My Blog List

Saturday 26 May 2018

मराठी विश्वकोश

मराठी विश्वकोश: ज्ञानाचा सागर आता एका क्लिकवर.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य स्थापणेच्यावेळी राज्यकारभारासंबधी काही मुलभूत धोरणे सांगितली. या धोरणानुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या वाढीसाठी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळाची’ स्थापना १९ नोव्हेंबर १९६० रोजी झाली. या साहित्य मंडळाने सर्वसंग्राहक विश्वकोश संपादित करून प्रकाशित करणे असे काम हाती घेतले. मराठी विश्वकोश निर्मिती हा महाराष्ट्र शासनाचा एक प्रकल्प मान्य झाल्यानंतर वाई येथे या प्रकल्पाची स्थापना झाली.
मह्याराष्ट्रातील थोर विचारवंत आणि संस्कृत पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांची या मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून नियुक्ती करण्यात आली. नंतर पुढे १९८० साली मह्याराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे विभाजन करण्यात आले आणि मराठी विश्वकोशाच्या प्रकल्पासाठी ‘मह्याराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ हे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आले. ह्या स्वतंत्र मंडळाच्या अध्यक्षपदी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ह्यांची नियुक्ती तशीच ठेवण्यात आली. ह्या प्रकल्पाच्या अगदी आरंभापासून ते २७ मे १९९४ रोजी त्यांचे निधन होईपर्यंत ते मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते.  मराठी विश्वकोशाचे पहिले पंधरा खंड (१९७६-९५) त्यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली तयार झाले. त्यांच्या नंतर मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक म्हणून प्रा. मे. पु. रेगे ह्यांची नियुक्ती करण्यात आली.

मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष व कार्यकाल...
१) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. १९ नोव्हेंबर १९६० ते २७ मे १९९४
२) प्रा. मेघश्याम पुंडलिक रेगे. ४ जून १९९४ ते २८ डिसेंबर २०००
३) प्रा. रा. ग. जाधव. १६ जानेवारी २००१ ते १० फेब्रुवारी २००३
४) डॉ. श्रीकांत जिचकार. २१ जुलै २००३ ते २ जून २००४
५) डॉ. विजया वाड. ९ डिसेंबर २००५ ते ८ डिसेंबर २००८ आणि जून २००९ पासून ते १६ फेब्रुवारी २०१५.
६)दिलीप करंबेळकर. ०८ ऑगस्ट २०१५ पासून कार्यरत.

सुरवातीला एक हजार पृष्ठांचे २० खंड तयार करायचे ठरले होते व यातील लेखांना शब्द संख्येची मर्यादाही घातली होती. पुढे या खंडांची संख्या २३ इतकी झाली. गरजेनुसार पृष्ठांची व लेखातील शब्दांची मर्यादा वाढत जाऊन २२ ते २३ हजारापेक्षा जास्त पाने,  ३०० पेक्षा जास्त सूची, आणि तब्बल #१८_हजार पेक्षा जास्त लेखांचा समावेश होऊन २० खंड प्रकाशित झाले आहेत. परंतु हे विश्वकोशीय खंड फक्त सरकारी विक्रीकेंद्रावरच विक्रीसाठी उपलब्ध असल्याने इतर ग्रंथासारखे कुठेहीे सहज मिळत नाहीत. शिवाय एका वेळी एका विक्रीकेंद्रावर २० खंड मिळतील याचीही खात्री नाही. परंतु आता हा ज्ञानाचा खजाना डिजिटल स्वरूपात, मोबाईल अँप स्वरूपात उपलब्ध झाला आहे. याची माहिती पुढे घेऊ.
 
मराठी विश्वकोश हा मराठी असल्यामुळे व महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असल्याने यात मराठी भाषा व मराठी साहित्य त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अन्य प्रकारची माहिती अधिक तपशीलवार दिली आहे. त्यानंतर भारताच्या माहितीला प्राधान्य आहे. इतर देशांची महिती तुलनेने कमी स्वरूपात आहे.
सामाजिक शास्त्र, कला, तंत्रज्ञान या संबंधितील माहिती अधिक विस्तृत आहे. ज्या ज्या विषयांना ज्ञानाच्या दृष्टीने अधिक महत्व आहे त्यांना अधिक महत्व दिले आहे. कारण याबाबत प्रादेशिक प्रश्न उद्धवत नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान याची सखोल माहिती, रेखाचित्रे, छायाचित्रे, आलेख, आकृत्या, नकाशे यांच्या समावेशने काही विषय अधिक स्पष्टपणे समजतात.
कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान तपशीलवार सांगणे हे विश्वकोशाचे काम नसते. विश्वकोश काही मर्यादेत मार्गदर्शन करू शकतो. मराठी विश्वकोशात दिलेले सर्व लेख अभ्यासपूर्ण लिहलेले आहेत. सर्वसामान्य शिक्षितांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सामान्य वाचकसंसाठी संदर्भग्रंथ म्हणून हा विश्वकोश उपयुक्त आहे.

