे. या तीस वर्षात तरुणांच्या तीन पिढ्या झाल्या.  १९८८ ते १९९८, १९९८ ते २००८ आणि २००८ ते २०१८ अश्या दहा दहा वर्ष्याच्या कालखंडात जुनी पिढी नोकरी धंद्यानिमित बाहेर पडली आपल्या संसाराला लागली. पुढील पिढीने मंडळाचे काम नेटाने चालवले. सध्या पहिली पिढी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहे. दुसरी पिढी आता थोडी मागल्या पावलावर आहे आणि तिसरी पिढी मंडळाची धुरा सांभाळून आहे. आपले शिक्षण, रोजगार पाहून प्रतिकूल परिस्थितीत सामजिक काम करत एकमेकांप्रती स्नेह, मैत्री, जिव्हाळा जपून, सर्व जुने जाणते सदस्य मार्गदर्शक म्हणून तर नवीन पिढी धडाडीचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहे.
मंडळाच्या स्थापनेपासून मंडळातील सदस्यांनी एक स्वप्न पाहिले होते.... शिवस्पर्शाने पावन झालेल्या आग्ऱ्याच्या किल्ल्याहून कोपर्डे हवेलीत शिवज्योत आणायची.

साधनांची कमतरता, आर्थिक परिस्थिती, व प्रत्येवेळी काहीतरी अडथळा त्याचबरोबर धकाधकीच्या आयुष्यात दहा बारा दिवस वेळ काढणे म्हणजे अशक्य कोटीतील गोष्ट. या व अश्या कारणामुळे हे स्वप्न दिवास्वप्न ठरतंय कि काय अशी स्थिती झाली. मी ज्यावेळी या मंडळाचा सक्रिय सभासद म्हणून काम पाहू लागलो तो काळ म्हणजे १९९८ ते २००८/०९ त्यावेळीही तेच स्वप्न तीच चर्चा शिवजयंतीच्या दरम्यान दरवर्षी चालू असायची. तोपर्यंत तरी जिल्ह्यातून १७०० किलोमीटरचा एवढा मोठा प्रवास करून शिवज्योत कोणी आणलेली नव्हती. हे कार्य पार पाडायचे असं एकदा नियोजनही झालं. या दरम्यानच्या काळात मंडळाचे अनमोल रत्न 'दत्तात्रय चव्हाण' काळाने हिराऊन घेतले.😢 पुढे असेच दोन धक्के बसले. आणि पुन्हा हा विषय लांबणीवर पडला. गेल्या पाच सहा वर्षात मंडळाची तिसरी पिढी कामाला लागली. जेष्ठांची पहिली पिढी सदैव पाठीशी तर दुसरी पिढी आर्थिक भार उचलायला नेहमी तयार राहिली..... आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी हे शिवधनुष्य उचलले..... तीस वर्षाचं स्वप्न सत्यात उतरणारा तो दिवस आला...
दि.५ एप्रिल २०१८ रोजी बारा 'मावळे' आग्ऱ्याच्या दिशेने कूच झाले. लक्ष्मण कृष्णत साळवे(दादा), जयवंत उर्फ सिद्धनाथ बाबुराव चव्हाण, अभिजित सुदाम चव्हाण, गोरख रामचंद्र चव्हाण, गणेश भीमराव चव्हाण, विक्रम भानुदास चव्हाण, गणेश बाबासो साळवे, नितीन अरुण तुपे, कृष्णत सुभाष भोसले, सचिन अर्जुगडे, अंकुश लक्ष्मण शिंदे आणि वाहन चालक अनिकेत गोसावी ही ती मंडळी होय.
आयशर ट्रक, एक सायकल, एक मोटरसायकल, जेवन बनवण्यासाठी गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, जेवणाचे साहित्य इत्यादी आवश्यक गोष्टी बरोबर घेऊन ही मंडळी कराड-पुणे-गुजरात मार्गे- राजस्थान(जयपूर)- दिल्ली(लाल किल्ला)- आग्रा असा प्रवास करून ९ एप्रिलच्या सकाळी आग्ऱ्याच्या किल्यावर पोचली. किल्ला पाहून दुपारी शिवज्योत पेटवली. आणि सायकलरुन प्रवास चालू झाला... किल्ले आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली.

