My Blog List

Sunday 3 March 2019

खरे देशभक्त बनूया...

देशात बहुतेकांना आलेला युद्धाचा ताप आता थोडा निवल्यासारखा झालाय म्हणून एक पोस्ट पोस्टावी असा विचार करून हा उपद्व्याप…

पुलगामा दहशतवादी हल्ल्यात आपल्या देशाची व सुरक्षा बलाची अपरिमित हानी झाली. चाळीसच्या वर CRPF चे जवान हुतात्मा झाले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरल्याने भारत सरकार व भारतीय सेनेने पाकिस्तानच्या मातीत पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाची पाळंमुळं खणून काढण्यासाठी एअर स्ट्राइक केला. बिनडोक पाकिस्ताननने दहशतवादी विरोधी कारवाईला सैन्यविरोधी कारवाई समजली. पाकिस्तानी हवाई सेनेच्या F16 विमानांनी भारताची हवाईसीमा ओलांडली. आपल्या बहादूर हवाई सेनेने त्यांना पिटाळून लावले. या धुमचक्रीत पाकिस्तानचे F16 व आपले Mig 21 अशी दोन विमाने अनुक्रमे पाकिस्तान व भारतीय हद्दीत पडली. परंतु दोन्हींचे पायलट मात्र पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्यारशूटच्या साह्याने उतरले. देशप्रेम म्हणजे शत्रू देशाचा द्वेष ही मानसिकता असणाऱ्या पाकिस्तानी जनतेने भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन याना मारहाण केली. अभिनंदन यांनी मोठ्या धैर्याने जवळच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने हवेत गोळीबार केला व जवळची काही कागदपत्रे गिळून तर काही कागदपत्रे पाण्याच्या डबक्यात टाकून नष्ट केली. या दरम्यान पाकिस्तान सैन्याने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतले. या घटनेचे व्हिडीओ स्थानिकांनी व्हायरल केले. आपल्याला त्याचा अप्रत्यक्ष फायदाच झाला. पाकिस्तानला कबूल करावे लागले की आपला एक पायलट त्यांच्याजवळ आहे. पुढे अनेक नाट्यमय घटना घडल्या व तिसऱ्या दिवशी विंग कमांडर अभिनंदन भारतात दाखल झाले. विंग कमांडर अभिनंदन त्यांच्या सुटकेचा अवघ्या देशाला आनंद झाला. दरम्यान पाकिस्तानच्या पायलटला भारतीय पायलट समजून पाकिस्तानच्या आंधळ्या देशप्रेमी जनतेने एवढी मारहाण केली की त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी बातमी वाचण्यास मिळाली. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेवेळीसच काश्मीमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला झाला व आपले चार जवान धारातीर्थी पडले. याच दिवशी देशसेवा बजावताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरगती प्राप्त झालेल्या जवानांवर अंत्यसंस्कार झाले. त्यामध्ये नाशिकच्या निनाद मांडवगणे यांचाही समावेश होता. एकूणच आजवरच्या सर्व घटना पाहता आपल्या लक्षात येते की कोणत्याही दलाचा जवान हा आपले कर्तव्य पार पाडताना जीवाची बाजी लावतो. प्रसंगी हसत हसत बलिदान देतो. त्यांच्या बलिदानामुळे, त्यांच्या त्यागामुळे, त्यांच्या पराक्रमामुळे इतर देशवासियांना सुखाची झोप मिळते व लोकशाही टिकते. परंतु जवानाच्या बलिदानाची किंमत मात्र त्यांच्या कुटुंबाला चुकवावी लागते. युद्धाने कुणाचेही भले होत नाही. मनुष्यहानी व देशाच्या विकासाला खीळ हे मोठे तोटे युद्धामुळे होतात. मानवाच्या विकासासाठी जगात शांतता हवी. हे सत्य असले तरी पाकिस्तान, तालिबानी, इसिस ही अशी कीड आहे की त्यांना शांततेची भाषा समजत नाही. याशिवाय जगभरातील शस्त्रास्त्रे निर्मिती करणारे मोठे कारखानदार यांनाही शांतता बोचत असते. जगात कायम युद्धजन्य परिस्थिती रहावी यासाठी ते प्रयत्नशील असतात. कारण सगळीकडे शांतता प्रस्थापित झाली तर त्यांची दुकानदारी बंद होण्याची वेळ येईल. दहशतवाद व तेलाचे राजकारण ही युद्धजन्य परिस्थिती निर्मितीची आणखी मोठी कारणे आहेत. याशिवायही इतरही भरपूर कारणे आहेत की ज्यामुळे जगभरात कुठेना कुठे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, निर्माण केली जाते व छोटी मोठी युद्ध घडतात. त्यामध्ये निष्पाप नागरिक मरतात. त्या त्या देशाच्या सैन्याला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागते. अनेकांचे संसार उध्वस्त होतात. हे नाकारता न येणारे कटूसत्य आहे.