#मराठी_विश्वकोशाची_विषयव्याप्ती:-
अर्थशास्त्र, कला व कारागिरी, खेळ व मनोरंजन,
 ग्रंथालयशास्त्र, चलचित्रविद्या, चित्रकला,
जगातील भाषा व साहित्ये, तत्त्वज्ञान, धर्म, नृत्य, पुरातत्त्वविद्या, इतिहास, भूगोल, मूर्तिकला (शिल्पकला), लिपिप्रकार, वास्तुकला, संगीत, साहित्य प्रकार, साहित्यविषयक संकीर्ण विषय, साहित्यसमीक्षा.
भाषाशास्त्र, ज्योतिषशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणितशास्त्र, विद्युतशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, विधीशिक्षणशास्त्र, स्थापत्यशास्त्र,
अणुविज्ञान, नाविकयांत्रिक, वैमानिकी, संदेशवहन, स्वयंचल, अवकाश, विज्ञानउद्योग व व्यापार, मत्स्योद्योग, 
कीटकविज्ञान, कृषिविज्ञान, धातुविज्ञान, वनस्पतिविज्ञान, वातावरणविज्ञान, पशुविकारविज्ञान, प्राणिविज्ञान, भूविज्ञान, सूक्ष्मजीवविज्ञान, वैज्ञानिकसंस्था, संग्रहालये, सांख्यिकी, इत्यादी सुमारे शंभरभर विषय विश्वकोशाच्या एकूण २० खंडात समाविष्ट केले आहेत.

मराठी विश्वकोश हा महाराष्ट्र शासन तयार करवून घेत असलेला आणि मुळात पुस्तकरूपात असलेला मराठी ज्ञानकोश आहे. तो आता डिजिटल झाला आहे. हा  ज्ञानकोश इंटरनेटवर ऑनलाइन व मोफत वाचता येतो.
मूळ २० छापील खंडांचे डिजिटायझेशन करून ते क्रमाक्रमाने इंटरनेटवर उपलब्ध करून देण्याचा उपक्रम २५ ऑक्टोबर २०११ पासून सुरू झाला. प्रकाशित झालेले २० खंड इंटरनेटवर सीडॅकच्या सहकार्याने आले आहेत. “घराघरात विश्वकोश” या प्रकल्पा अंतर्गत सर्वसामान्यांना अर्पण करण्यात आला आहे. या संकेतस्थळाचा पत्ता
 http://www.marathivishvakosh.in/ असा आहे. “तंत्रज्ञानाचा कुशल वापर, मराठीचा प्रभावी प्रसार', हे विश्वकोशाचे ब्रीद आहे.

#मराठी_विश्वकोश_अँड्रॉइड_अँप_मध्येही_उपलब्ध.....

महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाने तयार केलेले विश्वकोश बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन मोबाइल अॅपच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत.
मराठी विश्वकोशाच्या वीस जाडजूड खंडांमधील माहितीचा सागर आता अवघ्या चार ‘एमबी’च्या मोबाइल अॅपमध्ये मोफत उपलब्ध झाला आहे. परंतु हे अँप ऑफलाइन चालत नाही. इंटरनेट आवश्यक आहे.
‘बुकगंगा डॉट कॉम’ने विकसित केलेल्या या अॅपचे १२ जानेवारी २०१८ रोजी वाई येथे झालेल्या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आले.
मोफत अँड्रॉइड अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक :https://goo.gl/TxPXyK
आयफोन आणि आयपॅड अॅप डाउनलोड करण्यासाठी लिंक : https://goo.gl/pXNNFp
विश्वकोश पेन ड्राइव्ह खरेदी करण्यासाठी लिंक :http://www.bookganga.com/R/7HX54

सद्य:स्थितीत मराठी विश्वकोशाच्या २३ खंडांपैकी २० खंड प्रकाशित झाले आहेत. हे खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी या कालबाह्य झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवनवीन संशोधनामुळे नवीन माहितीत मोठ्या प्रमाणावर भर पडली असून, नव्या संकल्पना विचारप्रवाह पुढे आले आहेत. त्यामुळे सर्व विषय आणि ज्ञानशाखेतील झालेल्या बदलांची नोंद घेऊन विश्वकोशामध्ये सुधारणा करण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे असे समजते. परंतु २० खंड तयार होण्यासाठी लागलेला वेळ पाहता विश्वकोश अद्ययावतीकरणाच्या कामास किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. विश्वकोश मंडळ हे काम जलदगतीने करेल व त्या कामास शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल अशी आशा बाळगुया व उपलब्ध डिजिटल विश्वकोशाचा आस्वाद घेऊया.