सामान्य घरातील पोरं जेव्हा एखाद्या स्वप्नाने वेडी होतात तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी खूप धडपडतात. आणि असामान्य काम करून दाखवतात. जे लोकं काहीतरी करण्याचे स्वप्न पाहतात ते त्या दिशेने कृती करतात. जीे लोकं स्वप्ने पाहतच नाहीत, त्यांना काहीच करता येत नाही. स्वप्न पाहणे हा अर्धा भाग असतो, ही स्वप्ने व्यवहारात साकार करणे हा उरलेला अर्धा भाग असतो. जे फक्त स्वप्नेच पाहतात ते फार तर कवी होऊ शकतात. ज्यांच्यात काही करून दाखवण्याची धमक असते ते स्वप्नांच्या पुर्तीसाठी झटतात.

गेली पावणेचारशे वर्षे 'शिवाजी' नावाची जादू सर्वसामान्य जनतेच्या हृदयावर राज्य करत आहे. आपल्या देशात एखाद्या राजाला ईश्वरी अंश मानले गेले, त्याला देवत्व बहाल केले असे एकमेव शिवछत्रपती!! कोट्यवधींच्या कल्याणाची स्वप्न पाहणाऱ्या राजाचा इतिहास भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना कळावा, त्यांच्या उपसलेल्या कष्टाचा एक अंश जीवन आपण जगून पहावं म्हणून 'आग्रा ते रायगड' शिवज्योत आणणे हा प्रपंच!!

या मोहिमेत सहभागी बारा मावळ्यांनी जातानाच्या प्रवासात घरूनच सोबत न्हेलेल्या शिदोरीवर दिवस काढले. तर परतीच्या प्रवासात स्वतः अन्न शिजवून पोट भरले. हॉटेलमध्ये जाऊन चमचमीत खाऊन जिभिचे चोचले भागवण्यासाठी हा एवढा मोठा प्रवास नाही. त्यासाठी आलोही नाही याचे भान त्यांनी ठेवले. शिवरायांच्या मावळ्यांना सुपारीच्या खांडाच व्यसन नव्हतं, हे आमच्यावर आमच्या वडीलधार्यांनी कायमच बिंबवलेलं आहे. त्यामुळे दारू पिऊन शिवजयंती करतात हे बोलणार्यांनी अशा तरुणांची एकदा भेट घ्यायला हवी. प्रतिकूल परिस्थितीत कसे रहायचे. त्या परिस्थितीत कसा संघर्ष करायचा. आपल्या ध्येयापर्यंत कसे पोचायचे. त्यासाठी नियोजन, शिस्त, प्रामाणिकपणा, चारित्र्य या गोष्टी कशा महत्वाच्या असतात याचे बाळकडू शिवचरित्रात आपल्याला वाचायला मिळते. आग्रा ते रायगड प्रवास करताना तसे जगायला मिळते.

हा प्रवास करताना या तरुणांनी दिवसरात्र आलटून पालटून सायकल चालवली. त्यांच्या अनुभवावरून त्यांना असं जाणवलं की बाहेरच्या राज्यात शिवरायांना मानणारा, त्यांच्या बद्दल कुतुहल असणारा खूप मोठा वर्ग आहे. शिवरायांची प्रतिमा, डिजिटल फेक्स, भगवा झेंडा ई. ट्रकला लावले असल्यामुळे लोक आस्थेने चौकशी करायचे. दिल्लीसारख्या शहरात दिवसा अवजड वाहनांना प्रवेश नसलेल्या ठिकाणीही त्यांची अडवणूक झाली नाही. (वाहनाची सर्व कागदपत्रे, इन्शुरन्स, पियुसी असे कायदेशीर सर्व आवश्यक बाबी सोबत होत्या.) गडबड गोंधळ, उगाचच घोषणाबाजी असला प्रकार नसल्यामुळे व मितभाषी स्वभावामुळे पोलिसांपासून ते सामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांनी मदतच केली. मध्यप्रदेश मध्ये लोक सायकल व त्यापाठोपाठ असणारी मोटरसायकल थांबवून आर्थिक मदत करायचे. आस्थेने विचारपूस करायचे. जेवण्यासाठी आग्रह धरायचे. हे प्रेम का बरं देत असतील... त्यांचं आमचं नात काय?? या प्रश्नांच उत्तर म्हणजे छत्रपती शिवराय!!

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। 
यशवन्त, कीर्तिवन्त। सामर्थ्यवन्त,वरदवन्त।
पुण्यवन्त, नीतिवन्त। जाणता राजा।। 

या जाणत्या राजाने जात- पात, धर्म, राज्यांच्या सीमा याचा विचार कधीच केला नाही. एतद्देशीयांचे म्हणजे स्वकीयांचे, प्रजेचे राज्य यावे, म्हणून ते आयुष्यभर झटले, झगडले, लढले. आज महापुरुषांना जातीच्या, धर्माच्या चौकटीतून पाहणारे करंटे आपण, महापुरुषांच्या विचारांची राखरांगोळी करतोय याचे भान ठेवत नाही.