फक्त भारत पाक संबंधाबाबत विश्लेषण करायचे झाल्यास…  पाकिस्तानचे अंतर्गत राजकारण, सामाजिक स्थिती खूप गुंतागुंतीची आहे. तिथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात खूप मोठी दरी आहे (तशी सगळीकडेच आहे) सर्वसाधारण पाकिस्तानी जनतेला त्यांचे लष्कर व राजकीय नेते दुय्यय स्थान देतात. पाकिस्तानचा कारभार काही लष्करी अधिकारी, ठराविक सरकारी अधिकारी व राजकीय धेंडे चालवतात. हे लोक मोठे जमीनदार,उद्योगपती व व्यापारी आहेत. मूठभर अतिश्रीमंत व्यावसाईक लोकांचे हितसंबंध पाकिस्तानी सैन्यांशी आहेत. या अतिश्रीमंतांचे आपापसात नातेसंबंध आहेत. एकमेकांच्या मुलामुलींचे परस्परात विवाह करून त्यांनी आपले वर्तुळ मर्यादित ठेवले आहे. पाकमध्ये सैन्याचे वर्चस्व रहावे यासाठी हा अतिश्रीमंत वर्ग कायमच प्रयत्नशील असतो. पाकमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापित झाल्यास त्यांचे बिंग फुटेल व त्यांच्या वर्चस्वाला धक्का पोचेल याची त्यांना पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ते पाकिस्तानच्या जनतेला आणि कठपुतळी सरकारला कायम नाचवत असतात आणि दबावात ठेवून भारताविरुद्ध चेतवत राहतात. त्यांचे आसन मजबूत राहण्यासाठी भारत -पाक संबध ताणलेले असणे गरजेचे असते. शिवाय चिनसारखा देश भारताची अर्थव्यवस्था कमजोर करण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद पोसण्यास अप्रत्यक्षरीत्या मदत करत असतो. पाकिस्तानची आर्थिक व सामरिक शक्ती भारताच्या तुलनेत कमी असल्यामुळे पाकिस्तान थेट युद्ध न करता दहशतवादी कृत्य व दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम सतत करत असतो. कारगिल घडण्याआधीही आणि नंतरही आपले असंख्य सैनिक व नागरिक विनायुद्धाचेच मारले गेलेत. आतापर्यंत भारताने खुप मोठ्या मनुष्यहानीचे नुकसान सोसले आहे. पाकिस्तानने घडवून आणलेल्या उरी आणि पुलगामा हल्ल्यात आपली सहनशीलता संपली व त्याची प्रतिक्रिया उमटली. भारतीय सैन्याने पाकिस्तानला समजेल अशा भाषेत कारवाई केली. परंतु या कारवाईला युद्ध म्हणून समोर आणून पाकिस्तानी सेनेप्रमाणे भारतीय मीडियानेही अकलेचे तारे तोडले. काहीवेळा ठकास महाठक बनावे लागते व भारतीय सेनेने दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करून हे दाखवूनही दिले. पाकिस्तान व पाकिस्तानी दहशतवादी हे कधीही सरळ न होणारे कुत्र्याचे शेपूट आहे. साम-दाम-दंड-भेद ही नीती वापरून त्याचे वाकडे शेपूट तोडावेच लागेल. म्हणजे त्याना सर्व बाजूनी पंगू करावे लागेल. त्यासाठी आंतराष्ट्रीय दबाव वाढवून जरब म्हणून काही प्रमाणात युद्धही करावे लागेल. हे सर्व करण्यासाठी आपले सैन्य व नेतृत्व सक्षम आहे. पाकिस्तानवर इलाज करताना युद्ध हा अंतिम पर्याय असायला हवा. व आपल्या देशाने याबाबत कायमच संयम दाखवलेला आहे. व जगात वेगळा ठसा उमटवला आहे.

