My Blog List

Wednesday 2 May 2018

फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या... जरा कष्टकऱ्यांचाही विचार करा..

#फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या....

कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी भेट म्हणून फुलांच्या ऐवजी पुस्तकं द्यावी का? या प्रश्नावर #मराठी_पुस्तकप्रेमी या फेसबूक ग्रुपवर परवा बरीच चर्चा झाली. ग्रुपमध्ये २०/३० हजार सदस्य असावेत. फुलं नाकारून पुस्तकं घ्या हा विचार अनेकांनी व्यक्त केला.
फुलांचं अर्थकारण व फुलशेतीशी संबधीत घटकांना या फुलंबहिष्काराचा फटका बसेल हे पटवून देण्यासाठी मी कमी वेळात परिश्रम पूर्वक एक लेख लिहला...
पण पांढरपेशा आणि स्वतःला हुशार मानणाऱ्या लोकांचे वर्चस्व असणाऱ्या ग्रुपने तो लेख डिलीट केला.
अनेक संवेदनशील मनाच्या सदस्यांनी फुलशेतीची निघडीत सर्व घटकाबद्दल, शेतकरी, कष्टकऱ्यांच्याबद्दल आत्मीयता दाखवून कॉमेंट केल्या व पुस्तकाबरोबर फुलंही घेऊ अस मत व्यक्त केले.
मला काही वेळेची बंधनं असल्यामुळे सर्वाना रिप्लाय देता आला नाही. त्याबद्दल मला खेद वाटतो.
म्हणून हा लेख मी माझ्या व्हॉलवर पेस्ट करतोय.
आज पर्यंत मी माझी पोस्ट शेअर करा असं कधीही आवाहन केलं नाही... परंतु यावेळी आपण ही पोस्ट शेअर करावी व आपल्या शेतकरी, कष्टकरी, फुलेविक्रेते, वाहन चालक/मालक, छोटे व्यापारी यांच्या बद्दलची व्यथा समाजाला समजून सांगावीे ही विनंती!!


#फुलं_आणि_पुस्तकं_एकत्र_द्या
सध्या लग्नकार्यात, वाढदिवस कार्यक्रमात, सत्कार समारंभ, सरकारी कार्यालयात नवीन अधिकारी आल्यास, पुष्पगुच्छ(बुके) ऐवजी पुस्तके देण्याची चढाओढ काही ठिकाणी दिसून येत आहे. 'बुके नको, बुकं द्या' हे 'खुळ', हवं तर फॅड म्हणा.. सांस्कृतिक क्षेत्रात मूळ धरू पहात आहे. किंवा त्याची चर्चा होताना दिसत आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध किंवा उच्छपदस्त व्यक्ती पुष्पगुच्छाऐवजी पुस्तके देण्याचे आवाहन करतात. त्या व्यक्तीचे फालोअर्स त्या आवाहनाला आज्ञा मानून कृती करतात. पुस्तकांचे व्यापारी या नव्या 'फॅड'चा जोमानं प्रचार करतात. फुलांना डावलून पुस्तकं कशी श्रेष्ठ हे पटवून देण्याचा अट्टहास ते करत असतात. कोणत्याही फॅडला सहज 'बळी' पडणाऱ्या शिक्षित जनतेच्या 'गळी' 'बुके नको,बुकं द्या' ही घोषणा पध्दतशीर उतरवली जाते.

फुलं लगेच कोमेजून जातात, बुके घेऊन पैसे 'वेस्ट' जातात, बुकेचे आयुष्य जास्तीत जास्त चार पाच दिवसांचं, ५०० रुपयांचा बुके पाच दिवसचं टिकतो.. त्याच्या ऐवजी पुस्तकं द्या, ते व्यक्तीला आयुष्यभर साथ करतील, त्यातुन ज्ञान मिळेल...वगैरे वगैरे.... असे बिनतोड व कोणालाही सहज पटतील असे मुद्दे सांगून फुलांना डावलले जाते.