【वरील लेखामध्ये दिलेली माहिती खाली दिलेल्या संदर्भातून मिळालेल्या माहिच्या आधारे लिहलेली आहे. काही माहिती आहे तशी घेतली आहे. यातील बरीचशी माहिती गुगलवरून मिळवलेली आहे.
मी संपूर्ण विश्वकोश (२० खंड) वाचलेला नाही. ग्रंथालयात जाऊन विश्वकोशाचे सुमारे १२ खंड पाहिले आहेत. त्याची प्रस्तावना,रचना,आकार, त्यामधील समाविष्ट असणारे विषय इत्यादी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात कोणतीही चूक आढळल्यास जाणकारांनी निदर्शनास आणून द्यावी.】

संदिप रामचंद्र चव्हाण.

संदर्भ:-
१)मराठी विश्वकोश (प्रस्तावना) खंड १
२)विश्वकोश(लेख) सु.रा.चुनेकर आणि अ.र.कुलकर्णी   (मराठी विश्वकोश खंड१६, सूची८,साहित्य संकीर्ण)
३)विकासपीडिया.
४)विकिपीडिया
५)विविध वर्तमानपत्रातील लेख व बातम्या.

Thursday 3 May 2018

संत वाङमय प्रसाराची तीन दशके..

संत वाङमय प्रसाराची तीन दशके..

की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने।
लब्धप्रकाश इतिहास-निसर्ग-माने।।
जे दिव्य दाहक म्हणुनि असावयाचे।
बुद्धय़ाचि वाण धरिले करि हे सतींचे।।


या तत्वाने आणि कोणत्याही फायद्याविना स्वतः आर्थिक नुकसान सोसून २८/२९ वर्षात अंदाजे १८ ते २० लाख लहान-मोठे ग्रंथ (संत वाङमय) महाराष्ट्राच्या घराघरात पोचवण्यासाठी धडपडणारी एक संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहे..... नाव:- संत वाङमय प्रसारक मंडळ, कराड (महाराष्ट्र).



संत वाड्मय प्रसारक मंडळ, कराडची स्थापना १९८९ साली झाली. संस्थेचा कारभार चालू झाल्यानंतर अल्पावधीतच तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत इत्यादी ग्रंथांचे संपादन करून सर्वसामान्यांना परवडतील अशा किंमतीत प्रकाशित करण्याचे काम संस्थेने 'वैष्णव सदन कोपर्डे हवेली' येथून चालू केले.

संस्था सध्या १५ प्रकारचे लहान मोठे ग्रंथ प्रकाशित करते. हे ग्रंथ महाराष्ट्रातील ठराविक ठिकाणाहून वितरित(विक्री) केले जातात.
एकूण १५ ग्रंथ प्रकारात पुढिल प्रमाणे ग्रंथ उपलब्ध आहेत. 
१)तुकाराम गाथा वेगवेगळ्या तीन साइजमध्ये छापली जाते [११०,१२५,१४० रु ]
२)ज्ञानेश्वरी दोन साइजमध्ये मिळते. [१००,१२५ रु]
बाकी सर्व ग्रंथ एकाच प्रकारात छापले जातात. त्यामध्ये ३)एकनाथी भागवत(मोठ्या आकारात)[२०० रु]
४)संत निळोबांची गाथा [६५ रु]
५)संत बहिणाबाईंची गाथा [७५ रु]
६)सदाचार मकरंद [३० रु]
७)वारकरी नित्यनिय भजनी मालिका [७५ रु]
८)सुलभ नित्योपासना [३० रु]
९)हरिपाठ [५ रु]
१०) ज्ञानेश्वरी ९ वा व १२ वा अध्याय [१० रु]
११)नाट [५ रु]
१२)भजनी मालिका (पॉकेट प्रत) [१० रु]
वरील प्रमाणे ग्रंथ व त्याच्या किंमती आहेत. त्याच प्रमाणे व्यसनमुक्त युवक संघ,महाराष्ट्र. ही दिनदर्शिकाही छापली जाते.