९ एप्रिलला सायकवरून चालू झालेला प्रवास मजल दरमजल करत १४ एप्रिल रोजी पुण्यात पोचला. सातारच्या मातीतून पुण्याच्या कर्मभूमीत स्थिरावलेल्या सातारकरांना मग काय आनंद झाला. 'सातारा मित्र मंडळ' आणि पुणे स्थित 'कोपर्डे हवेली युवा मचं' यांनी या बारा मावळ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी बारामावळात केली. सर्वांच्या डोई मानाचे फेटे बांधले. छोटेखानी स्वागत सभा झाली. मस्त गोड जेवण बनवले गेले. अनेक दिवस स्वतः शिजवून जेवण खाणाऱ्या मावळ्यांचे घरच्या लोकांनी केलेल्या प्रेमाच्या जेवणाने मन तृप्त झाले. आता थोडी तरतरी आली. 'अन्नदाता सुखी भव' या सदिच्छा देऊन मावळ्यांनी रायगडच्या दिशेने कूच केले. या मित्रांचा उत्साह पाहून 'कोपर्डे हवेली युवा मचं' ज्यांच्या प्रेरणेने स्थापन झाला ते संजय चव्हाण(आबा) या सवंगड्यांसोबत पुणे-रायगड-कोपर्डे हवेली या प्रवासात सामील झाले.

हे तेरा मावळे १५ एप्रिलच्या संध्याकाळी रायगडवर पोचले. श्रीशिवछत्रपतींच्या पायावर मस्तक ठेऊन, आग्ऱ्याहुन आणलेली ज्योत होळीच्या माळावर असणाऱ्या सूर्याच्या चरणी ठेवली. समाधीचे दर्शन घेतले. जगदीश्वराचे दर्शन घेतले. शिवतीर्थ रायगडची धूळ मस्तकाला लावली आणि जन्मभूमीकडे कूच केले.
या प्रवासात सर्वसाधारणपणे सर्वांनी दीडशे ते दोनशे किलोमीटर सायकल आलटून पालटून चालवली. अभिजित चव्हाण यांनी एका दमात ८०/९० किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केला व एकूण प्रवासात २०० किलोमीटपेक्षा जास्त सायकल चालवली. गणेश चव्हाण २२५ व कृष्णत भोसले यांनी २९० किलोमीटर सायकल(रात्रीची) चालवली. कोणताही सराव नसताना किंवा सायकलपटू नसताना फक्त जिद्दीने हा प्रवास केला.(या मोहिमेत सहभागी असलेले गणेश चव्हाण हे प्रवसासाठी वापरलेल्या आयशर ट्रकचे मालक आहेत. त्यांचे मोठे बंधु 'बजरंग चव्हाण' हा माझा वर्गमित्र व गावातील एका सहकारी संस्थेचा चेअरमन आहे. सामाजिक कामात आपली वाहने(ट्रक, ट्रॅक्टर) कोणत्याही आर्थिक फायद्याविना ते देत असतात या व्यवहारीक जगात तेवढा मनाचा मोठेपणा त्यांच्या ठाई आहे. राज्याच्या सीमा ओलांडून एवढ्या दूरच्या प्रवासाला, एवढ्या दिवसाचे उत्पन्न बुडवून फक्त डिझेलच्या खर्चावर ट्रक देणे ही साधी गोष्ट नव्हे.)

शिवज्योतीचा प्रवास पुढे सुरू झाला... रायगडहुन पोलादपूर- महाबळेश्वर असा प्रवास करत सातारा जिल्ह्यात आगमन झाले, जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत झाले. सातारा जिल्ह्यातून (बहुतेक)प्रथमच कोणी आग्र्याहून शिवज्योत आणत असल्यामुळे लोकांना कुतूहल वाटले.
दि १७ एप्रिल रोजी भगवे फेटे बांधून कोपर्डे गावातील तरुण मंडळी स्वागतासाठी कराडच्या वेशीवर मोठ्या संख्येने उपस्थित होती. कराड शहरातून भव्य मिरवणूक काढून, दत्त चौकातील अश्वारूढ शिवमूर्तीचे दर्शन घेतले. नंतर शिवज्योत कोपर्डे हवेली गावात आली. 'वरुणराजाच्या' साक्षीने गावातून मिरवणूक काढली गेली....  तीस वर्षांपासून पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती झाली!!
(कोपर्डे गावात अनपेक्षित घडलेल्या दुःखद घटनेंमुळे मर्दानी खेळाचा कार्यक्रम तसेच इतर सर्व कार्यक्रम रद्द केले. शिवज्योत घेऊन येणाऱ्या मावळ्यांचा छोटेखानी सत्कार केला गेला.)