पुस्तकांनी माणसाचं आयुष्य समृद्ध होऊ शकते. पुस्तकं ही गुरुच आहेत. पुस्तकं वाचण्याने व्यक्तीच्या वर्तणुकीत चांगला फरक पडू शकतो. व्यक्ती शांत, संयमी, विचारी होऊ शकते. पुस्तक वाचण्यातून आयुष्यातील मर्म, कर्म आणि धर्म समजू शकतो. पराजित मनाला उभारी देण्याचं काम पुस्तकं करतात. पुस्तकं माणसाला 'माणूस' बनवतात. (काहींच्या बाबतीत अपवाद). हे सर्व खरं आहे. मला व्यक्तिशः मान्यही आहे. मी ही कोणाला भेट द्यायची असल्यास प्रसंगानुरूप 'बुके बरोबर बुक' देतो. परंतु फुलं/बुके देऊच नका पुस्तकंच द्या. हा युक्तिवाद मान्य नाही. पुस्तकं व फुलं यांची तुलनाच अयोग्य वाटते.
फुलं हे सुंदरतेचं, कोमलतेचं, प्रेमाचं, मैत्रीचं प्रतीक आहे. पुस्तक हे ज्ञानाचे प्रतीक आहे.
फुल फुलाच्या ठिकाणी, पुस्तक पुस्तकाच्या ठिकाणी... दोन्हीही आपापल्या ठिकाणी महान आहेत.
आपण तुलना करून त्यांचे महत्व कमी करायला नको.
(तसे ते होणारही नाही)

साहित्याच्या निर्मितीत फुलांचा वाटा मोठा आहे. अनेक कवींनी, लेखकांनी आपल्या कवितांमधून, कथा- कादंबरी मधून फुलांचं महत्व अधोरेखित केले आहे. प्रेमिकांच प्रेम खुलवलं आहे, फुलांच्या उपस्थितीने, सुगंधाने, कोमलतेने कवीकल्पनांना वाव मिळाला आहे. आणि त्या कवितेची, प्रेमकहाणीची पुस्तकं झाली आहेत... त्या पुस्तकांसाठी ती फुलचं नाकारायची?? हा कृतघ्नपणा नाही का??

आपण लहान मुलांना फुलांची उपमा देतो.... काय कारण असेल?? कारण मुलं ही जीवनवेलीवरची सुंदर फुलं असतात. ती सुंदर, निरागस, कोमल असतात. फुल हे भावनेचे, सहृद्यतेचे प्रतीक म्हणून आपण वापरतो. त्याचं एक वेगळं महत्व आहे. बीज रुजते त्याचे रोप होते, रोपाचे झाड बनते, झाडांना आधी फुले येतात मग फळधारणा होते, फळांच्या बिया पासून पुन्हा रोप बनते...निसर्गाचा क्रम चालूच असतो.... वेली, रोपं, झाड यांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार काही फुलझाडे तर काही वेली तर काही महावृक्ष असतात. त्यांना येणारी फुलं मग ती वेगवेगळ्या प्रकारची असली तरी निसर्गचक्रात खूप महत्त्वाची भूमिका बजावत... निसर्गाला पूर्णत्व आणतात. फुलं निसर्गाने त्यांना नेमून दिलेलं काम निस्वार्थ भावनेने पार पाडतात.  त्यांचं आयुष्य काही क्षण का असेना.. ती फक्त आनंदाची बरसात करतात. आणि आपण मात्र त्यांनाच दोष लावतो की ती कोमेजतात...ठराविक कालावधीने कोमेजून जाणे हा फुलांचा नैसर्गिक गुणधर्मच आहे. पण तरीही त्यांना लाभलेल्या छोट्याशा आयुष्यात ती फक्त आणि फक्त सुगंधी दरवळ पसरवतात. वातावरणात उत्साह भरतात.. जणू ती माणसाला चांगल्या वर्तणुकीचा संदेश देत असतात.

ज्ञान गरजेचेच आहे. विद्ये विना मती गेली.... हे महात्मा फुलेंनी सांगून ठेवले आहे. पण ज्ञानाने (काहींचा) अहंकार वाढतो. ज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी फुलासारखे सुंदर, संवेदनशील मन हवे... ते नसेल तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नसतो. ज्ञानी माणसाला समाजातील कष्टकरी, उपेक्षित जनतेचा विसर पडला आणि तो 'स्व'च्याच धुंदीत राहिला तर अज्ञानी लोकं परवडली अस खेदाने म्हणावे लागेल.

एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना मुक्त अर्थव्यवस्था व जागतिकरणामुळे कृषिक्षेत्रापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या. समस्येच्या चक्रात शेतकरी अडकला. ज्या शेतकऱ्यांना तो चक्रव्यूह भेदने शक्य झाले नाही त्यांनी गळ्यात फास अडकवला... आणि आपल्या जीवलगांना पोरकं करून तो निघून गेला.😥

काहींनी नवीन त्रज्ञानाचा आधार घेतला. शेतीत नवनवे प्रयोग, प्रयत्न केले. व्यावसाईक फुलशेती हा त्यातील एक प्रयत्नच आहे. फुलशेती प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते.१)हरितगृह शेती व २) खुल्या पध्दतीने फुलशेती.

फुलांच्या अर्थकारणाचा व फुलशेतीचा थोडासा परिचय:
२००१०/११ साली महाराष्ट्रात ४००० हेक्टरपेक्षा जास्त फुलशेती होतीे. देशाचा विचार केल्यास ५७७३० हेक्टर शेतीवर फुलशेती केली जात होती. सध्याची आकडेवारी मला मिळाली नाही परंतु महाराष्ट्र टाइम्स मध्ये ०९ सप्टेंबर २०१४ रोजी एक बातमी आली होती त्यानुसार देशातील फुलशेतीचे एकूण क्षेत्र दोन लाख हेक्टरच्या जवळपास होते.२०१८ चा विचार करायचा झाल्यास हे क्षेत्र अडीच ते तीन लाख हेक्टर किंवा जास्त असावे.
एवढ्या मोठ्या क्षेत्रावर फुलशेती होते त्याच्या लागवड, उत्पादन, वाहतूक, विक्री या संपूर्ण व्यवस्थेवर असंख्य कुटुंबांची उपजीविका चालते.

शेतकरी फुलं पिकवतो. शेतमजुराला रोजगार मिळतो, खते-बी-बियाणे दुकानदारांचा व्यवसाय चालतो, खते व बी-बियाणे निर्माण करणारे कारखाने त्यात काम करणारे कामगार, फुलशेतीची मशागत करणारा ट्रॅक्टरवाला, फुलांची वाहतूक करणारी वाहने व त्यावर पोट भरणारे वाहन मालक/ चालक, फुलांचे छोटे-मध्यम-मोठे व्यापारी, हमाल, फुलांपासून बुके बनवणारा कारागीर, बुके बनवण्यासाठी रॉ मटेरियल बनवणाऱ्या यंत्रनेत काम करणारे कामगार, इत्यादी असंख्य लोकांना यातून रोजगार मिळतो त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यातूनच चालतो.
फुलं जरी अल्पजीवी असली तरी ती फुलवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतेे, घाम गाळावा लागतो, निसर्गाच्या कृपा - अवकृपेला तोंड द्यावे लागते. याचाही विचार व्हायला हवा. फुलं लागवड, त्याचे संगोपन, काढणी, वेचणी, शेतीतील वाहतूक, सावलीत साठवणूक, स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग, पुन्हा कोल्डहाऊसमध्ये साठवणूक, मार्केट पर्यंतची वाहतूक व शेवटी विक्री. इतक्या टप्प्यातुन शेतकरी ते ग्राहक असा फुलांचा प्रवास होतो. यामध्ये ३०% पर्यंत फुलांचे नुकसान होते. राहिलेली फुले विकली जातात काही वेळा विकलीही जात नाहीत. फुलांच्या शेतीशी निगडित असणारी सगळी व्यवस्था फुलांच्या विक्रीवर व त्याच्या दरावर अवलंबून असते. फुलांना चांगला भाव मिळाला तर त्यावर उपजीविका असणाऱ्या हजारो कुटुंबांना 'अच्छे दिन' येतात. फुलांची विक्री घटली तर सहाजिकच त्या सर्वांवर 'बुरे दिन' येण्याची शक्यता असते.
एकट्या पुण्यात एका दिवसात फुलांच्या खरेदीविक्रीच्या व्यवसायात ३० ते ४० लाखांची उलाढाल होते. मग भारतभर किती होत असेल याचा विचार करा. सुज्ञ लोकांनीच जर या शेतीपूरक व्यवसायाच्या विरोधी बोलायचे तर मग इतरांकडून चांगल्याची अपेक्षा ती काय?? अवधानाने का होईना, एकसाठी दुसऱ्याचा बळी नको... दोघांनाही आधार देता येईल का हे पहावे!

