My Blog List

Thursday 7 March 2019

माणदेशी माणसं




माणदेशी माणसं
ज्येष्ठ ग्रामीण कथाकार, कादंबरीकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळ येथे झाला. त्यांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी काही दिवसांपूर्वी मी वाचली होती. त्यावेळी त्यांचे माणदेशी माणसं हे १९४०/५० च्या दशकातल्या ग्रामीण कथांचे पुस्तक वाचायचे असे ठरवले होते. आज ते वाचून पूर्ण झाले.

माणगंगा नदीच्या काठाला असलेल्या सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील परिसराला माणदेश म्हणून ओळखले जाते. कायम दुष्काळ असणाऱ्या या भागात माडगूळकरांचे बालपण गेले. त्यांना त्यांच्या लहानपणापासून भेटलेली, त्यांच्या मनात घर करून राहिलेली काही माणसं त्यांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी ‘मौज’ साप्ताहिक मध्ये कथा म्हणून लिहण्यासाठी कागदावर उतरून काढली. नंतर १९४९ मध्ये या सर्व कथांचे मिळून ‘मानदेशी माणसं’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

स्वातंत्र्यपूर्व आणि संस्थान काळातील मानदेशातील खेड्याचे समाज-जीवण कसे होते. याचबरोबर तेथील बलुतेदार पद्धती, तेथील गरिबी, बोलीभाषा, सामाजिक- शैक्षणिक परिस्थिती, वाहतुकीच्या आणि जीवनावश्यक साधनांची असणारी कमतरता, आजूबाजूच्या परिसराचे-घरांचे- माणसांचे त्यांनी केलेले निरीक्षण पुस्तकात वाचावयास मिळते. त्यांच्या लिखाणाची शैली आपल्याला पुस्तकातून त्या काळात घेऊन जाते. आणि या कथा आपल्यासमोरच घडत आहेत असं जाणवू लागतं.
सगळीकडे असतात तशी प्रेमळ आणि तरेवाईक माणसं माडगूळकरांनाही भेटली. त्याच्या आयुष्यात आली. ही माणसं कशी जगतात, काय विचार करतात, काय भोगतात, या माणसांची जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, कुठल्याही परिस्थितीत पाय रोवून आला तो दिवस सुख-दु:खासह स्वीकारण्याची त्यांची उमेद, चांगल्या-वाईटाबद्दलच त्यांचं वैयक्तिक मतं इत्यादी गोष्टी पुस्तकातून आपल्याला समजतात.