या ग्रंथाची उकृष्ट छपाई कोल्हापूर येथील 'मयूर इंडस्ट्रीज' येथे होते. या ग्रंथाचे बायडिंग व शिलाई 'वैष्णव सदन कोपर्डे हवेली ता. कराड जि. सातारा' येथे होते. सर्व ग्रंथ हे पुठ्ठाबांधणी (हार्डकव्हर) प्रकारात आहेत.(पॉकेट मालिका सोडून)

ग्रंथ छपाईसाठी वापरलेला पेपर, हार्डकवर, छपाईचा फॉन्ट, एकूण पृष्ठसंख्या इत्यादींची तुलना केल्यास या ग्रथांची किंमत अत्यल्प आहे. 'ना नफा ना तोटा' या तत्वावर हे काम संस्था गेली जवळपास तीन दशके अखंडपणे करत आहे. आणि इथे छपाई होणाऱ्या ग्रंथाना मागणीही मोठी आहे. महाराष्ट्राच्या खेडोपाडी हरीनाम सप्ताह भारतात तिथे अनेक वाचकाकडून तुकाराम गाथा, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत हे ग्रंथ मागवले जातात. आतापर्यंत १८ ते २० लाख ग्रंथ संस्थेच्या वतीने छापले आहेत व वितरीतही केले आहेत. ग्रंथांच्या छपाई, बायडिंग, फॉन्ट इत्यादी गुणवत्तापूर्ण कामामुळे वाचकांच्या पसंतीला हे ग्रंथ उतरतात. संस्थेने ग्रंथ निर्मितीमध्ये गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारे तडजोड केलेली नाही. वाचकाने हे ग्रंथ हातात घेतल्यानंतर माझ्या म्हणण्यातील तथ्य पटेल.

हे ग्रंथ खालील ठिकाणच्या केंद्रातून कोणालाही विकत मिळतात.
१)मारुतीबुआ कराडकर मठ, गुरुवार पेठ, कराड २)मारुतीबुआ कराडकर मठ चाकण रोड, आळंदी. 
३)मारुतीबुआ कराडकर मठ, झेंडे गल्ली, पंढरपूर.
४)श्री गंगुकाका शिरवळकरवाडा, विणे गल्ली, पंढरपूर.
५) वैष्णव सदन, कोपर्डे हवेली, ता कराड,जि सातारा.
याबद्दलची अधिक माहिती मॅनेजर सुभाष पाटील देऊ शकतात त्याचा मोबाइल क्रमांक खाली दिला आहे.

वरीलपैकी ५ नंबरचे जे ठिकाण आहे 'वैष्णव सदन', या ठिकाणी ग्रंथ बायडिंग व ग्रंथ शिलाईचे काम चालते. येथील सर्व कामाची जबाबदारी मॅनेजर सुभाष पाटील यांच्याकडे २००३ पासून आहे. त्यांच्या सोबत सहा सहकारी काम करतात. सुभाष पाटील यांचा संपर्क क्रमांक ९७६३५६८५३६ असा आहे.

हे ग्रंथ कोणालाही एका किंवा अनेक प्रतिमध्ये हवे असल्यास वरील पाच विक्रीकेंद्रावर संपर्क करावा. सर्व ग्रंथ हे MRP (मूल्य) किमतीनुसारच मिळतात त्यामध्ये कोणतीही सूट मिळत नाही. कारण त्याची किंमतच खूप कमी आहे. छपाई, बांधणी, वाहतूक, यासाठी जो खर्च येतो त्यापेक्षाही थोडी कमी किंमत असण्याची शक्यता आहे. कारण 'संत वाड्मय प्रसारक मंडळ, कराड.' ही संस्था नफा कमवण्यासाठी स्थापन झालेली नसून संत वाड्मय घराघरात पोचावे व हे ज्ञान सर्वसामान्य जनतेला अत्यल्प किंमतीत मिळावे या उद्देशाने निर्माण झाली आहे. कागदाची वाढती किंमत व वाढती महागाई यामुळे संस्था काही लाख रुपयांचे नुकसान सोसून हे काम करत आहे.

काही प्रसिद्ध पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क कोणाकडे असावेत यावरुन काही प्रकाशक न्यायालयात जातात. लेखक-प्रकाशक यांच्यात आर्थिक कारणावरून, रॉयल्टीवरून, पुस्तक छपाईवरून काही वेळा खटके उडतात. पुस्तकांच्या किंमती विषयी सर्वसामान्य समाजात समज गैरजम असतात. हे पाहिले की निस्वार्थपणे ज्ञानप्रसाराचे कार्य करणाऱ्या अशा संस्था, व्यक्तींच्या बद्दल मनातील आदर द्विगुणीत होतो.

संत वाङमय प्रसारक मंडळ कराड,(महाराष्ट्र) या संस्थेच्या कार्याला वारकरी संप्रदायातील थोर व्यक्तिमत्त्व, व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक, युवकमित्र, गुरुवर्य ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांचे आणि वारकरी संप्रदयातील अनेक अग्रणींचे आशीर्वाद लाभले आहेत.
त्यांच्या कार्याला लाख लाख प्रणाम!!!!