या मोहिमेत मी ज्यांना दादा म्हणतो, मला जे दादा म्हणतात (मोठा भाऊ या नात्याने) व माझे अगदी समवयस्क असे सवंगडी सामील झाले. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की माझ्या बालपणीच्या मित्रांनी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात एवढा मोठा पल्ला मोठ्या जिद्दीने सायकलवरून पार केला. आम्हाला जमले नाही ते करून दाखवले. मंडळाचे स्वप्न साकार केले. मला दुःख या गोष्टीचे होते की मी या क्षणांच्या अनुभवाला, या क्षणांचा साक्षीदार होण्याला मुकलो. मी दिल्ली, आग्रा पाहिले नाही असे नाही, ते पाहिले आहे. पण पर्यटक म्हणून...तिथे फक्त पर्यटन होते, इथे मनाचे संवर्धन आहे. आताच्या काळात आग्र्याला किंवा कुठूनही कुठे जाणे काहीच अवघड नाही. पण त्या ठिकाणी एका अनामिक ओढीने, धेय्याने, पडेल ते कष्ट हसत हसत सहन करून जाणे वेगळे! म्हणून त्याचे महत्वही वेगळे!!

कोणतेही चांगले सामजिक,सांस्कृतिक काम होण्यासाठी किंवा झालेल्या कृतीपाठीमागे, कृतींच्या स्फुर्तीमागे तितक्याच चांगल्या दृष्य आणि अदृष्य शक्ती असतात, आशीर्वाद असतात, शुभेच्छा असतात, सदिच्छा असतात. दृष्य गोष्टी दिसून येतात. त्या लोकांना सहज समजतात. अशा कृतीपाटीमागचे अदृष्य हात सहसा कोणाला दिसत नाहीत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा विश्वास त्या हातांनी दिलेला असतो. तो विश्वास कृती करणाऱ्यांचे मनोबल वाढवतो. यात प्रकर्षाने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे..
सुदाम मारुती चव्हाण(तात्या), बाळासाहेब चव्हाण(नाना), शिवाजी अधिकाराव चव्हाण(दादा), गुरुदत्त चव्हाण(काका) या दोन जेष्ठ व दोन युवा आधारस्तंभांनी कायमच अशा कार्यात मंडळाला साथ दिली आहे. त्याच्या साथीनेच हे कार्य तडीस गेलेे आहे.
हरिपाठ मंडळ कोपर्डे हवेली, गावातील सर्व सार्वजनिक मंडळे, बजरंग चव्हाण(ट्रक देणारे), अशोक चव्हाण(मंडप डेकोरेशन), अंकुश शिंदे (मोटरसायकल देणारे), मनोज चव्हाण(सायकल देणारे), आणि बहुसंख्य कोपर्डेकर तरुण, ग्रामस्थ यांचे सहकार्य कालच्या कराडमधील मिरवणुकीत व एकूणच सर्व कार्यक्रमात लाभले.

गुरुवर्यांनी सांगितलेला एक श्लोक सांगून माझं लांबलेल माहितीपर मनोगत पूर्ण करतो..
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा!
जयच्या स्मृतीने जळे म्लेंच्छ बाधा!!
नुरे देश अवघा जयाच्या अभावी!
#शिवाजी' जपू राष्ट्रमंत्र प्रभावी!!
ज्यांनी 'शिवाजी' हा आपल्या जगण्याचा मंत्र केला त्यांना आयुष्यभर कसं वागावं याचं तंत्र अवगत होतं. आग्रा ते किल्ले श्रीरायगड ते कोपर्डे हवेली या मोहिमेतून मिळालेल्या अनुभवाची शिदोरी, दाखवलेले धाडस या जीवलगांना आणि मंडळाच्या इतर सदस्यांना कायम प्रेरणा देत राहील. या बद्दल शंका नाही.
अक्षय_त्रितीयेच्या_हार्दिक_शुभेच्छा!!
आपला मित्र...
©संदिप रामचंद्र चव्हाण





No comments:

Post a Comment