“बकऱ्यावानी पालापाचोळा खाऊन जगायचं आलं कपाळी’’ म्हणणारा ‘धर्मा रामोशी’ आणि धर्मासाठी दिलेलं जुनं धोतर ‘लुगडं’ म्हणून वापरणारी त्याची मुलगी ‘बजा’ पहिल्याच कथेतून गरिबी म्हणजे काय असते याची जाणीव करून देते. ‘‘मास्तर, मी न्हाई जायाचा आता त्या साळंत!’’ अस म्हणत तात्पुरत्या बदलीवर आलेल्या शाळा मास्तरच्या गळ्यात पडून रडणारा लोहाराचा ‘झेल्या’ विद्यार्थी- शिक्षक हे नातं कसं असावं आणि कसं नसावं हे सांगून जातो.
गरिबीमुळे हौस-मौज पुरवू न शकलेल्या ‘रामा मैलकुली’ला त्याची बायको सोडून जाते. तरीही “कुटंबी सुकात असली म्हंजे झालं," असं सोडून गेलेल्या बायकोबद्दलचं त्याचं मत  त्याच्या निर्मळ मनाचं आणि साधेपनाचं दर्शन घडवते.
‘‘चुलत्यानं डागलंय, खुरपी तापवून डाग दिल्यात. डागल्यावर येड लागलेलं मानूस बरं हुतं. मी काय वेडा हाय का?’’ अशी कैफियत मांडणारा पोरका ‘मुलाण्याचा बकस’ आणि आयुष्याभर फक्त दुःख आणि दुःखच भोगलेल्या ‘बिटाकाका’ची हकीकत वाचून संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी येते.
प्रेमळ स्वभावाचा, स्वतःचा वाडा जळल्यावर रानात झोपडी बांधून राहनारा, आणि कुणाचेही उपकार न घेणारा ‘बन्याबापू’; जुन्या रूढी आणि गैरसमजाना चिटकून राहिलेला ‘रामू तेली’; साध्या-सरळ मनाचा परंतु चिलमीच्या व्यसनासापाई आयुष्यातून बरबाद झालेला ‘शिवा माळी’; प्रेमळ, कष्टाळू आणि तरीही आयुष्याची शोकांतिका झालेली ‘तांबोळ्याची ‘खाला’; गरिबीमुळे नैराश्याने ग्रासलेला ‘रघु कारकून’; तमशापाई मास्तरकी सोडणारा ‘नामा’ आणि काबाडकष्ट करूनही गावात पोट भरत नाही म्हणून गाव सोडून मुंबईतील तमाशात गेलेला ‘गणा’ ही सगळी चांगल्या स्वभावाची परंतु परिस्थितीने गांजलेली माणसं वेगवेगळ्या कथांमधून आपल्याला भेटतात.
त्याचप्रमाणे गांधीहत्येनंतर उसळलेल्या दंगलीत हात धुऊन घेणारा ‘शिदा चांभार’; शेतीच्या बांधावरून भाऊबंधकी आणि हाणामाऱ्या करणारा ‘कोंडीबा गायकवाड’; बायकोपेक्षा पोट भरणाऱ्या जनावराला (अस्वल) महत्व देणारा ‘बाबाखान दरवेशी’; इत्यादी बेरकी स्वभावाची माणसंही वेगवेगळ्या कथेतून पुस्तकात आपल्याला भेटतात.
गरीब, साधीसुधी, मनमिळाऊ, बेरकी अश्या वेगवेगळ्या स्वभावाची माणसं भेटून झाल्यावर शेवटी कष्टाविना पैसा हवा असणारा ‘गणा भपट्या’ वाचल्यावर मात्र, मनसोक्त हसून पुस्तकाचा शेवट होतो.
अशी ही माणदेशातली वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या स्वभावाची सोळा व्यक्तिचित्रे व्यंकटेश माडगूळकरांनी अत्यंत नैसर्गिक, साध्या पद्धतीने आणि छान शैलीत रंगवली आहेत.      

आज सत्तर वर्षांनी बहुतांश खेड्यांमध्ये खूप मोठे अमूलाग्र बदल झालेत. शैक्षणिक सुधारणा झाल्या, रस्ते झाले, कुडा-मेढीच्या घरांची जागा आरसीसी घरांनी घेतली, बलुतेदार पध्दत जवळपास संपली आहे, टीव्ही, मोबाईल, दळवळणाची साधनं घरोघरी पोहचली आहेत. एकंदरीत भौतिक विकास झाला आहे. परंतु या विकासात एकमेकांना धरून राहणारी, एकमेकांचा आदर करणारी, प्रेम-जिव्हाळ्याची माणसं मात्र कायमची हरवली आहेत.
एके काळी जातीच्या नावाने हाक मारूनही माणसांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम होते. आपुलकी होती. आपलेपणा होता. आज जातीपतीची दरी एवढी वाढली आहे की माणसाला माणूस म्हणून जवळ न करता तो आपल्या जातीचा आहे का हे पाहून जवळ करण्याची वृत्ती वाढीस लागली आहे. या बदलेल्या परिस्थितीची तुलना ७०/८० वर्षांपूर्वीच्या परिस्थितीशी करता मनात एक प्रश्न पडल्यावाचून राहत नाही आणि तो म्हणजे... अडाणी,गरीब,सोशीक,निर्मळ मनाची,माणुसकी जपणारी, आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणारी माणसं होती तो काळ चांगला ?? की स्वार्थी, निगरगट्ट, भ्रष्टाचारी, स्वतःपुरता विचार करणाऱ्या, माणुसकी हरवलेल्या माणूस नावाच्या जमातीचा हा काळ चांगला???
@संदिप रामचंद्र चव्हाण.

माणदेशी माणसं
लेखक: व्यकंटेश माडगूळकर
प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत: १२५
पृष्ठे: १२८

No comments:

Post a Comment