मी ही माहिती लिहण्याचे कारण....
वैष्णव सदन ही इमारत व संत वाङमय प्रसारक मंडळ यांचे कार्यालय गेली कित्येक वर्षे माझ्या गावात, कराड कोरेगाव राज्यमार्गावर आहे. लहानपणापासू इथे ग्रंथ छपाई होते हे माहितही होते व पाहीलेही आहे. अनेक वेळा पाहुण्यांपैकडून, परगावच्या मित्रांच्या घरातून अमुक अमुक ग्रंथ हवा असा निरोप आला की मी तिथे जायचो व गाथा, ज्ञानेश्वरी असे ग्रंथ विकत घ्यायचो.
परंतु ग्रंथ छपाईचे, वितरणाचे हे निस्वार्थ काम कसे चालते, याबद्दल कधीही माहिती घेतली नाही. अलीकडे पुस्तकवाचनाचा छंद लागला व त्यातून थोडं लिखाणही करू लागलो. त्याच प्रेरणेतून हे लिखाण केले आहे. शिवाय अनेक प्रकाशक, लेखक, पुस्तकविक्रेते वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या पुस्तकांची जाहिरात करत असतात. त्यांनी तशी जाहिरात करणे गैर नाही. परंतु ज्या संस्थेने जवळपास तीन दशके संत वाङमयाचा प्रसार केला. त्यासाठी कष्ट उपसले त्यांनी कधीही कुठेही जाहिरात केल्याचे निदर्शनास आले नाही. म्हणून माझ्यापरीने जमेल तशी माहिती महाराष्ट्रातील वाचक वर्गाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे.

तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने |
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करु ||
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन |
शब्द वाटे धन जनलोका ||तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्देचि गौरव पूजा करु ||


शब्दांना देव मानून, संत साहित्याची पूजा करणारी एखादी संस्था खेडेगावातही असू शकते व एवढे मोठे काम करू शकते...याची माहिती महाराष्ट्राच्या शहरी भागाला व्हावी म्हणून हा लेखप्रपंच... वाचक मित्रांनीही त्याच उदात्त दृष्टीने लेख वाचावा. ही विनंती.

टीप: वरील लेखातील सर्व संख्यकीय माहिती संस्थेच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडून तोंडी स्वरूपात मिळालेल्या माहितीच्या आधारे लिहली आहे. शिवाय मी जे पाहिले आहे त्यावरून लिहली आहे. या लिखाणात काही चुका असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. माझा संस्थेशी फक्त वाचक म्हणून संबध आहे. तसेच ही माहिती प्रसिध्द करण्यासाठी मला कोणीही सांगितलेले नाही.
संस्थेच्या कोणत्याही जबाबदार घटकाने जर काहीही कारणास्तव ही पोस्ट काढून टाकण्यास सांगितली तर मी ही पोस्ट काढून टाकेन.
©संदिप रामचंद्र चव्हाण.

या लिंकवरही हा लेख वाचावयास मिळेल...
https://m.facebook.com/story.php?story_fbid=369436020243370&id=100015309253068








Wednesday 2 May 2018

फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या... जरा कष्टकऱ्यांचाही विचार करा..

#फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या....

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी भेट म्हणून फुलांच्या ऐवजी पुस्तकं द्यावी का? या प्रश्नावर #मराठी_पुस्तकप्रेमी या फेसबूक ग्रुपवर परवा बरीच चर्चा झाली. ग्रुपमध्ये २०/३० हजार सदस्य असावेत. फुलं नाकारून पुस्तकं घ्या हा विचार अनेकांनी व्यक्त केला.
फुलांचं अर्थकारण व फुलशेतीशी संबधीत घटकांना या फुलंबहिष्काराचा फटका बसेल हे पटवून देण्यासाठी मी कमी वेळात परिश्रम पूर्वक एक लेख लिहला...
पण पांढरपेशा आणि स्वतःला हुशार मानणाऱ्या लोकांचे वर्चस्व असणाऱ्या ग्रुपने तो लेख डिलीट केला.
अनेक संवेदनशील मनाच्या सदस्यांनी फुलशेतीची निघडीत सर्व घटकाबद्दल, शेतकरी, कष्टकऱ्यांच्याबद्दल आत्मीयता दाखवून कॉमेंट केल्या व पुस्तकाबरोबर फुलंही घेऊ अस मत व्यक्त केले.
मला काही वेळेची बंधनं असल्यामुळे सर्वाना रिप्लाय देता आला नाही. त्याबद्दल मला खेद वाटतो.
म्हणून हा लेख मी माझ्या व्हॉलवर पेस्ट करतोय.
आज पर्यंत मी माझी पोस्ट शेअर करा असं कधीही आवाहन केलं नाही... परंतु यावेळी आपण ही पोस्ट शेअर करावी व आपल्या शेतकरी, कष्टकरी, फुलेविक्रेते, वाहन चालक/मालक, छोटे व्यापारी यांच्या बद्दलची व्यथा समाजाला समजून सांगावीे ही विनंती!!


#फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या
सध्या लग्नकार्यात, वाढदिवस कार्यक्रमात, सत्कार समारंभ, सरकारी कार्यालयात नवीन अधिकारी आल्यास, पुष्पगुच्छ(बुके) ऐवजी पुस्तके देण्याची चढाओढ काही ठिकाणी दिसून येत आहे. 'बुके नको, बुकं द्या' हे 'खुळ', हवं तर फॅड म्हणा.. सांस्कृतिक क्षेत्रात मूळ धरू पहात आहे. किंवा त्याची चर्चा होताना दिसत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध किंवा उच्छपदस्त व्यक्ती पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देण्याचे आवाहन करतात. त्या व्यक्तीचे फालोअर्स त्या आवाहनाला आज्ञा मानून कृती करतात. पुस्तकांचे व्यापारी या नव्या 'फॅड'चा जोमानं प्रचार करतात. फुलांना डावलून पुस्तकं कशी श्रेष्ठ हे पटवून देण्याचा अट्टहास ते करत असतात. कोणत्याही फॅडला सहज 'बळी' पडणाऱ्या शिक्षित जनतेच्या 'गळी' 'बुके नको,बुकं द्या' ही घोषणा पध्दतशीर उतरवली जाते.

फुलं लगेच कोमेजून जातात, बुके घेऊन पैसे 'वेस्ट' जातात, बुकेचे आयुष्य जास्तीत जास्त चार पाच दिवसांचं, ५०० रुपयांचा बुके पाच दिवसचं टिकतो.. त्याच्या ऐवजी पुस्तकं द्या, ते व्यक्तीला आयुष्यभर साथ करतील, त्यातुन ज्ञान मिळेल...वगैरे वगैरे.... असे बिनतोड व कोणालाही सहज पटतील असे मुद्दे सांगून फुलांना डावलले जाते.

पुस्तकांनी माणसाचं आयुष्य समृद्ध होऊ शकते. पुस्तकं ही गुरुच आहेत. पुस्तकं वाचण्याने व्यक्तीच्या वर्तणुकीत चांगला फरक पडू शकतो. व्यक्ती शांत, संयमी, विचारी होऊ शकते. पुस्तक वाचण्यातून आयुष्यातील मर्म, कर्म आणि धर्म समजू शकतो. पराजित मनाला उभारी देण्याचं काम पुस्तकं करतात. पुस्तकं माणसाला 'माणूस' बनवतात. (काहींच्या बाबतीत अपवाद). हे सर्व खरं आहे. मला व्यक्तिशः मान्यही आहे. मी ही कोणाला भेट द्यायची असल्यास प्रसंगानुरूप 'बुके बरोबर बुक' देतो. परंतु फुलं/बुके देऊच नका पुस्तकंच द्या. हा युक्तिवाद मान्य नाही. पुस्तकं व फुलं यांची तुलनाच अयोग्य वाटते.
फुलं हे सुंदरतेचं, कोमलतेचं, प्रेमाचं, मैत्रीचं प्रतीक आहे. पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे.
फुल फुलाच्या ठिकाणी, पुस्तक पुस्तकाच्या ठिकाणी... दोन्हीही आपापल्या ठिकाणी महान आहेत.
आपण तुलना करून त्यांचे महत्व कमी करायला नको.
(तसे ते होणारही नाही)

साहित्याच्या निर्मितीत फुलांचा वाटा मोठा आहे. अनेक कवींनी, लेखकांनी आपल्या कवितांमधून, कथा- कादंबरी मधून फुलांचं महत्व अधोरेखित केले आहे. प्रेमिकांच प्रेम खुलवलं आहे, फुलांच्या उपस्थितीने, सुगंधाने, कोमलतेने कवीकल्पनांना वाव मिळाला आहे. आणि त्या कवितेची, प्रेमकहाणीची पुस्तकं झाली आहेत... त्या पुस्तकांसाठी ती फुलचं नाकारायची?? हा कृतघ्नपणा नाही का??