वरील सर्व गोष्टींचा सारासार विचार व्हायला हवा.
दोन शब्दाची कॉमेंट सुद्धा कुणाचे तरी, रोजचे ५०/१०० रुपये बुडवू शकते. हातावरचे पोट असणाऱ्यांना तेवढे पैसे लाखमोलाचे असतात.
आपण पुस्तकप्रेमी फक्त पुस्तकांना महत्व देणार असू...तर हा एकांगी (अ)विचार आहे. शेतकऱ्यांची तरुण पिढी समाजातील शिक्षित, अभ्यासू लोकांकडे आशेने पहाते आहे. अशा अभ्यासू(?) लोकांनीच जर नाकं मुरडली तर शेतकऱ्यांच्या पोरांनी पहावे तर कोणाकडे??

स्वतःपुरता विचार किंवा 'सेल्फीश' जीवनपध्दती वाढीस लागली असताना जो तो आपापला स्वार्थ बघणार याबद्दल दुमत नाही. परंतु साहित्याने, ज्ञानाने समृध्द असणाऱ्या, विचारशील गटाकडूनही अविचारांचे प्रदर्शन झाले तर मात्र 'पुस्तकं फक्त वाचली... शिकलो काहीच नाही' असं होईल.

फुलं आणि पुस्तकं यांची तुलना नसावी असं माझं व्यक्तिगत मत आहे... सर्वांनीच ते मान्य करावं हा माझा आग्रह नाही. हट्टही नाही.....प्रत्येकाचं एक मत असतं, या मताशी मी सह'मत' आहे. परंतु माझ्या 'मता'वर जरूर विचार करावा...
मी शेतकरीपुत्र आहे. मी किंवा माझ्या कुटुंबातील, पावण्यारावळ्यातील, मित्रपरीवारातील(काही अपवाद) कोणीही फुलशेती करत नाही. शिवाय फुलं खरेदी-विक्री या व्यवसायाशी माझा काडीमात्रही संबंध नाही. परंतु तरीही मला फुलांशी निगडित त्या सर्व कष्टकरी घटकाबद्दल ममत्व वाटते. त्यांचा व्यवसाय फुलावा त्याला आपला हातभार लागावा या उद्देशाने हा लेखप्रपंच केला आहे. माझा लेख वाचून एकाने जरी पुस्तकाबरोबर फुलं/बुके घ्यायचं ठरवलं तरी मला माझ्या लेखनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल.

कोणालाही भेट देताना शक्य असल्यास फुलं व पुस्तक, दोन्ही द्या... फुलाच्या साथीने पुस्तकाच्या भेटीची गोडी वाढेल..... फुलं आणि पुस्तक ही जोडी सुद्धा खुलेलं! तीच खरी स'प्रेम' भेट ठरेल!!😇

©संदिप रामचंद्र चव्हाण.

【हा लेख लिहताना फक्त आकडेवारीसाठी कृषी व पणन विभाग महाराष्ट शासन यांची प्रशिक्षण पुस्तिका(कोणत्या वर्षीची आहे माहीत नाही), महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे यांची कृषिदर्शनी २०१६, फुलशेतीची मूलतत्वे व कार्यपद्धती, पाठयपुस्तिका 1. याचा आधार घेतला आहे. शिवाय काही वृत्तपत्रामधील बातम्यांचा आधार घेतला आहे

बाजारभेट : फुलांच्या बाजारपेठेचा व्यावहारिक गंध! https://www.loksatta.com/pune-news/flowers-market-1397691//lite/

व्यवसाय बातम्या: Business News, Stock Market, GST, Real Estate | Maharashtra Times - https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/indian-flowers-market/moviereview/42058803.cms?utm_source=whatsapp】
सर्व लेख वाचल्याबद्दल धन्यवाद!!
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment