My Blog List

Friday, 16 March 2018

किंडल_डिव्हाईस

किंडल_डिव्हाईस ....चालतं फिरतं ग्रंथालय!
वाचनाचे बदलते तंत्र.

गोष्ट तशी जुनीच आहे. परंतु ग्रामीण भागातील पुस्तकप्रेमीसाठी थोडंस नवीन तंत्रज्ञान म्हणजे अमेझॉन किंडल डिव्हाईस होय.
अनेक पुस्तक प्रकाशकांनी खूप सारी पुस्तके वेगवेेगळ्या इबुक्स स्वरूपात आणली आहेत. डेलिहंट इबुक्स, बुकगंगा इबुक्स, साहित्य प्रतिष्ठान यांनी आणलेली इबुक्स, वेगवेगळी पुस्तकाची अँड्रॉईड अँप, अमेझॉन किंडल इबुक्स इत्यादी. ज्या त्या संस्थेने आपापली अँप डेव्हल केली आहेत. काहींनी ईबुक रीडर डिव्हाइस ही टॅबसारखी इलेक्ट्रॉनिक वस्तू (गॅजेट) बनवली आहे. त्यापैकी एक म्हणजे 'अमेझॉन किंडल ईबुक रीडर' होय.


मराठी पुस्तकप्रेमी या फेसबूक ग्रुपवर काही ग्रुप सदस्यांना या बद्दल माहिती हवी होती. त्यांना व सर्व मित्रपरिवराला माहिती कळावी या हेतूने...

जे जे आपणासी ठावे।
ते ते इतरांसी सांगावे।
शहाणे करुन सोडावे।
सकळ जन।।

या भावनेने हा लेख प्रपंच.

अनेक प्रकारची, अनेक विषयांची, अनेक भाषांची, अनेक लेखकांनी लिहलेली, अनुवादित केलेली पुस्तकं मिळण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय किंवा त्याला वाचनालय म्हणण्याचाही प्रघात आहे. सार्वजनिक वाचनालये, शाळा- कॉलेजची, पालिका- महापालिका यांची ग्रंथालये वाचकांसाठी आवडीची ठिकाणे असतात. मोठ्या लोकांची स्वतःची मोठी लायब्ररी घरात किंवा कार्यालयात असते. सर्वसामान्य वाचकप्रेमी जमेल तसा पुस्तकसंग्रह करत असतो. पण सर्वसामान्य लोकांना बऱ्याच वेळा छोट्या घरात पुस्तकांची व्यवस्थित निगा राहील असे कपाट किंवा पुस्तक ठेवण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करणं मोठं जिकिरीचं होतं. शिवाय नोकरी करणाऱ्यांना, भाड्याच्या घरात राहणार्यांना, बदली झाल्यावर किंवा घर बदलल्यावर संग्रही असणारा पुस्तकसाठा इकडून तिकडे नेण्यात अनेक अडचणी येतात. पेपरलेसच्या जमान्यात यावर उपाय म्हणजे सर्व भाषांमधील पुस्तके इलेक्ट्रॉनिक बुक(ईबुक) स्वरूपात उपलब्ध होऊ लागली आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेझॉनने आणलेले किंडल ईबुक होय. 2004 मध्ये अमेझॉनने किंडल ईबुक रीडरची प्रथम पिढी मार्केटमध्ये आणली. आता त्यात संशोधन होऊन आठवी/ नववी पिढी बाजारात आली आहे. अमेझॉनने पुस्तकांच्या दुनियेत मोठा क्रांतिकारक प्रयोग केला व जगभरात त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. इंग्रजी भाषेत शेकडो पुस्तके अगदी मोफत आहेत तर प्रादेशिक भाषेतही काही ठराविक पुस्तके मोफत आहेत. चांगल्या चांगल्या पुस्तकांवर भरगोस सूट व हार्डकॉपीच्या मनाने कमी किंमत, फॉन्ट लहान मोठा करायची व्यवस्था, अमेझॉन आकाउंटशी कनेक्ट असल्यामुळे ईबुक लायब्ररी कोणत्याही नवीन गॅझेटवर(मोबाईल किंवा किंडल डिव्हाइसवर) पुन्हा उपलब्ध होते. हजार ते पंधराशे पुस्तके सेव(डाऊनलोड) होऊ शकतील अशी इंटर्नल मेमरी, डोळयांना त्रास होणार नाही असे तंत्रज्ञान, जिथे वाचायचे थांबलो तिथूनच पुढे सुरवात, चांगले ब्याटरी ब्याकप इत्यादी अनेक सुविधा नवीन जनरेशनच्या किंडल मध्ये आहेत.

भारतात किंडल ईबुक लॉन्च करून दहा वर्षे झाली आहेत. सध्या किंडल डिव्हाइसवर भरगोस सूट व त्या बरोबर पुस्तक खरेदी साठी 80% डिस्कउंट मिळणारे दोन हजाराचे प्रमोशन गिफ्ट इत्यादी ऑफर सद्या मिळत आहेत.
किंडलवर खरेदी केलेले पुस्तक आवडले नाही तर काही दिवसाच्या मुदतीत परत करता येते. विकत घेतले पुस्तक परत करण्यासाठी ठराविक संख्येची मर्यादा आहे. नाहीतर प्रत्येक पुस्तक वाचून परत केले जाईल. हे कंपनीने लक्षात घेऊन यावर मर्यादा घातली आहे. पुस्तक परत केल्यावर जेवढे पैसे पेड केलेत तेवढे माघारी मिळतात. खरेदीआधी कोणत्याही उपलब्ध ई पुस्तकाचे सँम्पल मोफत डाउनलोड करता येते. त्यातून पुस्तकाचा सार समजू शकतो. एकच पुस्तक एकाच वेळी किंडल डिव्हाईस व मोबाईल किंडल अँपवरती वाचता येते.

किंडल ईबुक रीडरवरचा पुस्तक संग्रह वाचायला किंडल डिव्हाईसच हवं असं नाही. मोबाईल मधे किंडलचा ॲप इन्स्टॉल करून अमेझॉन आकाउंटचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकला की ॲमेझॉनवर किंडल अँप रजिस्टर होतो. किंडल डिव्हाइस रजिस्ट्रेशनही अमेझॉन लॉगिन आयडीनेच करायचे असते. किंडल डिव्हाइस असल्याचा फायदा म्हणजे ते फक्त वाचाण्यासाठी डिजाईन केलं आहे. ऍडीओ, व्हिडीओ, इतर अँप्स, गेम्स इत्यादी काहीही नसते. त्यामुळे फक्त वाचनावर लक्ष केंद्रीत होते. त्याचप्रमाणे यावर पुस्तक वाचताना कागद वाचतोय असं फील होते. स्क्रीन ब्राइटनेस ॲडजस्टेबल असल्याने डोळ्यांना सुट होईल तसा सेट करता येतो (पाच हजारच्या आसपास मिळणारे बेसिक मॉडेलमध्ये LED लाईट नाहीत त्यामुळे ते मॉडेल फक्त उजेडातच वापरता येते) अक्षरांचा आकार हवा तितका लहान मोठा करता येतो. त्यामुळे चेष्मा विसरला किंवा जवळ नसला तरी काही फरक पडत नाही. आपण पुस्तकाची हार्डकॉपी जिथे वाचायचे थांबू तिथे काहीतरी खूण ठेवतो तसेच किंडल डिव्हाईस स्वतः लक्षात ठेवते व जिथं थांबलो त्या पुस्तकाचे तेच पान उघडते. त्या मध्ये लेखकांच्या नावावरून, प्रकाशकांच्या नावावरून, कथा, कादंबरी, ऐतिहासिक इत्यादी नावाने फोल्डर बनवता येतात.
मी हार्ड कॉपी व किंडल पेपरव्हाइट ईबुक दोन्ही वापरतो. किंडलवरती पुस्तके हार्डकॉपीच्या तुलनेत कमी किमतीत मिळतात. शिवाय वार्षिक अनलिमिटेड प्लॅन घेतला तर वर्षभर उपलब्द सर्व पुस्तके फ्री मिळतात व वर्षाने पुन्हा पैसे भरावे लागतात. या प्लॅनची पुस्तके कायम अकाउंटवर राहत नाहीत. मी कोणतंही पुस्तक विकत घेतो ते कायमस्वरूपी आपल्या अकाऊंटवर राहते. शिवाय काही पुस्तके फ्री मिळतात. इंग्रजी वाचणाऱ्यांना खूप पुस्तके कमी किमतीत किंवा फ्री मिळू शकतात.
अमेझॉन अँपवरती marathi ebooks for Kindle  असे सर्च केले की पुस्तकांची यादी मिळते. हवे त्या पुस्तकाच्या किंवा लेखकाच्या नावानेही पुस्तक शोधाता येते.
वेगवेळ्या मॉडेलनुसार किंडल डिव्हाइसची किंमत चार हजार ते चाळीस हजार असू शकते. सध्या ईबुक रीडरच्या किंमती जास्त दिसत आहेत. अमेझॉनच्या विशेष ऑफर मध्ये किंमत 10 ते 20 टक्के कमी असते. त्याच वेळी पेटीयम वर त्यापेक्षा कमी किंमत असू शकते हा माझा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी अमेझॉनवर किंडल पेपरव्हाइट 8999 ला होते तेव्हा पेटीयमवर 7265 होते. काहीवेळा पुस्तक खरेदीसाठी 2000 रु चे 80 टक्के डिस्काउंट कुपन मिळत. त्यामध्ये 2500 ची पुस्तके 500 मध्ये मिळतात.
 वाचनाची आवड असणार्यांसाठी किंडल नक्कीच उपयुक्त आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
(टीप: मी वर उल्लेखलेल्या कोणत्याही कंपनीचा एजेंट नाही. किंवा ही माहिती देण्यात माझा कोणताही आर्थिक लाभ नाही)

किंडल मोबाईल अँप ची लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.kindle

Wednesday, 14 March 2018

शेतकरी मोर्चाच्या निमित्ताने...

शेतकरी_मोर्चाच्या_निमित्ताने...
नाशिकहून ६ मार्च रोजी निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चाची सांगता १२ मार्च रोजी झाली. ३० ते ४० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई अशी पायपीट करत अतिशय शांत, संयमाने मार्गक्रमण करून आपल्या मागण्या मायबाप सरकारपुढे ठेवल्या. सरकाने लेखी आश्वासन देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली व मोर्चा विसर्जित झाला. सरकार मागण्यांची पूर्तता व दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी करते हे पुढे दिसेलच. मोर्चा मुबंईत पोचण्याआगोदर निर्णय घेऊन आंदोलक शेतकऱ्यांच्या त्रासाला पूर्णविराम देता आला असता. पण निबर झालेले अधिकारी, लोकप्रतिनिधी, मंत्री, शासकीय यंत्रणा, कोणतीही गोष्ट गळ्याला आल्याशिवाय लक्ष देत नाहीत. अशी काहीशी परिस्थिती कायमच दिसत आली आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हे आंदोलन यशस्वीपणे हाताळले असं म्हणावं लागेल. त्यांनी अजून तत्परता दाखवली असती तर हे आंदोलन कसारा घाट ओलांडुन पुढे गेले नसते. तरीही त्यांनी हे आंदोलन जास्त चिघळू न देता हाताळले... हेही नसे थोडके!!

शेतकरी मोर्चाबद्दल अनेक समज गैरसमज सोशलमीडियामध्ये चर्चिले गेले. अजूनही त्यावर वादविवाद चालूच आहेत. सोशल मीडियावर या मोर्चातील काही फोटो आणि मोर्चासंबंधीच्या काही पोस्ट अनेकांनी शेअर करत शक्य त्या सर्व मार्गांनी अन्नदात्याचे हे प्रयत्न मोठ्या स्तरावर इतरांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले. प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मिडियानेही दखल घेतली. कोणी वाटेत खायची,नाष्ट्यापाण्याची सोय केली. कोणी जखमींवर उपचार केलेे. तर कोणी चुकीचे आरोप करून शेतकऱ्यांच्या मनाला जखमी केले. मोर्चातील शेतकऱ्यांचे, त्यांच्या जखमी पायांचे, तुटलेल्या चपलांचे, त्यांच्या कारुण्याचे, दयनीयतेचे फोटो पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. तर काहींनी टोमणे मारले. सर्वंच राजकीय पक्षांनी पाठींबा देऊन मतपेटी मजबूत करण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी तशी राजकीय नेत्यांनी मोर्चाला भेट दिली. सगळेच राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत हे न उमजलेले एक कोडेच आहे.

या मोर्चात शेतकऱ्यांना काय मिळाले? फक्त आश्वासनांची कागदी भेंडोळी! या पेक्षा काही नाही.
शेतकर्याच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या व अनेक समस्या आहेत त्याला आतापर्यंतची सर्व सरकारे जबाबदार आहेत. राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा समस्या सोडवण्यावर भर द्यायला हवा. पण असं होताना दिसत नाही. प्रगल्भता येण्याऐवजी दिवसेंदिवस राजकीय पक्षांचे व नेत्यांचे वैचारीक अधपतन होताना दिसत आहे. त्याच्या नेमकं उलट वर्तन अशिक्षित, जेमतेम शिकलेला शेतकरी आपल्या मोर्चातुन दाखवतो तेव्हा नक्कीच तो कौतुकास पात्र ठरतो.
स्वतः आत्मक्लेश सहन करून आपल्या मागण्या मांडणे, भरपूर संख्या जमली तरी उन्माद न करता शांतता ठेवणे, आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे, इत्यादी गोष्टींचा वस्तुपाठच या मोर्चाने घालून दिला. एवढ्या संख्येने लोक जमतात परंतु गडबड, गोंधळ, पळापळ, जाळपोळ, दगडफेक यातले काहीही होत नाही. आंदोलक आपल्या शिस्तीचे दर्शन घडवत, मुंबईत आल्यावर दहावीच्या मुलांना त्रास नको म्हणून स्वतः त्रास सहन करून कित्येक किलोमीटर चालत रातोरात आझाद मैदानात पोचतात. शांततामय मार्गाने आपले म्हणणे मांडतात. त्यासाठी शांतपणे मोर्चा काढतात. खाजगी, सरकारी मालमत्तेचे नुकसान न करता मोर्चा विसर्जीत करतात. हे शेतकऱ्यांच वागणं प्रगल्भता दाखवत नाही का? सध्या विविध आंदोलनामध्ये विध्वंसक वृत्ती वाढत असताना असा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिलेला आंदोलनाचा एक चांगला पर्याय आहे. (याचा प्रत्यय 'मराठा क्रांती मोर्चा' मध्येही आला आहे.)
या चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून शेतकरी मोर्चाला नक्षली चळवळीचा संबध कोणी जोडत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे. हस्तिदंती मनोऱ्यात बसून शेतकरी कष्टकरी जनतेच्या भावना लक्षात येत नाहीत. त्यासाठी समाजाची नाळ जुळावी लागते. परंतु सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना कष्टकरी जनतेचे प्रश्न कसे समजणार??

आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झाले, झेंड्याचा रंग कोणता होता हे पाहण्यापेक्षा या मोर्चात आंदोलक शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने त्रास सहन करून कसा आला हे पहावे लागेल. अनेक वेळा आश्वासने मिळून आपल्या मागण्या वर्षोनुवर्षे तशाच आहेत. सत्तेच्या साठमारीत आपल्या प्रश्नांची दखल घेतली जात नाही ही भावना शेतकऱ्यांमध्ये बळावली. विरोधीपक्षातील लोक आपल्या मागण्यांसाठी आग्रही दिसत नाहीत व सत्ताधारी मागण्यांकडे दुर्लक्ष करतात असा समज सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनात तयार होण्याला कोण जबाबदार आहे??
शेतकऱ्यांना झेंड्याच्या रंगाशी देणे घेणे नाही त्यांना गेंडयाच्या कातडीच्या व्यवस्थेपुढे आपले प्रश्न, समाश्या मांडणारे, त्यांना पटवून देणारे नेतृत्व हवे आहे. त्यामुळे हा मोर्चा कोणी काढला हे पाहण्यापेक्षा हा मोर्चा शेतकऱ्यांचा होता असे पहायला हवे.

कोणता झेंडा घेऊ हाती?? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असताना स्वार्थाने का होईना कोणी त्यांच्या प्रश्नांना सरकार दरबारी मांडण्यात पुढाकार घेत असेल तर सर्वत्र अंधकार दिसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना हा आधार वाटल्यास नवल नाही. शेतकऱ्यांना आता पर्यंत सर्वजण फसवत आले आहेत. संघटित नसल्यामुळे शेतकरी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यात कायमच मागे पडला आहे. शेतकऱ्यांच्या आडून सर्वजण सत्तेची खुर्ची जवळ करतात. कदाचित हा मोर्चाही त्याला अपवाद नसेल. मोरच्यातुन स्वतःची इमेजबिल्डिंग व त्यातून राजकीय लाभ असाही कोणाचा छुपा हेतू असू शकतो. परंतु जी संघटना एखादे आंदोलनाचे नियोजन करते तेव्हा तिचे नाव, त्यांचे ब्यांनर, झेंडे त्यात ओघाने येणारच!.. ते काही दुसऱ्या संघटनेचे, पक्षाचे झेंडे आंदोलकांच्या हातात देतील का?? हे लक्षात घेणे जरुरी आहे. टोप्या उन्हापासून रक्षण करतात तरीही 'टोप्या व झेंड्यापेक्षा आंदोलक शेतकऱ्यांना चप्पल द्यायला हवी होती' या काहींनी दिलेल्या सुचनेवर शेतकरी नेत्यांनी नक्कीच विचार करायला हवा. अनाठायी खर्च कोणत्याही संघटनांनी टाळायला हवेत व मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. हे मात्र नक्की!

मुळात या मोर्चातील मुख्य मागणी, वनजमीन कसणार्या शेतकर्याच्या नावे ती वनजमीन असावी ही होती. आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे कागदोपत्री जमीन नसल्यामुळे त्यांना साधं कर्जही मिळत नाही. इतरही मागण्या होत्या परंतु त्या दुय्यम होत्या. मोर्चात सहभागी झालेले शेतकरी प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील पेठ, हरसूल, सुरगाण्यासह आदिवासी भागातील होते. सलग सहा दिवस रणरणत्या उन्हात पायपीट करत निघालेले मोर्चेकरी जसजसे पुढे गेले, तसतसे नाशिकसह ठाणे, पालघर आणि इतर आदिवासी भागातील शेतकरी मोर्चात सहभागी होऊ लागले. मुळात त्यांना दिडदोनशे किलोमीटर चालायला लावणे गरजेचे होते का? त्याच्याबरोबर पूर्णवेळ मोर्चाचे आयोजक चालत होते का? हा प्रश्नच आहे?? या आंदोलनात बहुसंख्य आदिवासी शेतकरी व गरीब शेतकरी होते. कष्टप्रद आंदोलनात सुखवस्तू सहभागी होत नाहीत हेही ध्यानात घ्यायला हवे. घरुन घेतलेली कांदा भाकर, आणि मुक्काम असेल तिथे तीन दगडाच्या चुलीवर केलेला भात खाऊन आंदोलक सहभागी झाले होते. ते भाडोत्री नव्हते. आजकाल पैसे देऊन, वाहनांची सोय केल्यानंतरही राजकीय पक्षांच्या सभेला लोक येत नाहीत. तिथे रणरणत्या उन्हात रोज वीस ते तीस किलोमीटर चालत, शिळेपाके अन्न खाऊन स्वतःला त्रास करून कोण घेईल?? ज्या भागातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले तिथे 'अखिल भारतीय किसन सभा' या डाव्यांच्या संघटनेचे अस्तित्व असल्याशिवाय त्यांच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत. अनेक वर्षे अनेक समस्यांची झळ बसल्यामुळे शेतकरी सहभागी झाले असणार. भूलथापांना बळी पडून एवढ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील का?
डाव्यांनी असाच मोर्चा पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काढला तर यशस्वी होईलच अस नाही. बहुदा यशस्वी होणारच नाही. कारण त्यांचे तिथे अस्तित्व नाही. मुळात मोर्चा कोणी काढला हा मुद्दा गौण आहे. पश्चिम महाराष्ट्रात खासदार राजू शेट्टीनी आत्मक्लेश यात्रा काढली होती त्यालाही लोक पुणे ते मुंबई चालत आले होते. त्या मोर्चालाही शेतकऱ्यांचा उस्फुर्थ प्रतिसाद लाभला होता.भाडोत्री लोक अशा आंदोनलात येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न काय? ते आंदोलन का करतात? हे समजून घ्यायला हवे. फक्त वरवरची शेरेबाजी उपयोगाची नाही. यातून फक्त मनं कलुषित होतील... आणि प्रश्न जिथल्या तिथेच राहतील. राजकारणी लोक सेटलमेंट व सर्वसामान्यांची दिशाभूल करायला तरबेज असतात. त्यांना समाजातील विविध घटकामध्ये द्वेषाची दरी वाढली तर आनंदच होतो. कारण दुभांगलेल्या समाजावर पकड ठेवणे तुलनेने सोपे जाते. आज शेतकरी जात्यात आहेत तर इतर घटक सुपात आहेत. हे सर्वांनी लक्षात घेऊन शेतकर्याच्या दुःखावर फुंकर मारता आली नाही तर किमान डागण्यातरी देऊ नयेत.

भारतभर व महाराष्ट्र राज्यातही विभागवार शेतकऱ्यांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. अनेक शेतकरी संघटना आहेत. त्या वेळोवेळी आपलं अस्तित्व दाखवतात. या संघटनांच्या आडून संघटनेचे पुढारी काही वेळा आपला स्वार्थ साधतात. कोणी राजा हरिश्चंद्र नाही.
शेतकऱ्यांना हे समजत नाही अशातला भाग नाही. पण एकट्या दुकट्याने मागण्या मांडून, आंदोलनं करून, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवून काहीही हाती लागत नाही. एकट्याने लढलो तर त्याचा 'धर्मा पाटील' होतो हे शेतकऱ्याच्या लक्षात आले आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना कोणत्यातरी संघटनेचा झेंडा हाती घ्यावा लागतो. ही त्याची मजबुरी आहे. टीका करणार्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे.

शेतकरी आत्महत्या, शेतकरी संप, शेतकऱ्यांचा मोर्चा हा टिंगलटवाळी करण्याचा विषय नाही. हा खूप गंबीर सामजिक विषय आहे. सर्वांनाच सुख, संमृद्धि हवी असताना शेतकऱ्यांना का नको? त्यांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडण्यात काय गैर आहे? इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती घेऊन शेतकरी झालेल्यांना व नवश्रीमंत शहरी वर्गाला हे कधी कळणार?? का कळवूनच घेणार नाहीत??
सत्ताधारी शेतकर्याच्या बाजूने, विरोधक शेतकर्याच्या बाजूने असं असताना शेतकर्यांवर वारंवार आंदोलन करण्याची वेळ का येते?? राजकीय पक्षांच्या धुरणींनी यावर विचार करायला हवा. शेतकरी आज शांततेत मोर्चे काढतोय, आत्मक्लेश करून घेतोय, अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेली तर आत्महत्या करतोय. त्यांचा वापर वेगवेगळ्या संघटना व पक्ष गरजेनुसार करून घेतायत. हे वेळीच थांबायला हवे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात हाच शेतकरी आपला हक्क मिळवण्यासाठी दोन हात करायला उभा राहिला तर त्याचा दोष शेतकऱ्याला देता येणार नाही.

संदिप रामचंद्र चव्हाण.

Tuesday, 6 March 2018

'पहिली आठ वर्षं... सहज शिक्षणाची' आणि 'टीनएजर्सच्या मनात'

पहिली_आठ_वर्षं... सहज शिक्षणाची
लेखिका: डॉ. श्रुती पानसे (पीएचडी शिक्षणशास्त्र)
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १८०रु
पुष्ठ संख्या:१६०


मुल जन्माला आल्यापासून आठ वर्ष्याचे होईपर्यंत त्याची शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ कशी होते याबद्दल विस्तृत माहिती देणारे हे पुस्तक आहे. बाळ लहान असल्यापासून ते आठ वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा त्याच्या भावी आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असतो.
पहिली एकत्र कुटुंबात मुलं कशी मोठी व्हायची लक्षातही यायचे नाही... परंतु आज त्रिकोणी,चौकोनी कुटुंबात मुलांना वाढवणे म्हणजे अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या नवं पालकांना मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल.

मुल (मुलगा किंवा मुलगी या अर्थाने) जन्माच्या पूर्वतयारीपासून ते मुलाचा जन्म, त्याचे/ तिचे रांगणे, उभे राहणे, अडखळणे, चालणे, पळणे, बोलणे, चिडणे, रागावणे, रडणे, हट्ट करणे, खोड्या करणे, मोठ्यांचे अनुकरण करणे इत्यादी मुलाच्या वर्तणुकीचे सूक्ष्म निरीक्षण व आपल्या पीएचडी संशोधनात केलेला लहान मुलांचा वैज्ञानिक, मानसशास्त्रीय अभ्यास डॉ. श्रुती पानसेंनी सर्व पालक, शिक्षक, समाज, शासन यांना पुस्तकरूपाने उपलब्द करून दिला आहे.

कोणत्याही नवपालकांनी, शिक्षकांनी मुलांशी कसे वागावे व कसे वागू नये, मुल वाढवताना पालकांची भूमिका कशी असावी त्याच प्रमाणे पहिली आठ वर्षे ही मुलांच्या वाढीसाठी किती महत्वाची असतात याचे सोप्या भाषेत व अतिशय विचार करायला लावणारी मांडणी पुस्तकामध्ये केली आहे.
पुस्तक एकूण एकोणतीस प्रकरणात विभागले आहे. हे सर्व लेख सकाळच्या सप्तरंग पुरवणीत 'स्मार्ट संगोपन' या नावाने प्रसिध्द झाले आहेत.

मला हे पुस्तक का आवडले?
मी स्वतः पालकाच्या भूमिकेत असल्याने मला यातील बहुतेक सर्व मुद्दे व त्याबद्दलची माहिती महत्वाची वाटली.  मी मुलाशी कसे वागतो, कुठे चुकतो किंवा विनाकारण मुलावर रागवतो का? या बद्दल आत्मपरीक्षण करू लागलो.

हे पुस्तक कोणी वाचावे?
शून्य ते आठ/ दहा वर्षांच्या मुला-मुलींचे पालक, पाळणाघर ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, संस्थाचालक, शिक्षण अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील इतर घटक ज्यांचा संबध या वयोगटातील मुलांसोबत येतो, त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात निर्णय घेणारे राजकारणी व अंमलबजावणी करणारे सनदी अधिकारी, या व्यतिरिक्त ज्यांच्या घरी या वयोगटातील मुलं आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी हे पुस्तक वाचावे.

या पुस्तकाचा पुढचा भाग म्हणजे 'टिन एजर्सच्या मनात' त्याची माहिती खालीलप्रमाणे

पुस्तक परिचय: टीनएजर्सच्या_मनात
लेखिका: डॉ. श्रुती पानसे
प्रकाशन: सकाळ प्रकाशन
किंमत: १४०
पृष्ठ संख्या: १२०
'टीनएजर्सच्या मनात' हे पुस्तक साधारण ८-९ वर्षांपासून ते १८-१९ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या आईवडीलांसाठी लिहलेलं आहे. परंतु याचे वाचन या वयोगटातील मलामुलींना शिकवणाऱ्या शिक्षकांनी व या वयोगटातील मुलं ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी वाचल्यास मुलांच्या शारीरिक व मानसिक बदलाचीे शास्त्रीय, मानसशास्त्रीय माहिती मिळेल. हे पुस्तक एकूण २३ प्रकरणात विभागले आहे.


डॉ. श्रुती पानसे यांनी बालमानशास्त्र, मेंदू आणि शिक्षण यावर विविध पुस्तकं लिहली आहेत. लेखिका शिक्षणशास्त्रात पीएचडी आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणविषयक परिषदांमध्ये संशोधन निबंध सादर केले आहेत. विविध शिक्षणसंस्थांमधून व्याख्याने दिली आहेत. 'पहिली आठ वर्षं सहज शिक्षणाची' या पुस्तकाचा पुढील भाग म्हणून 'टीनएजर्सच्या मनात' या पुस्तकाकडे पाहता येईल.
बाळ हळू हळू मोठं होत असत. सुरवातीला बाळाच्या खोड्या बाललीला म्हणून कोणी गंबिरतेने घेत नाही. परंतु हेच बाळ जेव्हा आठ दहा वर्षाचे होते तेव्हा त्याला चांगली समज आलेली असते. नाईन ते नाइंटिन या वयोगटातील मुलं प्राथमिक, माध्यमिक शाळेत व ज्युनियर कॉलेजमध्ये असतात. त्यांच्या खोड्या, अनपेक्षित वागणं हे घरापूरते मर्यादित नसते. या वयात शाळा कॉलेजमधील मित्र मैत्रिणी, त्यांचे पालक, शिक्षक, यात गुंतले जातात. काहीवेळा मुलांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे 'लहान होती तेच बरे' असं म्हणायची वेळ पालकांवर येते.
९-१९ या वयोगटातील मुलामुलींच्या समस्या लहान वयोगटातील (०-८) मुलामुलींपेक्षा वेगळ्या असतात. शारीरिक वाढ, लैगिंक भावना, परलिंगी आकर्षण, अभ्यासाचा ताण, पालकांशी कमी होणारा संवाद, मित्र-मैत्रिणी अधिक जवळच्या वाटू लागने, स्वप्रतिमेच्या प्रेमात पडणे, कोणत्याही कामात वेळ काळाचे भान हरवणे, अघोरी धाडस करणे, भावनांवर नियंत्रण नसणे, सोशलमीडियाच्या आहारी जाणे, व्यसनात अडकण्याची शक्यता, सबकुछ चलता है ही प्रवृत्ती असणे, इत्यादी वेगवेगळ्या समस्या या वयोगटातील मुलांच्यात/मुलींच्यात दिसतात.

या पुस्तकात मुलाची, मुलीची शारीरिक वाढ, त्यांच्या हार्मोन्समध्ये होणारे बदल, शरीराने मोठे झाले तरी मेंदू विकसन पूर्णत्वाला आलेले नसणे, मोठं होण्याची लक्षणे, मेंदुसदर्भातील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, अमिग्डाला, न्यूरॉन्स, डेन्ड्राईट्स, न्यूक्लिअस, अक्झॉन, सीनँप्स इत्यादी बद्दल शास्त्रीय माहिती दिली आहे.
टिनएजर्सच्या वाढीचा मानसशास्त्रीय अभ्यास समजून घेण्यासाठी हे पुस्तक पालकांना, शिक्षकांना उपयोगी आहे.
हे पुस्तक मिळण्याची अमेझॉन लिंक

संदिप रामचंद्र चव्हाण.

Friday, 2 March 2018

निमित्त:होळी, धुलीवंदन, रंगपंचमी

निमित्त_होळी_धुलीवंदन_रंगपंचमी

काल होळी झाली.. आज धुलीवंदन (धुळवड) आहे. अजून चार दिवसांनी रंगपंचमी येईल. भारतीय संस्कृतीत सण-उत्सव यांची एक परंपरा आहे. निसर्गाच्या बदलाप्रमाणे व कृषिसंस्कृतीशी नाते सांगणारे वेगवेगळे सण साजरे करणारा भारत हा जगातील एकमेवाद्वितीय देश आहे. जगातील इतरही देशात त्यांच्या संस्कृतीनुसार उत्सव साजरे होतात पंरतु वर्षाच्या बाराही महिन्याला येणारी सणांची माळ बहुदा आपल्याच देशात असेल. भारतात वेगवेगळ्या राज्यात, वेगवेगळ्या भाषेनुसार सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपल्या खंडप्राय  देशात खान-पान, राहणीमान, भाषा जश्या वेगवेगळ्या आहेत तसे सण साजरे करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत.
आपल्या राज्याचा विचार करता चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुडीपाडवा साजरा करून नवीन वर्षाची सुरवात होते तर फाल्गुन पौर्णिमेला येणाऱ्या होळीने, होळीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या धुलीवंदनाने व धुलीवंदनाच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीने वर्षाची सांगता होते. होळी ते रंगपंचमी हा एकच सण मानला जातो.

शेकडो वर्षांपासून होळी पौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. ^^काहींच्या मते होळी पेटवण्याच्या परंपरेचा उगम होलिका किंवा होलाका, ढूंढा, पूतना यांच्यासारख्या पुराणकाळी लहान मुलांना पीडा देणा-या राक्षसींच्या दहनाच्या कथेत आहे, तर काही लोक त्‍याचे कारण मदन दहनाच्या कथेत असल्‍याचे सांगतात. पुराणात याबाबत दिलेल्या कथेनुसार, पूर्वी ढुंढा किंवा ढौंढा नावाची राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा देऊ लागली तेव्हा लोकांनी तिला शिव्या व शाप देऊन आणि सर्वत्र अग्नी पेटवून तिला पळवून लावले. तेव्हापासून त्या उत्सवात शिव्या, बोंबा मारण्याची प्रथा सुरू झाली असे म्हणतात. परंतु विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपुजनाच्या परंपरेतून साजरा होतो आहे.^^
होळीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते ते धुलीवंदन. काही ठिकाणी होळीची राख पाण्यात मिसळून एकमेकांच्या अंगाला लावली जाते. उत्तर भारतात धुलीवंदनाच्या दिवशी रंगांची होळी खेळण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रातील मोठ्या शहरात उत्तर भारतीय मोठ्या प्रमानार स्थलांतरित झाल्यामुळे व चित्रपटातील सेलिब्रेटींना हाताशी धरून विविध कंपन्यांनी धुलीवंदनाचे मार्केटिंग केल्यामुळे आजच्या दिवशी रंगांची होळी(होली) खेळली जाते. त्यामुळे मोठ्या शहरात मराठीसण असणारी रंगपंचमी कुठेतरी मराठी भाषेसारखीच हरवत चालली आहे.

कोकणात होळीला शिग्मो म्हणतात. तर उर्वरीत महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी शिमगा म्हणतात.
शिमग्याला (धुळवडीला) गावोगावी सोंग काढतात त्याला शिमग्याने सोंग म्हणतात. काही ठिकाणी तर वेगळीच तरा असते... कुठे शिव्यांची लाखोली वाहिली जाते. बोरीचा बार यासाठी प्रसिद्ध आहे. काही गावामध्ये जावयाची गाढवावरून धिंड काढली जाते. धिंड झाल्यावर जावयाला सुहासिनिकडून उटण्याने आंघोळ घातली जाते व पोशाख देऊन सन्मान केला जातो. जावयाची गाढवावरून धिंड निघाली, की गावावरचे दुष्काळाचे सावट दूर होते. पाणीपाऊस चांगला होतो. रोगराई टळते, गावाची भरभराट होते अशी गावक-यांची धारणा असते. त्‍यामुळे गावाच्या भल्यासाठी जावयाला गाढवावर बसण्याची गळ घातली जाते. नाशिक जिल्ह्यातील वंडांगळी या गावात अशी पध्द्त असल्याचं वाचनात आलं आहे. अजूनही वेगवेगळ्या खेडोपाडी वेगवेगळ्या प्रथा, रूढी, परंपरा आहेत.
कोणत्याही रूढी परंपरांचा काही अर्थ असतो. चुकीच्या रूढी परंपरा बंध झाल्या पाहिजेत व कालांतराने त्या बंधही होतात. काही चांगल्या परंपरांचे जतन करणे हेही सर्वांचे काम आहे. वाईट रूढी परंपरा बंध होताहोता आता दारू पिऊन धुळवड साजरी करण्याची नवी परंपरा काही ठिकाणी चालू होताना दिसते आहे. आषाढ आमावस्याची गटारी आमावस्या झाली. त्याचप्रमाणे धुलीवंदन(धुळवड) म्हणजे पिणाऱ्यांसाठी पर्वणीच अस काहीसं चित्र तयार होत आहे.
अलीकडे राजकीय धुळवड असाही शब्दप्रयोग वारंवार ऐकायला मिळतो आहे. यातून राजकीय विचारांचे पतनच सुचवायचे असते. नुकत्याच झालेल्या विविध निवडूनकामधून राजकीय धुळवड दिसून आली आहे.

होळीच्या आधी झाडांची पानगळ झालेली असते. तो पालापाचोळा गोळा करून, परिसरातील कचरा एकत्र करून त्यात आपल्या मनातील वाईट विचार टाकून होळी पेटवायला हवी. अनावश्यक वृक्षतोड व बहुमूल्य लाकूड, गोवऱ्या(शेण्या) जाळणे कुठेतरी थांबायला हवे. होळीच्या अग्नीत मनातील काम,क्रोध,लोभ,मद,मोह,मत्सर, अहंकार यांना जाळून टाकायला हवे. पण हे विकार मनात ओझं म्हणून वागवणारे आपले मन खूपच विचित्र असते. बहिणाबाई चौधरी एका कवितेत म्हणतात...

मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर।
अरे इंचू, साप बरा, त्याले उतारे मंतर।।

विंचू, साप यांचे विष मंत्र,औषधोपचार याने उतरता येते. (मंत्राने विष उतरत नाही, शब्दशः अर्थ घेऊ नये) पण मनातील विष म्हणजे वाईट दुषवृत्तीवर कोणता इलाज?? आपल्या स्वभावातील दोष शोधून त्याचे निर्मूलन करणे हा होळीचा उद्देश व्हायला हवा.

धुलीवंदनाच्या दिवशी वसंतऋतुची सुरवात होते. शिशिरात पानझड झालेल्या झाडांना वसंतऋतुत नवी पालवी फुटते. होळीपासून वाढणाऱ्या उष्म्यात झाडांची नवी पालवी डोळ्यांना सुखावते. पशु पक्षांना आपल्या सावलीत घेते. ऋतूंचा राजा म्हणजे वसंतऋतु. वसंतऋतु हा तारुण्याचा निदर्शक आहे. जुनी जळमटे काढून नवी पालवी लेऊन आयुष्याचा मार्ग चालायचा असतो. असा काहीसा संदेश वसंतऋतु देत असतो. अडचणी आल्या, संकटे आली म्हणून निराश होऊ नका. वसंत होऊन नव्याने नवी सुरवात करा असाच संदेश तो देतो.

रंगपंचमी उत्सवाच्या निर्मितीमागचे धार्मिक व सांस्कृतिक कारण काहीसे अस्पष्ट आहे. परंतु वसंत ऋतू, मदन, नववर्ष, जीर्ण झालेल्या सृष्टीच्या शक्तीचे नूतनीकरण करण्याचा यातुविधी इत्यादींशी हा उत्सव निगडित असावा. धर्मसिंधु या ग्रंथाच्या मते फाल्गुन वद्य प्रतिपदेला वसंतारंभाचा उत्सव सुरू होतो. द्वितीयेला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का वगैरे उधळून आनंदसोहळा साजरा केला जातो. यावरून रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग आहे, असे दिसते.¶
सध्या रंगपंचमीला शेंदूर, गुलाल, चंदन, बुक्का याची जागा कृत्रिम रासायनिक रंगांनी घेतली आहे. रासायनिक रंगांची मागणी वाढू लागली आहे. कृत्रिम रासायनिक रंग बाजारात उघडय़ावरही विकले जातात. या रंगाच्या वापराने त्वचेला इजा होऊ शकते, डोळ्यांना त्रास होतो. रंगपंचमीला कृत्रिम रंगापेक्षा नैसर्गिक रंग वापरण्यावर भर हवा. हुल्लडबाजीला आवर हवा. रंगाच्या पाण्याचे फुगे मारणे हा धोकादायक प्रकारही थांबायला हवा. या दिवशी रंगांची उधळण करून एकमेकाप्रति जिव्हाळा, मैत्री, स्नेह जपण्याचा प्रयत्न हवा.

वसंतोत्सवाचे स्वागत धुळवडीला कसे होते?? होळी साजरी कशी केली?? येणारी रंगपंचमी कश्या पध्दतीने साजरी करणार?? या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक येण्यासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत. सणांच्या नावाखाली विभिस्तपणा होणार नाही याची काळची सर्वांनीच घ्यायला हवी. रंगांचा बेरंग होऊन धुळवडीच्या रस्त्याने आयुष्याची होळी आणि घराची राखरांगोळी होणार नाही यासाठी सर्वांनी दक्ष असायला हवे. आषाढ आमावस्या व धुलीवंदनाच्या दिवशी दारूच्या पुराची पातळी वाढत आहे. वेळीच बांधबंदिस्ती केली नाही तर वसंतऋतुरुपी तारुण्याची पालवी दारूच्या पुरात वाहून जाईल... नंतर उर बडवून झालेले नुकसान भरून येणार नाही. काल होळीची पोळी झाली आज नळी खायला हरकत नाही... पण दारूला तिथे थारा नको. व्यसनमुक्त युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. ती संपत्ती कमी व्हायला नको. त्यात वाढच अपेक्षित आहे.
सर्वांना होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

संदिप रामचंद्र चव्हाण.

^^ संदर्भ:- भारतीय संस्कृतिकोश, खंड दहावा
¶¶ संदर्भ:- मराठी विश्वकोश.

Thursday, 15 February 2018

मार्केटिंगचे अजब तंत्र.. अन भरकटलेला समाज...


मार्केटिंगचे_अजब_तंत्र.. अन_भरकटलेला_समाज...


एक मल्याळी चित्रपट येऊ घातला आहे. नाव.. 'ओरू अदार लव. चित्रपटातील अठरा वर्षीय अभिनेत्री प्रिया प्रकाश वारीयर हिने सद्या प्रसिद्धीचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. तिचा या चित्रपटातील २८ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मूळची केरळ राज्यातील त्रिसूरमधील असणारी प्रिया प्रकाश चोवीस तासात सहा लाख फालोअर मिळवीत देशभर प्रसिद्धीच्या झोतात आली.
'व्यालेंटाइन डे' ची संधी साधून या चित्रपटातील काही सीन्स, व्हिडीओ सोशलमीडियावर व्हायरल केले गेले. आणि सोशलमीडियावर चोवीस तास ऑनलाईन असणार्यांनी हे व्हिडिओ शेअर करण्याचा धडाका लावला. सध्या कुठेही निवडणुका नसल्यामुळे, दंगल नसल्यामुळे, रोजगाराची गंभीर समस्या असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर तरुण लोखंसंख्येच्या हाताला काम नाही. त्यामुळे हे व्हिडिओ हातोहात शेअर होऊन बहुतेक मोबाईलच्या इनबिल्ट मेमरीत जाऊन पोचले. व्हिडीओ पाहिल्यावर हा चित्रपट 'शाळा- कॉलेजमधील भिन्नलिंगी आकर्षण' हा विषय केंद्रबिंदू ठेऊन बनवला आहे हे अगदी शेंबड पोरगं सांगेल. फक्त यात एक फरक दिसतो तो म्हणजे मुलीने यात आघाडी घेतली आहे.
मार्केटिंग मध्ये सोशलमीडियाला आलेले अनन्यसाधारण महत्व धंदेवाईक प्रवृत्तीने बरोबर ओळखून चित्रपटाची जाहिरात केली. व्यवसायच्या दृष्टीने चित्रपट निर्मिती यंत्रणा त्यांच्या जागेवर ठीक आहे.  *एका मल्याळी चित्रपटात शाळेत शिकत असणारी मुलगी तिच्याच वर्गातील मुलाला डोळा मारते... आणि मुलगा खल्लास!* असा हा व्हिडीओ पाहून अनेकजण असे काही चेकाळून जातात की त्या मुलीने यांनाच डोळा मारला की काय? हा प्रश्न पडतो.
चित्रपट हिट होईल, तो अनेक भाषेत प्रदर्शित होईल, ती मुलगी उद्या कदाचित मोठी अभिनेत्रीही होईल इतपर्यंत सर्व ठीक आहे.
पण याचा समाजमनावर किती पगडा पडावा? माध्यमातून किती चर्चा व्हावी? 'तरुण तुर्क अन म्हातारे अर्क' किती चेकाळावेत? यातून नव्या पिढीने काय घ्यावे? असे प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात.
या एका व्हिडीओमुळे, दक्ष समजल्या जाणाऱ्या सोशलमीडियातुन सगळे गंबीर प्रश्न, मुद्दे कसे बाजूला पडतात हे या निमित्ताने दिसून आले.
सोशलमीडिया व्यक्त होण्याचे माध्यम आहे. सोशलमीडियावरून क्रांती वैगेरे काही होणार नाही व तिथे समाजहिताच्या गोष्टींनाही जास्त महत्व नाही. वाद-विवाद निर्माण करण्यासाठी, अफवा पसरवण्यासाठी, जाती धर्मात तेढ वाढवण्यासाठी, राजकीय प्रचार प्रसारासाठी सोशलमीडियाचा भरपूर उपयोग होत आहे. सामान्य जनता गुड मॉर्निंग आणि गुड नाइटच्या पलीकडे पोचलेली नाही. फॉरवोर्ड खेळ खेळनारे फॉरवोर्ड केल्या जाणाऱ्या बातमीची, घटनेची सत्यता तपासून बघण्याचे कष्टही घेत नाहीत. त्यातूनच मग भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या देशासाठी फाशी गेलेल्या थोर क्रांतिकारकांच्या बलिदानाचा दिवस बदलला जातो. आणि व्यालेंटाइनला विरोध करण्यासाठी त्याचा आधार घेतला जातो. व्यालेंटाइन साजरा करावा का नाही हा वेगळा विषय आहे. मुळात प्रिय व्यक्तीवर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज असतेच असं नाही. पण बाजारपेठेला विविध 'डे' ची गरज असते. व ती गरज भागविण्यासाठी असे 'डे' प्रसिद्धीच्या झोतात आणले जातात.
अनलिमिटे इंटनेट पॅक मुळे सोशलमीडिया वापरताना वेगळा खर्च होत नाही असा एक सार्वत्रिक (गैर)समज आहे. परंतु ज्या वेळी आपण एखादी गोष्ट विनामोबदला वापरत असतो, सतत वापरत असतो त्या वेळी आपण त्यांच्यासाठी एक प्रॉडक्ट् असतो. त्यांच्यासाठी आपण वस्तू असतो.. ते(सोशलमीडियातुन स्वताचे हित साधणारे) आपल्याला त्यांच्या फायद्यासाठी वापरतात. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आपण आपल्या व समाजाच्या उन्नतीसाठी सोशलमीडियाचा प्रभावी वापर करुन देशहित पाहणे गरजेचे आहे.
व्यालेंटाइन व प्रिया प्रकाशाच्या व्हिडीओ मुळे विस्मृतीत गेलेल्या घटना पाहू...
काश्मीर सीमेवर पाकिस्तानी सैन्यांचा तीव्र हल्ला झाला असतानाच, १० फेब्रुवारीच्या पहाटे सुंजवानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना चाललेल्या सलग तीस तासांच्या ऑपरेशनमध्ये पाच दहशतवादी ठार झाले. आपलेही पाच जवान हुतात्मा झाले. हा हल्ला शनिवारी पहाटे झाला. पाठोपाठ सोमवारी १२ फेब्रुवारी रोजी श्रीनगरच्या crpf तळावर दहशतवादी हल्ला झाला यात crpf जवानांनी दोन दहशतवादी ठार मारले तर आपला एक जवान हुतात्मा झाला. देशात पाकपुरस्कृत दहशतवाद कारवाया व सीमेवरील चकमकी वाढल्याने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जवान आपल्या प्रणाची बाजी लावत आहेत. देशात दहशतवादी संकट असताना, इकडे महाराष्ट्रात आस्मानी संकट आले. अवकाळी पाऊस व जोरदार गारपिटीने शेतकऱ्यांच्या हाती तोंडी आलेला रब्बी पिकाचा घास हिराऊन घेतला व त्यांच्या चिंतेत भर घातली. यावर चर्चा होऊन झालेले नुकसान टळणार नाही. आपण बंदूक घेऊन सीमेवर जाणार नाही. किंवा लगेचच शेतकऱ्यांची शेती तोट्यातून फायद्याची होणार नाही. परंतु या गोष्टींवर किमान चर्चा झाली तर आपल्यासाठी कोण कोण कष्ट उपसत आहे याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव उत्पन्न होईल.
सोशलमीडियाचा कमालीचा वापर करून बहुतेक सर्व स्थरातील लोकसंख्येला त्यात गुंतवून मुख्य समस्येपासून दूर घेऊन जाणे हे काही लोकांच्या फायद्याचे असते. त्यासाठी विविध यंत्रणा विविध स्थरावर काम करत असतात. अश्या यंत्रणा जाळे टाकून ठेवतात... माणसांची झालेली मेंढरे त्या जाळ्यात धावत जाऊन स्वतःला अडकवून घेतात, हे नित्याचे झाले आहे. समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे.
अखंड सावधान असावे... एवढेच आपल्या हाती आहे.

संदिप रामचंद्र चव्हाण
🙏🙏🙏🙏

Thursday, 8 February 2018

शेतकरी आत्महत्या... देशाला लागलेला शाप!

शेतकरी आत्महत्या... देशाला लागलेला शाप!


देशातील प्रत्येक नागरीक प्रजासत्ताकाचा ६९ वा वाढदिवस साजरा करण्याची तयारी करत होता. त्याच वेळी धर्मा पाटील या ८४ वर्षाच्या शेतकऱ्यावर सरकारी अनास्थेला कंटाळून राज्याच्या मंत्रालयात विष पिण्याची वेळ आली. त्यातच २८ जानेवारी २०१८ ला त्यांचा मृत्यू झाला. नेहमीप्रमाणे सर्वत्र शेतकरी आत्महत्या मुद्दा चर्चिला गेला. भरपूर गदारोळ झाला. राजकीय धुरळा उडाला. सोशलमीडिया वर राग- चीड व्यक्त झाली. आणि आता ते तापलेले वातावरण,राग,गदारोळ  मात्र शांत,शांत झाला. असे का झाले? असे का होतेय?

  गजनी या हिंदी चित्रपटात नायकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला अगदी अलीकडे घडलेली घटना आठवत नाही. कोणतीही गोष्ट त्याच्या विस्मृतीत जाते. त्याला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' असं म्हंटल जातं. आज समाजमनाचे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की हा आजार बहुतेक सर्व भारतवासीयांना जडला आहे. आपल्या आजूबाजूला अनेक अप्रिय घटना घडत असतात. लोक जेवढ्यास तेवढे दुःख व्यक्त करतात. पुढे चालायला लागतात. कोणालाच कोणत्याही समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना शोधण्याची गरज वाटत नाही.
                सर्वसामान्यांचा रोजच्या रोज पोटाची खळगी भरण्यासाठीची लढाई लढण्यातच वेळ जात असेल. ही त्याची मजबुरी ही असेल. पण शासन-प्रशासनाचं काय? ते हा वेळकाढूपणा का करतात? शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटना व त्याबद्दल समाजात, शासन स्तरावर निर्ढावलेपणा आलेला आहे. कोणत्याही अप्रिय घटनेतून बोध न घेता पुढील घटनेला तेवढ्याच निर्ढावलेपणानं तोंड देण्यासाठी आम्ही कसे तयार आहोत. हे दाखवण्याची सद्या सर्वत्र स्पर्धा दिसून येते. यातून या सर्वांना झालेल्या 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' या आजाराची दाहकता समजते.
       शेतकरी वेगवेळ्या कारणांच्यामुळे आत्महत्या करत आहेत. अस्मानी संकटे येतात ती रोखली जाऊ शकत नाहीत. मात्र कृत्रिम संकटं निश्चित कमी केली जाऊ शकतात. वाढत्या आणि न थांबणाऱ्या शेतकरी आत्महत्या हा जणू भारतदेशाला लागलेला शाप आहे.
याची सुरवात कशी झाली?कोणते घटक याला जबाबदार आहेत? काही उपाय केले तर या आत्महत्या कमी होऊ शकतात का? या बद्दल हा ऊहापोह.....
     'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी' अशी म्हण किंवा विचारसरणी काही दशकापूर्वी जनमानसात रुजली होती. कारण त्या वेळी तशीच समाजरचना होती. देश स्वतंत्र झाल्यावर हळूहळू ही मानसिकता बदलू लागली पुढे हा बदल 'उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती' असा झाला. तर सद्या उत्तम नोकरी, उत्तम व्यवसाय, मध्यम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि शेती मात्र कनिष्ट, त्रासदायक ते अति त्रासदायक ठरली आहे. हा बदल सर्वसाधारण पणे चाळीस ते पन्नास वर्षात झालेला बदल आहे. याला जागतिक व देशपातळीवरील धोरणे व अर्थव्यवस्था कारणीभूत आहे. सर्वदूर प्रगतीचे वारे वाहत असताना शेती व शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडत गेला.. त्याला शासनाने आधार दिला नाही.आणि समाजातील इतर घटकांनीही आधार दिला नाही.
       भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे शाळेत शिकवले गेले.. अजूनही शिकवले जाते. याच शाळेत शिकुन डॉक्टरची मुलं डॉक्टर होऊन पुढे तो व्यवसाय चालवतात. (सेवेचा व्यवसाय झाला आहे), इंजिनियरची मुलं इंजिनियर किंवा इतर क्षेत्रात चमकावी म्हणून इंजिनियर कष्ट घेतो, व्यावसायिकाची किंवा बिझनेसमनची मुलं पुढे जाऊन तो व्यवसाय करतात किंवा त्यांनी तो करावा अशी त्या व्यावसायिकांची इच्छा असते. सनदी सेवेत असणाऱ्या बहुतेकांची मुलं त्या क्षेत्राकडे वळतात किंवा त्यांचे पालक त्यासाठी मार्गदर्शन करतात.सर्वसामान्य नोकरदारही आपली मुलं शिकुन मोठी व्हावी. त्यांना चांगली नोकरी आणि सुंदर छोकरी मिळावी. ही इच्छा बाळगतात. राजकीय नेत्यांची मुलं वंशपरंपरेने त्यांच्या गादीवर बसतात किंवा बसवली जातात. हे सर्व समाजघटक आपापली मुलं आपापल्या व्यवसायात, उद्योगधंद्यात, राजकारणात, उच्च पदावर जावी यासाठी प्रयत्न करताना दिसतात. त्यांनी तसा प्रयत्न करणे चूक आहे किंवा करू नये असे ही नाही. पण हे सर्व होत असताना कोणत्याही शेतकऱ्याला आपला मुलगा शेतकरी व्हावा किंवा आपल्या मुलीला शेतकरी नवरा जोडीदार म्हणून मिळावा असं वाटत नाही. असा प्रयत्न करताना तो दिसत नाही. हे असं का? जगाचा पोशिंदा म्हणून सगळ्यांनी डोक्यावर घेतले असताना, जय किसान म्हणून जयजयकार केला जात असताना, शेतकऱ्याला किंवा कोणाही व्यावसायीक, उच्चपदस्थांना, राजकीय नेत्यांना आपली पुढची पिढी शेतकरी व्हावी असं का वाटत नसावं? मग जगाचा पोशिंदा म्हणणे. जयजयकार करणं हे खोटं आहे का? 
     शेतीत कष्टाच चीज होत नाही. वाढलेल्या गरजा भागविण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक उत्पन्नाची शाश्वती नाही. हे देशात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या आकड्याने सिद्ध केले आहे. देशात शेतीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अवलंबून असणारी संख्या मोठी आहे. जवळपास एकूण लोकसंख्येच्या ५० ते ६०% म्हणजे जवळपास ६०ते ७०कोटी लोक अजूनही शेतीवर अवलंबून आहेत.
शहरात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध असतात त्यामुळे शहरी लोकसंख्या थेट शेतीवर अवलंबून नसते. असली तरी ते प्रमाण नगण्य असते. त्यामुळे लोकसंख्येचे स्थलांतर ग्रामीण भागातून शहराकडे मोठ्या प्रमाणावर होत आहे यातून नव नवे प्रश्न निर्माण होत आहेत. 
     सद्या ग्रामीण भागात राहणारी बहुतांशी लोखसंख्या प्रत्यक्ष शेतीवर अवलंबून आहे. ग्रामीण भागात शेतीच्या कामा शिवाय रोजगाराचे इतर पर्याय नाहीत.असले तर ते खूप कमी आहेत. ग्रामीण भागात पर्याय नाहीत म्हणून शेती केली जाते... शेतीला पूरक जोडधंदेही केले जातात. तर शहरी भागातील लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून शेती (खरेदी) करतात. टॅक्स वाचवण्यासाठीही शेती करणारे व शेतकरी होणारे शेतीप्रेमी शेतकरी आपल्या याच देशात आहेत.
      ग्रामीण भागात राहणाऱ्या व पूर्णपणे शेतीवर उपजीविका असणाऱ्या अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांचे खूप मोठे प्रश्न व समस्या आहेत. त्या समस्यांनी आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. असे असताना अलीकडच्या दिवसात काही घटना घडल्या त्याचा थोडा आढावा घेऊ.
     १)नुकताच 'वर्ल्ड इकॉनॉमी फोरम' (WEF) या जागतिक परिषदेत 'ऑक्सफॅम' या संस्थेने एक चिंताजनक अहवाल प्रस्तुत केला. या अहवालात नमूद केल्यानुसार, भारतातल्या १ टक्का श्रीमंताकडे ७३ टक्के संपत्ती एकवटली आहे. भारतातल्या त्या १ टक्का श्रीमंतांची संपत्ती ही २०.९ लाख कोटींनी वाढली. ही रक्कम भारताच्या २०१७-१८ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाइतकी मानली जाते. 
2)गेल्या दोन दशकामध्ये संसदेतील लोकप्रतिनिधींचे वेतन १२५० टक्के वाढले.अशी बातमी वृत्तपत्रातून प्रसिध्द झाली.
तर ५६/५७ वर्षात महाराष्ट्रातील आमदारांचे वेतन दीड रुपया ते दीड लाख रुपये वाढले. हेही प्रिंट मीडियात छापून आलं आहे.
३)सरकारी व खाजगी बँकांचे Non-performing asset (NPA) थकीत कर्ज आठ लाख कोटीच्या जवळ जाऊन पोचले आहे. यात सरकारी बँकांचा वाटा सहा लाख कोटींचा आहे. यापैकी तीन लाख कोटी हे बुडीत कर्ज आहे.
भारतीय बँकांच्या बुडालेल्या कर्जाचा आकडा हा तब्बल २० लाख कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा दावा रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या माजी डेप्युटी गव्हर्नरनी केला आहे. 
४)'पद्मावत’ चित्रपटातचे तिकीट २४०० रूपयांवर गेले.
५)श्रीमंत देशांच्या यादीत भारत सहाव्या स्थानावर असा एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला.
६)देशातील एकूण शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे. असाही अहवाल प्रसिद्ध झाला आहे.
    वर नमूद केलेले सहा मुद्दे पाहिले तर वेगवेगळे व वेगवेळ्या क्षेत्राशी निगडती आहेत. पण त्यांचा शेती व शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांशी अप्रत्यक्ष संबध आहे. कसा ते पाहू...
      संपत्तीचे केंद्रीकरण होत आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत आहेत. ज्यांनी गरीब-श्रीमंत यांच्यातील वाढणाऱ्या दरीवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ते सर्व राज्याचे व केंद्राचे धोरणकर्ते, राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी स्वतःचं हित साधताना पक्षभेद विसरून एक होताना दिसून येतात. पण सामान्य शेतकरी, कष्टकरी यांच्या हितासाठी एकत्र येत नाहीत. लोकप्रतिनिधीच्या मध्ये काही सन्माननीय अपवाद आहेत. पण त्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. लोकप्रतिनिधी पूर्ण ताकतीने किंवा निस्वार्थीपने सर्वसामान्य जनतेची व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत.अनेक संकटात शेतकरी असताना लोकप्रतिनिधी आपले पगार, भत्ते, सोई-सुविधा या बाबतीत कमालीचे दक्ष असतात. 
      मोठे उद्योगपती हजारो कोटींचे कर्ज काढतात, थकवतात, बुडवतात, शिवाय आलिशान आयुष्य जगतात, अगदीच वेळप्रसंगी देश सोडून पळून जातात. त्यांना कोणतेही राज्यकर्ते शासन करत नाही. बँका त्यांची कर्जे पुन्हा पुन्हा रिन्यू करतात. व्याजात सूट देतात. त्यांना  सेलिब्रेटीची वागणूक देतात. त्याच्या उलट  सामान्य शेतकऱ्यांना बँका दारात ही  उभ्या करत नाहीत. सन्मानजनक वागणूक देत नाहीत. थोड्या थकबाकीसाठी जप्तीच्या नोटिसा पाठवतात. अब्रूच्या भीतीने मग शेतकरी आत्महत्या करतो. तरीही त्याचे कर्ज माफ होत नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला ते फेडावे लागते. अशा वेळी प्रशासन ती आत्महत्या शेतकरी आत्महत्या आहे का नाही हे ठरवत बसते.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातलगांना कागदपत्रांची पूर्तता करत बसावे लागते.
      महाराष्ट्रात अगदी अलीकडे गाजलेली आत्म(हत्या) म्हणजे धर्मा पाटील यांची आत्म(हत्या) होय. शेतीच्या योग्य मोबदल्यासाठी ८४ वर्षाचा शेतकरी बलिदान देतो... त्यावेळी पद्मावत चित्रपट पाहण्यासाठी याच देशाच्या मातीतील काही घटक आनंदाने २४००रु मोजतात... त्यांना शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूचं किंवा कोणत्याही शेतकरी आत्महत्येबद्दल काही देणंघेणं नसतं. खा-प्या-मजा करा ही संस्कृती वाढत आहे. तर सामाजिक संवेदना नष्ट होऊ लागल्या आहेत. याचा परिणाम साहजिकच उपेक्षित घटकावर होतो. शेतकऱ्यांची नवी पिढी शिकली आहे. व्हाट्सअँप, फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशी सोशल माध्यमे वापरत आहे. त्यांना ही सामाजिक परिस्थिती दिसते. आमची कदर तुम्ही करणार नसाल तर तुमची कदर आम्ही का करू? हा रोकडा सवाल घेऊन ती उभी राहिली तर इंडिया विरुद्ध भारत हा संघर्ष टोकाचा होऊ शकतो. आणि ही गोष्ट सगळ्यांना त्रासदायक ठरू शकते. त्याची झलक नुकत्याच झालेल्या शेतकरी संपाच्या वेळी दिसून आली होती.
     हे सगळं घडत असताना जगातील सर्वात श्रीमंत देशात आपल्या देशाचा सहावा नंबर लागतो. असाही एक सर्व्हे रिपोर्ट आला. तसा पूर्वीपासूनच आपला देश श्रीमंत होता. *सोने की चिडीया* असं इंग्रज आपल्या देशाला संबोधत होते. भारतीय लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघायचा असंही बोललं जायचं. म्हणजे संपन्नता आताही आहे पूर्वीही होती. शेतकरी, कष्टकरी तेव्हा सामान्य जीवन जगत होता अन आता मात्र हालाखीचीचं जीवन जगतो आहे. मग या सर्व्हेमधील श्रीमंती कोणाची?? हाताच्या बोटावर मोजता येतील अशा लोकांच्याकडे संपत्ती आली म्हणजे देश श्रीमंत झाला का? याचा विचार होणे आवश्यक आहे. तो होणार नसेल तर आपण स्वतःलाच फसवतोय असं होईल.
      पूर्वी काही प्रमाणात का होईना शेतकरी समाधानी होता. त्याच्याजवळ खूप पैसा नसला तरी गरजा कमी असल्यामुळे त्या भागत होत्या. पाऊसपाणी वेळेवर झाला की सुगी चांगली व्हायची...शेतकरी आनंदी व्हायचा.... गाईगुरांना भरपूर चारा उपलब्ध व्हायचा. शेतकरी आपल्या घरी आलेल्या धान्यांतील काही भाग इतरांना भरभरून द्यायचा. सुगी संपली की खेडोपाडी यात्रा भरायच्या. पाव्हणे-रावळे भेटायचे. सगळं कसं ठीक चाललेलं असायचं. ही परिस्थिती कायमच असायची असं नाही.. दुष्काळही पडायचा, कधी अतिवृष्टी व्हायची, पीकं पाण्यावाचून अथवा पाण्यामुळे हातची जायची. पण शेतकरी कधी नाउमेद झाला नव्हता. त्यानं स्वतःला संपवल नव्हतं. घरच्यांच्या पाठींब्यावर तो बिकट परिस्थितीचा नेटाने सामना करीत उभा राहत होता. आर्थिक संकटे यायची पण त्यातून तो उभारी घेत होता. 
    परंतु ही परिस्थिती पुढे पालटत गेली. शेतीचं तुकडे झाले एका हिश्श्याचे दोन, चार, सहा तुकडे झाले. आज ७०% शेतकरी अल्पभूधारक आहेत.बरेच शेतमजूर भूमिहीन आहेत.एक टक्के शेतकऱ्याकडे दहा हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे. त्यातही कोरडवाहू शेतीचे प्रमाण जास्त आहे. तुकडीकरणामुळे शेतीचा मशागत खर्च वाढत आहे. उत्पन्न हवं तसं निघत नाही. यांत्रिक शेती करण्यात अडचण येते. त्यातच खाणारी तोंडे वाढली. महागाई वाढली. शिक्षणाची गंगा खेडोपाडी आली. मुलं मुली शिकू लागल्या. शेतात राबणारे हात कमी झाले. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा वाढल्या. काही प्रमाणात उत्पन्न वाढले पण खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला. त्याचबरोबर निसर्गाचा प्रकोपही वाढू लागला. वेळी,अवेळी अवकाळी पाऊस पडतोय. तर कधी दुष्काळ. चांगला पाऊस झाला अन पिकं चांगली आली तर पिकाला भाव नसतो. मातीमोल भावाने पीकं विकावी लागतात. रक्ताचं पाणी आणि पिकाचा लाल चिखल हे सद्याच्या शेतकर्याच्या पाचवीला पूजलेलं आहे. सर्व औदयोगिक उत्पादक स्वतःच्या मालाचा दर स्वतः ठरवतात पण हे भाग्य शेतकर्याच्या नशिबात नाही. पिकलेल्या पालेभाज्या नाशवंत असतात. तर धान्य साठवणुकीसाठी जागा नसते. असली तरी पैशाची निकड असते. त्यामुळे येईल त्या भावात हाती आलेलं पीक विकावं लागते. निसर्ग झोडपतो. दलाल लूट करतात. ग्राहक फुकट मिळतंय का ते बघतो. राज्यकर्ते ग्राहकांचं हित जपतात. आणि उत्पादक शेतकरी मात्र देशोधडीला लागतो. अशी परिस्थिती सद्या आहे.
       शेतीत घातलेला पैसा मिळेल का नाही, कष्टाचं चीज होईल का नाही, याची शाश्वती नाही. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ लागेनासा झाला की तो मेळ बसवायला कर्ज काढतो. ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज. मग व्याज देण्यासाठी तिसरं कर्ज. कर्ज... आणि कर्ज..!! बँका कर्ज देत नसतील तर सावकाराकडून कर्ज घेतो. सावकारी कर्जाचे व्याज हे खूप जास्त असते. या कर्जासाठी घरातील लक्ष्मीच्या अंगावरील किडुक मिडुक डाग गहाण ठेवतो. कधी कधी शेतही गहाण ठेवतो.अशा चक्रव्युहात शेतकरी अडकला,की त्याला हे चक्रव्युह सहजासहजी भेदता येत नाही. पैशाचे सर्व मार्ग बंद झाले की खाणारी तोंडे बोलू लागतात. मुलं ऐकत नाहीत. प्रत्युत्तर करतात. बायको अबोला धरते. चार लोकात किंमत राहत नाही. समाजात प्रतिष्ठा मिळत नाही,प्रतिष्ठा संपते. असं दुःख शेतकरयांच्या वाट्याला येतं. यातून हा शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो. मग कधी तो व्यसनाचा आधार घेतो. आणि बुडत्याचा पाय अधिक खोलात जातो. 
    तर कधी याच्या उलट परिस्थिती असते. घरातील लोकांना पूर्ण परिस्थितीची जाणीव असते. ते सर्व निमूटपणे सहन करत असतात. आपल्या बापाचे, आपल्या नवऱ्याचे मन दुखावणार नाही अशीही काळजी बायको मुलं घेत असतात, कष्टाची कामे करून सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न घरातील प्रत्येकजण करत असतो, मुलं अकाली प्रौढ होतात, मनातील अनेक इच्छा मारायला शिकतात, घरधणीन फाटक्या साडीला ठिगळे लावून तीच साडी नेसते. पण आबाळच फाटलं तिथं हे उपाय तोकडे पडतात..कुटुंबाला सतत चिंता सतावते... अश्या एकूण परिस्थितीत आपण घर चालवायला लायक नाही हा विचार शेतकर्याच्या मनात घर करतो. घरातील बायका मुलांच्या गरजा भागवता येत नसल्यामुळे कर्ता शेतकरी नैराश्याने ग्रासला जातो. मुलांचं शिक्षण, मुलींची लग्ने, घरातील एखाद्याच मोठं आजारपण यात तो पूर्ण कोसळून पडतो. आता यातून मार्ग नाही, अस मनाशी पक्क होत जातं. कर्ज कसं फिटायचं?मुलांचं शिक्षण कस व्हायचं? मुलीचं लग्न करायला अन आई- वडिलांच्या आजारपणावर उपचार करायला पैसा कुठून आणायचा? बायकोला तर लग्नापासून साधा फुटका मनी घेतला नाही. होता तोही गहाण ठेवला.याचं दुःख शेतकऱ्याला होत असत.आपल्या जीवनाला अर्थ नाही.आपल्याला जगण्याचा हक्क नाही. असा विचार कर्जाच्या चक्रव्हूवात सापडलेला शेतकरी करत असतो. आणि त्याला या सर्वातून शेवटी एकच मार्ग दिसून येतो. तो म्हणजे आत्महत्या आणि आत्महत्या!
      शेतकरी आत्महत्या हा कृषिप्रधान(?) भारत देशाला लागलेला शाप आहे. आपल्या महाराष्ट्राचा यात पहिला नंबर आहे. शेतकरी आत्महत्या हा खूप गंभीर व सामाजिक प्रश्न निर्माण झाला आहे. साहेबराव शेषराव करपे. राहणार चिलगव्हाण, जिल्हा यवतमाळ. यांनी संपूर्ण कुटुंबासह १९ मार्च १९८६ या दिवशी आत्महत्या केली. ही अधिकृत पहिली सामूहिक शेतकरी आत्महत्या मानली जाते. अधिकृत यासाठी की आधीही शेकडो शेतकरी आत्महत्या झाल्या असतील पण त्याची सरकारदरबारी नोंद नसल्यामुळे त्या अधिकृत मानल्या जात नाहीत. गेल्या एकतीस बत्तीस वर्षात सरकारदरबारी नोंद झालेल्या आत्महत्यांची देशभरातील आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. २००७ पर्यंत दोन लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या अस एका संशोधन प्रबंधात वाचण्यात आले. तर २०१७ पर्यंत हा आकडा ३ लाखावर पोचला आहे.
सरकारने न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार २०१३ पासून प्रतिवर्षी १२ हजारापेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या होत आहेत.म्हणजे दिवसाला सरासरी ३०ते४० शेतकरी मृत्यूला जवळ करतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात आतापर्यंतच्या सर्व राज्यकर्त्यांना, लोकप्रतिनिधींना, समाजाला अपयश आलं आहे. 
      आता वेळ आली आहे आत्महत्या विरुद्धची लढाई शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने लढण्याची, लढवण्याची. गावकी- भावकीच्या वादात अन टुकार राजकारणाच्या फंदात न पडता शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी आपल्या कुटुंबाची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शड्डू ठोकून मैदानात उतरायला हवे. जमेल तेवढे शिक्षण, मिळेल ते काम,नवनवीन उद्योगधंदा याकडे वळून काबाडकष्ट करून आपल्या शेतकरी बापाला वाचवण्याची जबाबदारी आता आपण घ्यायला हवी. शासन काही करेल की नाही, समाज काय भूमिका घेईल. हे पाहण्यात आता वेळ दवडून चालणार नाही.शेतकरी आत्महत्येचा वणवा आपल्या घरापर्यंत यायच्या आधी शेतकऱ्यांच्या प्रत्येक कुटुंबातील सदस्याची भूमिका महत्त्वाची आहे. खोटी प्रतिष्ठा, लग्नामधील अनाठायी खर्च,जावळ-जत्रा, इतर करतात म्हणून वाढदिवसाचा दिखावा, कर्ज काढून सोसायट्यांची ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणे, गरज नसताना चारचाकी घेणे, उगाचच बुलेटचा थाट करणे, शेतातील कामात कामचुकारपणा करून गावातल्या चौकात किंवा पारावर बसून वेळ घालवणे, गल्ली पुढार्यांच्या नादाला लागून पूर्ण दिवस वाया घालवणे, अश्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. हौसेला मोल नसते हे जरी खरं असले तरी हौस करणारा कर्जाच्या विळख्यात सापडू नये.म्हणून हे उपाय केले पाहिजेत. थोडक्यात रिन काढून सण करण्याची पद्धत कुठं तरी थांबली पाहिजे. अनावश्यक खर्च टाळलेे पाहिजेत. सर्वांनी 'एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' यामार्गाने जाणे हिताचे आहे. तरुण शेतकर्यांनी अडचणीत खचून न जाता आपलं दुःख कुणाजवळतरी बोललं पाहिजे. प्रत्येक समस्येवर उपाय असतात. प्रश्न असले की उत्तरही असते. आत्महत्या करून प्रश्न संपणार नाहीत. ते अधिक वाढतील. आपल्या आईवडिलांना, बायको- मुलांना, मित्रांना आपली गरज आहे. त्यांना वाऱ्यावर सोडून आत्महत्या करणार नाही. असा ठाम निश्चय सर्व शेतकरी बंधूनी करावा ही हातजोडून त्यांना एका शेतकऱ्याच्या पोराची विनंती आहे.
    बहिणाबाई चौधरी आपल्या पेरणी या कवितेत म्हणतात...
पेरणी पेरणी,अवघ्या जगाच्या कारनी।
ढोराची चारनी,कोटी पोटाची भरणी।

शेतकरी स्वतःपेक्षा दुसऱ्यासाठी शेती करतो, ढोर मेहनत करून पिकं पिकवतो. साऱ्या जगातील लोकांच्या पोटाची तो काळजी घेतो. लोकांसाठी, गुराढोराच्यासाठी तो शेतात राबतो. म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात.
'लाख मेले तर चालतील.पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे' अशी मराठीत म्हण आहे. आज लाखोंचा पोशिंदा किड्यामुग्याप्रमाणे रोज मरतोय. भारतदेशाच्या कपाळी लागलेला शेतकरी आत्महत्येचा शाप पुसुन टाकण्यासाठी, त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी समाजातील सर्वस्तरातून प्रयत्न व्हायला हवेत. या कामी शक्य ते सर्व उपाय समाजातील सर्वस्तरातून व्हायला हवेत.
....संदिप रामचंद्र चव्हाण.











मुद्दा क्र 1 ते 6 चे संदर्भ..
1)संपत्तीचे केंद्रीकरण https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/why-is-indias-wealth-inequality-growing-so-rapidly/articleshow/62679685.cms
2)खासदारांचे वेतन (https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/varun-gandhi/articleshow/62763017.cms)
आमदारांचे वेतन 
(http://prahaar.in/mla-salary-increased-now-give-result/)
3)NPA
http://www.lokmat.com/business/banks-bad-debts-amount-rs-20-lakh-crore/

https://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/public-sector-banks-npa-hits-rs-7-34-lakh-crore-at-september-end/articleshow/62231730.cms
4)पद्मावत चित्रपट तिकीट दर
http://www.tarunbharat.com/news/552597
5)श्रीमंत देशात भारत सहावा
http://zeenews.india.com/marathi/india/india-ranks-6th-in-wealthiest-country-in-the-world/410055
6) शेतकरी आत्महत्येमध्ये महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
https://www.krushiking.com/newsdetail.php?goytrarenyarjf&100102584

Thursday, 1 February 2018

अक्षरनिष्ठांची मांदियाळी ग्रंथशोध आणि वाचन-बोध

अक्षरनिष्ठांची_मांदियाळी
ग्रंथशोध आणि वाचन-बोध

लेखक:- डॉ. अरुण टिकेकर
प्रकाशन:-रोहन प्रकाशन
पृष्टे:- 173
किंमत:- 140
(अक्षरधाराच्या पुणे येथील पुस्तक प्रदर्शन व विक्री यामध्ये 11 जानेवारी 18 रोजी 25% डिस्कउंड वर खरेदी केले आहे)
रुंदी 110mm ×उंची180mm(रेग्युलर पुस्तक साइजपेक्षा लहान)

पुस्तकावरील पुस्तक या प्रकारातील हे तिसरे पुस्तक मी वाचून संग्रही ठेवले आहे. सुरवातीला 'बखर शिक्षणाची' हे शिक्षण क्षेत्रातील धडपड्या व शिक्षण क्षेत्रात नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींची माहिती असलेले पालक- शिक्षकांना अतिशय उपयुक्त असे हेरंब कुलकर्णी यांचे पुस्तक वाचले. नंतर बहुचर्चित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे निरंजन घाटे यांचे पुस्तक वाचले व माझ्या शब्दात जमेल तसे त्यावर लिहून इतर वाचकांसाठी माहिती देण्याचा प्रयत्न केला. याच पठडीतील डॉ. अरुण टिकेकर यांचे अक्षरनिष्ठांची_मांदियाळी' हे पुस्तक वाचून पूर्ण केले.


या पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिला ‘ग्रंथ-शोध’ तर दुसरा 'वाचन- बोध'.
लेखक लोकसत्ताच्या संपादकपदी असताना 'लोकमुद्रा' या पुरवणीत डिसेंबर 2000 ते डिसेंबर 2001 या काळातील लेख ग्रंथ शोध या भागात आहेत.
मदिराप्राशन आणि ग्रंथवाचन या दोन्हीमुळे कैफ चढतो पण या कैफातील गुणात्मक फरक सांगत पुस्तकाची सुरवात होते.
ग्रंथ-शोध या भागात लेखकांनी आपल्या नोकरीतील 25-30 वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रभर आणि अहमदाबाद, दिल्ली, गुरगाव अश्या ठिकाणी दुर्मीळ व जुन्या ग्रंथखरेदी बद्दल व त्या अनुभवाबद्दल लिहले आहे. रद्दीच्या दुकानात व जुन्या पुस्तकांच्या दुकानात भरपूर वेळ घालवला त्याच्या आठवणी, त्याचप्रमाणे अश्या ठिकाणची त्या दुकान मालकाबद्दलच्या स्नेहाची हकीकत सांगितली आहे.
  पुस्तकांना वाळवी, कृमी, लागू नये म्हणून वेखंडच्या मुळ्या पुस्तकाच्या कपाटात ठेवाव्या, ग्रंथ मुलासारखे सांभाळावे लागतात त्यांची काळजी घ्यावी लागते नाहीतर मोठ्या प्रमाणावरील ग्रंथसंचय घरातील इतरांना कसा तापदायक होऊ शकतो, सवलत न देणारे ग्रंथ विक्रेते व सर्वसामान्यांना परवडेल अशी भरगोस सवलत देणारे 'पद्मश्री टी. एन. शानभाग' आणि त्यांचे 'स्ट्रॅण्ड बुक स्टॉल' अशा अनेक आठवणी त्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. लेखकांनी अनेक दुर्मिळ ग्रंथ कसे मिळवले, पैसे नसल्यामुळे काही वेळा काही ग्रंथ हातचे गेले, तर काही परवडत नसतानाही खरेदी केले याबद्दल माहिती देतात. महनीय व्यक्तींच्या सही असलेलेे किंवा प्रसिद्ध व्यक्तीच्या संग्रहातील ग्रंथ रस्त्यावर कसे येतात, जिवंतपणी आपल्या ग्रंथसंग्रहाची योग्य रीतीने काळजी घेतो तशी मृत्यूनंतर त्याचे काय करायचे हेही स्पष्ट होण्यासाठी मृत्युपत्र करावे अथवा जिवंतपणी योग्य हातात ते सोपवावे असे मत लेखक व्यक्त करतात. आपल्या देशातून खुपसारे दुर्मिळ ग्रंथ परदेशी गेले आपल्याला ते सांभाळत आले नाहीत याचे लेखकांना वाईट वाटते. परंतु आपल्या येथील एकूण परिस्थिती पाहता झाले ते बरेच झाले असंही खेदाने म्हणतात. महाराष्ट्रातील ग्रंथालय चळवळ व त्याची झालेली आबाळ, दुर्मिळ ग्रंथ जपणूक करण्यात झालेला हलगर्जीपणा, त्याचप्रमाणे इंग्लड मधील हे-ऑन-वाय हे पुस्तकांचे गाव याबद्दल माहिती देतात.