एकीकडे हे घडत असताना देशाच्या नागरिकांचीही काही कर्तव्य असतात. परंतु इंटरनेटचे कोलीत हातात घेऊन
जनता व न्यूज सांगताना वापरावयाच्या दांडक्यालाच बंदूक समजणाऱ्या न्यूज अँकरनी सर्व लाज-शरम सोडून, सैन्य कारवाईला एखाद्या क्रिकेट मॅचच्या कॉमेंट्रीचे स्वरूप दिले. कमरेचे सोडून डोक्याला बांधलेल्या विकाऊ मीडियाने अगदी ताळतंत्र सोडला आणि देशभरात युद्धज्वर वाढीस लावण्याचे काम अत्यंत बेजबाबदारपणे पार पाडले. काही राजकारणी व त्यांचे चेलेही त्यामध्ये रॉकेल ओतण्याचे काम करत आहेत. सध्या देशातील हे वातावरण पाहता व्हाट्सएप बच्चन, फेसबुकवीर आणि मीडियावरील टुकार अँकर यांना मिसाईलला बांधून पाकमध्ये सोडायला हवे असे वाटते. सोशलमीडियावरून आणि ac न्यूज रूम मध्ये बसून गप्पा मारण्याइतप्त युद्ध सोपे नसते हे त्यांच्या अविकसित मेंदूला समजेनासे झाले आहे. दोन दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या नाशिकच्या निनाद मांडवगणे यांच्या पत्नीने याबाबत खूप बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. सुरक्षित घरात बसून युद्धाची भाषा बोलणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही प्रतिक्रिया आहे. त्या म्हणाल्या, ‘केवळ मुर्दाबाद किंवा झिंदाबाद अशा घोषणा देत राहू नका, त्याने काही होणार नाही. काही खरेच करायचे असेल, तर सैन्यात दाखल व्हा. काही कारणामुळे ते शक्य नसेल, तर कुटुंबातील कोणाला तरी सैन्यात भरती व्हायला सांगा. तेही शक्य नसेल, तर देशसेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. ते अवलंबा. तुमच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा, कचरा होऊ देऊ नका, उघड्यावर शौचास बसू नका, महिलांना त्रास देऊ नका, त्यांची छेड काढू नका… असे झाले, तरच महिला सुरक्षित राहतील. आम्ही सगळे सुखरूप आहोत, हे कळल्यावर निनाद यांच्या आत्म्यालाही शांती मिळेल.’ आयुष्याचा जोडीदार अर्ध्यावर साथ सोडून गेलेला असतानाही तान्ह्याबाळाला घेऊन त्यांनी ज्या धैर्याने देशहिताच्या गोष्टी बोलून दाखवल्या त्या प्रत्येकाने कायम लक्षात ठेवायला हव्यात. परंतु शहिदांच्या श्रद्धांजली पोस्टखालीच  वाढदिवसाचा केक तोंडाला फासून पोस्टीवर पोस्टी टाकणाऱ्या आणि स्वतःच्याच प्रेमात पडलेल्या देशवासियांना खरे देशप्रेम केव्हा समजेल? हा मोठाच प्रश्नच आहे. सैनिक व त्यांचे कुटुंबीय देशसेवेची, देशप्रेमाची, देशभक्तीची जबाबदारी पार पाडतात. प्रत्येक भारतीयाने आजूबाजूला घडणाऱ्या चुकीच्या घटनांवर लक्ष ठेवून त्या रोखण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. दैनंदिन वागणुकीत देशहिताच्या गोष्टी करून सच्चे देशभक्त बनायला हवे.
खरं तर युद्ध नसावेच पण काही वेळा पापिस्तानसारखा शेजारी असल्याने पर्याय रहात नाही. युद्धात ज्यांच्या घरचे कोणी शहीद होते किंवा विनाकारण मरते त्यांना युद्ध म्हणजे काय समजून येते. ज्यांना युद्ध लढावे लागत नाही त्यांना युद्ध हवे असते तर ज्यांना लढावे लागते त्यांना ते नको असते. युद्धाने विकास व मानवजात धोक्यात येते हे सर्वांना समजायला हवे. यासाठी जगभर खुप मोठी वैचारिक क्रांती हवी परंतु विचार करायला वेळच नसलेल्या संवेदनाहीन लोकांच्याकडून अश्या क्रांतीची अपेक्षा हे दिवास्वप्न ठरेल!
@संदिप रामचंद्र चव्हाण

3 comments:

  1. संदिप दादा, ग्रेट

    लेख आवडला

    ReplyDelete