आपण लहान मुलांना फुलांची उपमा देतो.... काय कारण असेल?? कारण मुलं ही जीवनवेलीवरची सुंदर फुलं असतात. ती सुंदर, निरागस, कोमल असतात. फुल हे भावनेचे, सहृद्यतेचे प्रतीक म्हणून आपण वापरतो. त्याचं एक वेगळं महत्व आहे. बीज रुजते त्याचे रोप होते, रोपाचे झाड बनते, झाडांना आधी फुले येतात मग फळधारणा होते, फळांच्या बिया पासून पुन्हा रोप बनते...निसर्गाचा क्रम चालूच असतो.... वेली, रोपं, झाड यांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार काही फुलझाडे तर काही वेली तर काही महावृक्ष असतात. त्यांना येणारी फुलं मग ती वेगवेगळ्या प्रकारची असली तरी निसर्गचक्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावत... निसर्गाला पूर्णत्व आणतात. फुलं निसर्गाने त्यांना नेमून दिलेलं काम निस्वार्थ भावनेने पार पाडतात.  त्यांचं आयुष्य काही क्षण का असेना.. ती फक्त आनंदाची बरसात करतात. आणि आपण मात्र त्यांनाच दोष लावतो की ती कोमेजतात...ठराविक कालावधीने कोमेजून जाणे हा फुलांचा नैसर्गिक गुणधर्मच आहे. पण तरीही त्यांना लाभलेल्या छोट्याशा आयुष्यात ती फक्त आणि फक्त सुगंधी दरवळ पसरवतात. वातावरणात उत्साह भरतात.. जणू ती माणसाला चांगल्या वर्तणुकीचा संदेश देत असतात.

ज्ञान गरजेचेच आहे. विद्ये विना मती गेली.... हे महात्मा फुलेंनी सांगून ठेवले आहे. पण ज्ञानाने (काहींचा) अहंकार वाढतो. ज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी फुलासारखे सुंदर, संवेदनशील मन हवे... ते नसेल तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नसतो. ज्ञानी माणसाला समाजातील कष्टकरी, उपेक्षित जनतेचा विसर पडला आणि तो 'स्व'च्याच धुंदीत राहिला तर अज्ञानी लोकं परवडली अस खेदाने म्हणावे लागेल.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना मुक्त अर्थव्यवस्था व जागतिकरणामुळे कृषिक्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. समस्येच्या चक्रात शेतकरी अडकला. ज्या शेतकऱ्यांना तो चक्रव्यूह भेदने शक्य झाले नाही त्यांनी गळ्यात फास अडकवला... आणि आपल्या जीवलगांना पोरकं करून तो निघून गेला.😥

काहींनी नवीन त्रज्ञानाचा आधार घेतला. शेतीत नवनवे प्रयोग, प्रयत्न केले. व्यावसाईक फुलशेती हा त्यातील एक प्रयत्नच आहे. फुलशेती प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते.१)हरितगृह शेती व २) खुल्या पध्दतीने फुलशेती.

फुलांच्या अर्थकारणाचा व फुलशेतीचा थोडासा परिचय:
२००१०/११ साली महाराष्ट्रात ४००० हेक्टरपेक्षा जास्त फुलशेती होतीे. देशाचा विचार केल्यास ५७७३० हेक्टर शेतीवर फुलशेती केली जात होती. सध्याची आकडेवारी मला मिळाली नाही परंतु महाराष्ट्र टाइम्स मध्ये ०९ सप्टेंबर २०१४ रोजी एक बातमी आली होती त्यानुसार देशातील फुलशेतीचे एकूण क्षेत्र दोन लाख हेक्टरच्या जवळपास होते.२०१८ चा विचार करायचा झाल्यास हे क्षेत्र अडीच ते तीन लाख हेक्टर किंवा जास्त असावे.
एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फुलशेती होते त्याच्या लागवड, उत्पादन, वाहतूक, विक्री या संपूर्ण व्यवस्थेवर असंख्य कुटुंबांची उपजीविका चालते.

शेतकरी फुलं पिकवतो. शेतमजुराला रोजगार मिळतो, खते-बी-बियाणे दुकानदारांचा व्यवसाय चालतो, खते व बी-बियाणे निर्माण करणारे कारखाने त्यात काम करणारे कामगार, फुलशेतीची मशागत करणारा ट्रॅक्टरवाला, फुलांची वाहतूक करणारी वाहने व त्यावर पोट भरणारे वाहन मालक/ चालक, फुलांचे छोटे-मध्यम-मोठे व्यापारी, हमाल, फुलांपासून बुके बनवणारा कारागीर, बुके बनवण्यासाठी रॉ मटेरियल बनवणाऱ्या यंत्रनेत काम करणारे कामगार, इत्यादी असंख्य लोकांना यातून रोजगार मिळतो त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यातूनच चालतो.
फुलं जरी अल्पजीवी असली तरी ती फुलवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतेे, घाम गाळावा लागतो, निसर्गाच्या कृपा - अवकृपेला तोंड द्यावे लागते. याचाही विचार व्हायला हवा. फुलं लागवड, त्याचे संगोपन, काढणी, वेचणी, शेतीतील वाहतूक, सावलीत साठवणूक, स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, पुन्हा कोल्डहाऊसमध्ये साठवणूक, मार्केट पर्यंतची वाहतूक व शेवटी विक्री. इतक्या टप्प्यातुन शेतकरी ते ग्राहक असा फुलांचा प्रवास होतो. यामध्ये ३०% पर्यंत फुलांचे नुकसान होते. राहिलेली फुले विकली जातात काही वेळा विकलीही जात नाहीत. फुलांच्या शेतीशी निगडित असणारी सगळी व्यवस्था फुलांच्या विक्रीवर व त्याच्या दरावर अवलंबून असते. फुलांना चांगला भाव मिळाला तर त्यावर उपजीविका असणाऱ्या हजारो कुटुंबांना 'अच्छे दिन' येतात. फुलांची विक्री घटली तर सहाजिकच त्या सर्वांवर 'बुरे दिन' येण्याची शक्यता असते.
एकट्या पुण्यात एका दिवसात फुलांच्या खरेदीविक्रीच्या व्यवसायात ३० ते ४० लाखांची उलाढाल होते. मग भारतभर किती होत असेल याचा विचार करा. सुज्ञ लोकांनीच जर या शेतीपूरक व्यवसायाच्या विरोधी बोलायचे तर मग इतरांकडून चांगल्याची अपेक्षा ती काय?? अवधानाने का होईना, एकसाठी दुसऱ्याचा बळी नको... दोघांनाही आधार देता येईल का हे पहावे!