‘वाचन-बोध’ या दुस-या भागात, ‘वाचन’ या विषयावर दिलेले व्याख्यान आहे. या भागात लेखकांचे आवडते व त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या फक्त इंग्रजी ग्रंथांविषयी लिहिले आहे. (त्यामुळे फक्त मराठी वाचनार्यांची निराशा होऊ शकते). यासोबत वाचनसंस्कृती वाढवण्यासाठी काय करायला हवे, ग्रंथ-मार्गदर्शकाची गरज किती महत्वाची आहे, योग्य मार्गदर्शक मिळाल्यास अनावश्यक वाचन व त्यामुळे वाया जाणारा वेळ कसा वाचू शकतो या बद्दल सांगितले आहे.
एखादं पुस्तक वाचले की आपणाला वाटतं... काय छान पुस्तक आहे. परंतु काय छान आहे हे सांगता येत नाही. फक्त Value judgement म्हणजे चांगलं आणि वाईट यापलीकडे सांगता येत नाही... म्हणून 'लर्निंग टू फिलॉसफाइझ' अशी पुस्तक मराठीत हवीत अस लेखक सुचवतात.
लेखकांच्या मते काव्य, कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, तत्वचिंतन या वाचनक्रियेच्या चढत्या पायऱ्या आहेत.
बहुतेक वाचक आत्मचरित्र या पायरीपर्यंत जातात. तत्वचिंतन, तत्वचर्चेची पायरी ही वाचनाची प्रगतावस्था म्हणायला हवी, व ही अवस्था फारश्या लोकांनी गाठलेली नसते.कारण तसं शिक्षणच दिल जात नाही. अस मत ते व्यक्त करतात.
वाचक ते ग्रंथसंग्राहक अवस्था खूप मार्मिकपणे वर्णन केली आहे, खूप लोकांना ती आपलीच कहाणी वाटू शकते.
लेखक वाचकाचे चार प्रकार सांगतात... 1) वाचतो पण काय वाचतो याचे निकष त्याच्याजवळ नसतात 2) न वाचता पुस्तकांवर बोलणारे, 3) चांगलं-वाईट काय हे बरोबर ओळखणारे 4)समीक्षक जे की चांगलं काय, वाईट काय हे जाणतात. समीक्षक लेखक-वाचक-प्रकाशक यांना सांधनारा दुवा असतात.

कोणत्याही पुस्तकाची पूर्ण माहिती किंवा त्या विषयातील सखोल अभ्यास नसताना समीक्षा करू नये अस लेखकांचे मत आहे. समीक्षा करताना त्या विषयाचा अभ्यास नसेल तर लेखकावर अन्याय होऊ शकतो असही मत ते व्यक्त करतात...अजूनही बरच काही या पुस्तकात आहे.
एकूणच डॉ. अरुण टिककेकर यांच्या समृद्ध वाचन-लेखन जीवनाचे काही प्रमाणात दर्शन घडवणारे व वाचकांसाठी मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे.

(पुस्तक छान आहे पण नेमकं छान म्हणजे कसं.. हे मला सांगणं जमलंच आहे असं नाही... वाचलेल्या सर्वच पुस्तकावर लिहलं पाहिजे असही नाही... परंतु जे समजले किंवा लिहताना आठवले ते इतर वाचकांना उपयोगी पडेल व पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल या उद्देशाने हा लेखन प्रपंच.... चांगल्या समीक्षकांनी अजून योग्य शब्दात या बद्दल माहिती लिहून प्रसिद्ध करावी ही विनंती..संदिप रामचंद्र चव्हाण)

Thursday, 18 January 2018

माझ्या शाळेच्या आठवणी आणि सद्यस्थिती... निमित्त शतकमोहोत्स

माझ्या शाळेच्या आठवणी आणि सद्यस्थिती... निमित्त शतकमोहोत्स

शाळा दोन अक्षरी शब्द.... प्रेत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा घटक.... माणसाच्या जडणघडणीमध्ये जसा आई-वडिलांचा महत्त्वाचा वाटा असतो, तसा शिक्षकांचा अन शाळेचाही असतो.  'आवडते ही मज मनापासून शाळा, लाविते लळा, जशी माउली बाळा......!' कवी म्हणतो की आई इतका लळा, प्रेम करणारी शाळा मनापासून आवडते. आज हे आठवण्याचे कारण म्हणजे माझ्या कोपर्डे हवेली
जिल्हापरिषद प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
 मुल कुटुंबात जन्माला येतं... हळूहळू मोठं होतं... दिसेल ते पाहत... कानावर पडेल ते ऐकत... बोलण्याचा प्रयत्न करत... अखंडपणे शिकत असतं. ठराविक वय झालं की त्याला शाळेत घातलं जातं. पूर्वी बालवाडी असायची, सर्वच मुलं बालवाडीत जयचीच असं नाही, स्पर्धा नव्हती, कंपलशन नव्हते, माझा मुलगा- मुलगी मागे पडेल(म्हणजे नेमकं काय?) असा विचारही पालकांच्या मनाला शिवत नव्हता. आता प्लेस्कुल, नर्सरी, केजी असते, नवीनच जन्माला आलेल्यांना पाळणाघर असते... मागील पंचवीस तीस वर्षांपूर्वी ही जीवघेणी स्पर्धा नव्हती किंबहुना तुलनेने अगदीच कमी होती.


 वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीत प्रवेश व्हायचा. काही पालक पाचव्या वर्षीही मुलाला पहिलीत घालायचे. जन्मदाखल्यात जुगाड करायचे.. (त्यामुळे बऱ्याच मुलांची जन्मतारीख जुनमधील असायची)
काही वर्षांपूर्वी पर्यंत ग्रामीण भागात बहुतेक मुलांचे पहिलीचे प्रवेश जिल्हापरिषद शाळेत व्हायचे... गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुलांमुलींची नावे शाळेत घालण्याची (ऍडमिशन) एक परंपरा होती... अजूनही काही ठिकाणी आहे....  पुढे शाळा जूनपासून सुरू व्हायची... आणि आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरवात व्हायची.

गावच्या लोखंसंख्येवर किंवा परिस्थितीतनुसार शाळेची रचना असायची. काही ठिकाणी पहिली ते चौथी प्राथमिक शाळा, तर काही ठिकाणी सातवीपर्यंत शाळा असायची. मोठ्या गावात हायस्कुल व शहरात कॉलेज असायचे... आता कुठेही इंटरनॅशनल(?) स्कुल पासून कॉलेजपर्यंत सुळसुळाट झाला आहे.
माझ्या गावात जिल्हापरिषदची पहिली ते चौथी शाळा व पाचवी ते दहावी हायस्कुल आहे. गावातील बहुतेक सर्व नागरिक याच शाळेत शिकुन मोठे झाले आहेत. शाळेच्या स्थापनेला आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. 18 जानेवारी 1918 साली गावात शाळा आली. सुरवातीला शाळा कशी होती?, किती मुलं शाळेत शिकत होती?, कोण शिक्षक होते?, या बद्दल मला माहिती नाही.

  माझे पहिली ते चौथी शिक्षण ज्या काळात झाले त्यावेळच्या काही आठवणी अजून मनाच्या एका कोपऱ्यात तशाच आहेत. 1989-90 साली माझे पहिलीत ऍडमिशन झाले. 1992-93 ला चौथी पास झालो. 93- 94 या शैक्षणिक वर्षासाठी मी गावातील हायस्कुलमध्ये पाचवीत प्रवेश घेईपर्यंत म्हणजे चार वर्षाचा काळ मी ज्या शाळेत घालवला त्या माझ्या जिल्हापरिषद शाळेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.

 कोणत्याही संस्थेला, संघटनेला, व्यक्तीला शंभरी लाभणे म्हणजे खूप मोठं यश मानलं जातं. क्रिकेटमध्ये सेंच्युरीला विशेष महत्व असते. कोणत्याही गोष्टीच्या पूर्णत्वाची ओळख म्हणजे 100 टक्के म्हणजे पूर्ण. बंदा रुपया शंभर पैशाचा असतो. अस शंभर या संख्येला वेगळेच महत्व आहे. आज शाळेला शंभर वर्षं पूर्ण होऊन शतकमोहत्सव साजरा होताना खूप आंनद वाटतो आहे. चार पिढ्या, शंभर ब्याचेस या शाळेने घडवल्या. शाळेच्या सुरवातीला शिकणारे अनेकजण आज हयात नाहीत. दोन पिढ्या वृद्ध झाल्या आहेत, एक पिढी तरुण तर एक पिढी शिकत आहे. पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा- मुलगी या चार पिढीतील लोकांना मोठं होताना शाळेने बघितले आहे. त्यांच्या व गावच्या जडणघडणीत या शाळेचा, शिक्षकांचा मोठा वाटा आहे.... शाळा व शिक्षक हे वेगळे नसून एकच असतात. किंबहुना शिक्षक म्हणजेच शाळा होय. शिक्षकाशिवाय शाळा म्हणजे फक्त निर्जीव भिंतींची इमारत... त्यामध्ये जीव येतो शिक्षकांमुळे... चैतन्य येतं लहानग्या मुलांच्यामुळे, विद्यार्थ्यांमुळे!

 पहिली ते चौथी एका ब्याचला एकच शिक्षक, (प्रत्येक वर्षी नवीन शिक्षक असला प्रकार zp शाळेत नसतो.) बसायला घरूनच आणलेले गोणपाट, पाटी पुस्तकासाठी तंगूसची पिशवी (नॉयलॉन ब्याग) किंवा युरियाचा मोकळ्या 'ठिक्या'पासून (युरिया खताची मोकळी प्लास्टिक सदृश्य ब्याग) फल्ले आण्णांकडून किंवा इतर टेलर कडून शिवून आणलेली पिशवी. पावसाळ्यात छत्री म्हणून गाई म्हैशीच्या खाद्याच्या गोंणपाटाची "खोळ" असायची, तीच पावसापासून सौरक्षण करायची. पायात असेल तर स्लीपर नसेल तर अनवाणी. खाकी चड्डी, ढगाळ पांढरा शर्ट असा अवतार बहुतेक मुलांचा असायचा. मुलींना निळा -पांढरा फ्रॉक असायचा. शाळेत दूध मिळायचे त्यासाठी घरूनच ग्लास घेऊन जावा लागत असे. वनभोजन करण्यासाठी वर्ष्यातून एकदा सर्व शाळा वेताळबा मंदिरात जायची. हे मंदिर गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे व आजूबाजूला खूप सारी झाडी व गर्द सावली आहे. तिथे एकत्र बसून नकला, गाणी, "आई माझे पत्र हरवले, दे मला सापडले.." हा खेळ व्हायचा हे उपक्रम झाल्यावर सर्वाना गोल बसवून घरुन सुती फडक्यात बांधून आणलेली शिदोरी एकमेकांना घास घास देऊन वनभोजन संपन्न व्हायचे. आजच्या तुलनेत किती सहज शेअरिंग हॅबिट शिकवली जायची, हे आठवले की आताची बालके या अनुभवापासून वंचीत राहतात याचं खूप वाईट वाटतं. हे वनभोजन तीन चार किलोमीटरची पायपीट आमच्यासाठी एक दिवसाची सहलच असायची. परीक्षेत नंबर आला किंवा थोरांच्या जयंती- पुण्यतिथीला भाषण देण्यात भाग घेतला तर कंपासपेटी, पेन्सिल- खोडरबर असे बक्षीस मिळायचे. सर्वांच्या भाषणाची सुरवात "अध्यक्ष महाशय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला.....बद्दल चार शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने एकूण घ्यावे अशी माझी नम्रविनंती आहे." अशी व्हायची. भाषण रट्टा मारून पाठ केलेले असायचे, अचानक काही वेळा आठवायचे नाही. मग मुलांच्यात चुळबुळ चालू व्हायची मग भाषण देणारा अजूनच गांगारून जायचा आणि जागेवर जाऊन बसायचा अशी सगळी गम्मत असायची. त्याचप्रमाणे दरवर्षी गुडीपाढाव्याला पाटी पूजन असायचे. बहुतेक लिखाणाचा सर्व सराव खपरी पाटीवरच व्हायचा. शाळेचा निकाल बहुदा 1 मे ला असायचा, शाळा जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चालू व्हायची. पाहिली मध्ये येणाऱ्या मुलांचं ऍडमिशन गुडीपाढाव्याच्या मुहूर्तावर व्हायचे. आजच्या खाजगी शाळा मागतात तसा पालकांकडून आय. टी. रिटर्न मागण्याची पध्द्त त्यावेळी नव्हती व अजूनही zp शाळेत सर्वसामान्य जनतेची मुलं शिकत असताना पालकांचे उत्पन्न किती? हे पाहिले जात नाही.  सुरवातीला शाळेत येताना मुलं मुली खूप रडायचीे... आताही मुलं रडतातच... जे.कृष्णमूर्ती त्यांच्या शिक्षण विषयक विचारात म्हणतात  "शाळा आणि तुरुंग या जगातल्या दोनच जागा अशा आहेत की जिथं कुणीचं स्वत:होऊन जात नाही दाखल करावं लागतं" त्यामुळे कदाचित सुरवातीला मुलांना आपलं स्वातंत्र्य बंदिस्त होतंय का काय असा प्रश्न पडत असावा.