वरील सर्व गोष्टींचा सारासार विचार व्हायला हवा.
दोन शब्दाची कॉमेंट सुद्धा कुणाचे तरी, रोजचे ५०/१०० रुपये बुडवू शकते. हातावरचे पोट असणाऱ्यांना तेवढे पैसे लाखमोलाचे असतात.
आपण पुस्तकप्रेमी फक्त पुस्तकांना महत्व देणार असू...तर हा एकांगी (अ)विचार आहे. शेतकऱ्यांची तरुण पिढी समाजातील शिक्षित, अभ्यासू लोकांकडे आशेने पहाते आहे. अशा अभ्यासू(?) लोकांनीच जर नाकं मुरडली तर शेतकऱ्यांच्या पोरांनी पहावे तर कोणाकडे??

स्वतःपुरता विचार किंवा 'सेल्फीश' जीवनपध्दती वाढीस लागली असताना जो तो आपापला स्वार्थ बघणार याबद्दल दुमत नाही. परंतु साहित्याने, ज्ञानाने समृध्द असणाऱ्या, विचारशील गटाकडूनही अविचारांचे प्रदर्शन झाले तर मात्र 'पुस्तकं फक्त वाचली... शिकलो काहीच नाही' असं होईल.

फुलं आणि पुस्तकं यांची तुलना नसावी असं माझं व्यक्तिगत मत आहे... सर्वांनीच ते मान्य करावं हा माझा आग्रह नाही. हट्टही नाही.....प्रत्येकाचं एक मत असतं, या मताशी मी सह'मत' आहे. परंतु माझ्या 'मता'वर जरूर विचार करावा...
मी शेतकरीपुत्र आहे. मी किंवा माझ्या कुटुंबातील, पावण्यारावळ्यातील, मित्रपरीवारातील(काही अपवाद) कोणीही फुलशेती करत नाही. शिवाय फुलं खरेदी-विक्री या व्यवसायाशी माझा काडीमात्रही संबंध नाही. परंतु तरीही मला फुलांशी निगडित त्या सर्व कष्टकरी घटकाबद्दल ममत्व वाटते. त्यांचा व्यवसाय फुलावा त्याला आपला हातभार लागावा या उद्देशाने हा लेखप्रपंच केला आहे. माझा लेख वाचून एकाने जरी पुस्तकाबरोबर फुलं/बुके घ्यायचं ठरवलं तरी मला माझ्या लेखनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल.

कोणालाही भेट देताना शक्य असल्यास फुलं व पुस्तक, दोन्ही द्या... फुलाच्या साथीने पुस्तकाच्या भेटीची गोडी वाढेल..... फुलं आणि पुस्तक ही जोडी सुद्धा खुलेलं! तीच खरी स'प्रेम' भेट ठरेल!!😇

©संदिप रामचंद्र चव्हाण.

【हा लेख लिहताना फक्त आकडेवारीसाठी कृषी व पणन विभाग महाराष्ट शासन यांची प्रशिक्षण पुस्तिका(कोणत्या वर्षीची आहे माहीत नाही), महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे यांची कृषिदर्शनी २०१६, फुलशेतीची मूलतत्वे व कार्यपद्धती, पाठयपुस्तिका 1. याचा आधार घेतला आहे. शिवाय काही वृत्तपत्रामधील बातम्यांचा आधार घेतला आहे

बाजारभेट : फुलांच्या बाजारपेठेचा व्यावहारिक गंध! https://www.loksatta.com/pune-news/flowers-market-1397691//lite/

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times - https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/indian-flowers-market/moviereview/42058803.cms?utm_source=whatsapp】
सर्व लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!!
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