 माझी शाळा गावच्या मध्यवर्ती ठिकाणी व दाट लोकवस्तीत आहे. शाळेला मोठे मैदान, आजूबाजूला सुंदर झाडे, बाग- बगीचा, खेळणी असला प्रकार तेव्हाही नव्हता व आताही नाही. कोणत्याही राजकीय नेतृत्वाला असं काही असावं याची गरज वाटली नाही. व अजूनही शाळेला चांगले ग्राउंड देण्यात राजकीय नेतृत्वाला यश आलेले नाही. मात्र शाळेची जागा पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी बांधण्यासाठी वापरली गेली आहे. ती जागा शाळेची का ग्रामपंचायतची या बद्दल माहिती नाही पण तिथे शाळा होती व मी त्यात शिकलो हे पक्के लक्षात आहे. जवळजवळ सगळे पालक शेतकरी वर्गातले व जेमतेम शिकलेले, शिवाय खेळ म्हणजे वेळ वाया घालवणे असा काहीसा (गैर)समज त्याकाळी होता व आताही आहे. त्यामुळे पालकांनाही मैदानाचे महत्व कळाले नाही. आताही कळत नाही. कदाचित त्यामुळेच की काय गावात एकही मोठा खेळाडू होऊ शकला नाही.
शाळेला जागा कमी असल्यामुळे गावातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या पूर्वेला व पश्चिमेला शाळेची विभागणी झाली होती. रस्त्याच्या पश्चिमेला पहिली व दुसरी तर पूर्वेला तिसरी व चौथी असे वर्ग भरायचे. बेंगलोरी कौलाची, दगडी भिंतीची, शहाबादी फरशी असलेली इमारत होती. ती इमारत आता अस्तित्वात नाही. आता मुख्य रोडच्या पश्चिमेला दोन मजली इमारत आहे. पहिली ते चौथीचे सर्व वर्ग एका ठिकाणी आहेत.
मी शाळेत असताना प्रत्येक इयत्तेचे 'अ' तुकडी व 'ब' तुकडी असे दोन दोन वर्ग होते. शेख बाई, फुके बाई, सुतार गुरुजी, तोडकर गुरुजी, पवार गुरुजी, मुल्ला बाई असे शिक्षक असल्याचे आठवते. आमच्या वर्गाला वर्गशिक्षक शेख बाई होत्या. पहिली ते चौथी त्याच शिक्षिका म्हणून होत्या. तेव्हा प्राथमिक शाळेत शिक्षकांना सर, म्याडम म्हणण्याची पध्दत नव्हती.
माझ्या ब्याचचे बहुतेक विद्यार्थीमित्र आज पालकाच्या भूमिकेत आहेत. जवळजवळ सर्व ब्याचमेट लग्न होऊन संसाराला लागले आहेत. मुली खूप आधीच सासरी गेल्या आहेत. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश घेऊन तब्बल पंचवीस वर्षे उलटून गेली. एवढ्या मोठ्या काळात शाळेत, शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक व विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप बदल झालेत. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्यांची मुलं पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेतायत त्यांना ही गोष्ट लक्षात येत असेल.

 मी ज्या वेळी या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत होतो तो काळ म्हणजे आपल्या देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारण्याचा काळ होय. 1991 नंतर भारतीय बाजारपेठ परकीय उद्योगासाठी खुली झाली. हळूहळू शिक्षण क्षेत्रातसुद्धा याचा परिणाम जाणवू लागला. खाजगी शाळांचे स्तोम वाढले. इंग्रजी माध्यमाला अवास्तव महत्व आले. ठरवून जाणूनबुजून मराठी शाळांना प्रतिकूल असणारी धोरणं राज्यकर्त्यांनी राबवली. झेडपी शाळांची गुणवत्ता ढासळली. शिक्षकांच्यावर बिगरशैक्षणिक कामाचा अतिरिक्त तान दिला गेला. सरकारे बदलली की योजना अद्यादेश बदलू लागले, मंत्र्यांच्या, अधिकाऱ्यांच्या लहरीप्रमाणे नवीन अध्यादेश निघू लागले. झेडपी शाळांची अवस्था तोळामास झाली. तरीही काही धडपड्या शिक्षकांनी पालकांकडून, लोकनिधीतून अनेक शाळा पुन्हा दिमाखात उभ्या केल्या. पुन्हा फ़िनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न करू लागल्या. माझ्या गावच्या शाळेेत सद्या कार्यरत असणारे मुख्याध्यापक मोरे सर यांनी शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. पण हे प्रयत्न तोकडे आहेत. कोणत्याही गोष्टीची किंमत ती गोष्ट आपल्यापासून दूर गेल्यावर समजते. सरकारी शाळांचे तसेच आहे. जो पर्यंत त्या आहेत तो पर्यंतच त्या सुधारण्यासाठी प्रयत्न हवेत. या शाळा सर्वसामान्य जनतेला मोठा आधार आहेत. त्या व्यवस्थित चालणे यात समाजाचे हित आहे. माझी मुलं कुठं सरकारी शाळेत जातात? असा दृष्टिकोन जर कोना सदन पालकाचा असेल व त्यामुळे त्यांना सरकारी शाळेकडे लक्ष देणे जरुरी वाटत नसेल तर ही खूप मोठी चिंताजनक परिस्थिती आहे. ज्या समाजात आपण राहतो, तिथे फक्त आपण आपले कुटुंब सुस्थितीत असून चालत नाही, आजूबाजूचा समाज सुस्थितीत हवा. तर सर्व ठीक राहील. आपल्या बरोबर समाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला तर त्याची फळे सर्वांना चाखता येतील. जर सामजिक विषमता व शैक्षणिक दरी वाढत गेली तर हे समाजव्यवस्थेला घातक ठरेल. महाराष्ट्रातील अनेक गावच्या झेडपी शाळांच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. "एखाद्याची शंभरी भरणे" हा वाक्यप्रचार दुसऱ्या अर्थाने धोक्याची घंटा म्हणून परिचित आहे. या शाळा डबल सेंच्युरी मारण्यासाठी सक्षम व्हाव्यात म्हणून त्यांना सर्व प्रकारच्या मदतीसाठी समाजातील सर्व स्थरातील लोकांनी लक्ष घातले पाहिजे. शिक्षकांनी बदलत्या जगाचा कानोसा घेऊन आधुनिक तंत्रज्ञान शिकायला हवे. शिक्षकांनी शिक्षक सोसायट्या व इतर गट तटाच्या राजकारणापासून दूर राहून निरपेक्षपणे सेवा करण्याचा वसा घेतला पाहिजे. सद्याच्या परिस्थितीत सरकारी शाळा टिकतील का नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शाळेच्या समस्येवर खरे उपाय शोधण्याचा सर्वांकडून प्रयत्न व्हायला हवा.

माझ्या व  माझ्या गावच्या जडणघडणीत ज्या शाळेने शंभर वर्षे योगदान दिले त्या शाळेला अजून पुढच्या चार पिढ्या शिकवण्याची, घडवण्याची संधी मिळो याच शुभेच्छा या वेळी मी, माजी विध्यार्थी म्हणून देतो.
....संदिप रामचंद्र चव्हाण.

Sunday, 14 January 2018

वाचत सुटलो त्याची गोष्ट.. मला आवडलेले मराठी पुस्तक

वाचत_सुटलो_त्याची_गोष्ट.. मला आवडलेले मराठी पुस्तक

लेखक:- निरंजन घाटे,
प्रकाशन:-समकालीन प्रकाशन,
पुष्ठ संख्या:- 246
किंमत:- 300 (10 ते 20 टक्के डिस्काउंट मिळते व हे आपण कुठून घेतो त्यावर अवलंबून आहे)


कोण किती वाचेल, काय वाचेल, किती वेगाने वाचेल या बद्दल व्यक्तिपरत्वे भिन्नता असू शकते. वयाच्या पाचव्या- सहाव्या वर्षांपासून वयाच्या सत्तर वर्षायापर्यंत व अजूनही पुढे वाचत जायचे व वाचण्यासाठी जणू हा जन्म, वाचन हेच कर्म आणि धर्म असं ज्यांचं आजपर्यंतचे आयुष्य व आयुष्यातील बहुतेक वेळ ज्यांनी वाचन केले व त्यामुळे 180 च्या वर ज्यांनी पुस्तके लिहली व विज्ञान विषयीचे लेखक म्हणून जे प्रसिद्ध झाले अशा अवलियाचे वाचनासंबंधीच्या आयुष्याचा धावता पट उलगडून दाखवणारे पुस्तक म्हणजे 'वाचत सुटलो त्याची गोष्ट....'

लेखक निरंजन घाटे यांनी आयुष्यात इतके वाचले की खचितच असे चौफेर वाचन कोणाचे असेल. आवडीचे किंवा एखाद्या दुसऱ्या विषयाचे सखोल अभ्यास करणारे व त्यावर ग्रंथ लिहणारे पुष्कळ लोक आहेत. परंतु घाटे यांना कोणताही विषय वर्ज नाही. कोणताही विषय त्यांच्या 65 वर्ष्याच्या वाचनातून सुटलेला नाही. त्यांची तपाचर्या त्यांनी लिहलेल्या 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' यातून आपणाला समजते. या पुस्तकात उल्लेख झालेल्या व लेखकांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी करायची म्हणले तर ही संख्या हजारच्या वर जाईल. आणि ही यादी म्हणजे सर्वकाही नव्हे. लेखकाने फक्त त्यांच्या स्मृतीत व वाचकांना काही उकृष्ट द्यावे असेच या पुस्तकात उल्लेख केले आहेत.
पुस्तके कशी मिळवली, त्यामध्ये काय आहे, त्यातून लेखकाला नवीन काय मिळाले या बद्दलचा उवापोह या पुस्तकात आहे.
लेखकाचे लहानपण प्रतिकूल परिस्थितीत गेले, पण आईने केलेले वाचन संस्कार त्यांना किती उपयोगी पडले याचा ते अभिमानाने उल्लेख करतात. शिक्षण पूर्ण झाल्यावर आकाशवाणी, काही ठिकाणी संपादक व प्राद्यापक म्हणून नोकरी करतात व वाचनाबद्दलची आवड असणारी पत्नी मिळाते. पत्नीला चांगली नोकरी लागल्यावर, कौटूंबिक स्थिरता आल्यावर लेखक नोकरी सोडून पूर्णवेळ वाचन लेखन करतात... त्यावेळी.... यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो हे सिद्ध होते. पत्नीबद्दलचा अभिमान ते वेळोवेळी व्यक्त करतात. खाजगी आयुष्यातील थोडेसे उल्लेख सोडले तर हे आत्मचरित्र पूर्णपणे वाचलेल्या पुस्तकांना वाहिले आहे...
माझ्या सारख्या नववाचकाला असंख्य नवीन पुस्तक- लेखकांची माहिती यातून मिळते. यात उल्लेख झालेली बहुतांश पुस्तके इंग्रजी आहेत किंवा परकीय लेखकांची आहेत. भारतीय लेखकांच्या पुस्तकांचाही उल्लेख आहे पण तुलनेने कमी वाटतो. एकूण तेरा प्रकरणात हे पुस्तक विभागले आहे.
ज्यांना चौफेर वाचन करायला आवडते किंवा करायचे आहे त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे. वाचताना नेहमी कागद व पेन जवळ ठेवावा त्यामुळे उल्लेख झालेल्या पुस्तकांची व त्या पुस्तकांच्या लेखकांची नावे लिहणे सोपे जाईल. मी सलग पुस्तक वाचले त्यामुळे अशा नोट्स काढल्या नाहीत... पण पुस्तक संग्रही असल्यामुळे नंतर वाचताना यातील उल्लेखलेल्या पुस्तकांची यादी नक्की बनवायची असं ठरवून पुस्तक ठेऊन दिले.
---- संदिप रामचंद्र चव्हाण

या पुस्तकाबद्दल इतर ठिकाणी वाचलेली माहिती व ब्लॉग खालीलप्रमाणे...
http://mahamtb.com/Encyc/2017/9/2/Wachat-sutalo-tyachi-goshta-Book-review-by-prasad-phatak-.html

https://www.loksatta.com/lekh-news/vachat-sutalo-tyachi-goshta-marathi-books-by-author-niranjan-ghate-1521168/

http://sahityasuchi.erasik.com/articles/vachat_sutlo_tychi_goshta

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/book-by-niranjan-ghate/articleshow/61507240.cms

https://m.facebook.com/story.php?story_fbid=647545992113087&substory_index=0&id=231117740422583

मकरसंक्रांत आणि संक्रात....

मकरसंक्रांत आणि संक्रात.... संदिप रामचंद्र चव्हाण.

मकर संक्रात हा इंग्रजी कॅलेंडर वर्षातील पहिला हिंदू सण. तिळगुळ घ्या गोड बोला... असं म्हणून एकमेकाप्रति सलोखा, प्रेम, आत्मीयता, आदर, सन्मान व्यक्त करण्याचा व चैतन्याचा सण! मित्रांना, आप्तांना तिळगुळ देऊन स्नेह वृद्धिंगत करण्याचा तर शत्रुलाही तिळगुळ देऊन मित्रत्वाचा हात पुढे करण्याचा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे 14 जानेवारी. अपवादाने(अंदाजे 70 वर्षांनी) 15 जानेवारीलाही मकर संक्रांत येते... माणसाच्या आयुष्यात जसा महत्वाचा तसा निसर्गातील मोठ्या बदलला सुरवात होणारा दिवस म्हणजे मकरसंक्रांत. संक्रमन, ओलांडून जाणे, बदल स्वीकारणे, त्यासाठीची तयारी करणे म्हणजे मकरसंक्रांत.

दिवस मोठा व रात्र लहान होऊन उत्तर गोलार्थातील लोकांना जास्त प्रकाश मिळण्यास सुरवात होते, याला उत्तरायण सुरवात म्हणू शकतो. (शास्त्रीय दृष्टया उत्तरायण 21 मार्च ते 21जून असे असते)
सर्व हिंदू सण तिथीप्रमाणे येतात व साजरे केले जातात, परंतु मकरसंक्रात मात्र तारखेप्रमाणे साजरी होते. अजूनतरी यावरून तारीख का तिथी असा वाद नाही. याचे श्रेय न चुकता सदैव आपले काम करणाऱ्या सूर्याला द्यावे लागेल....

भोगीच्या दिवशी म्हणजे संक्रातीच्या आधी एक दिवस बाजरीची भाकरी तीळ लाऊन सर्व उपलब्द भाज्यांची एकत्रित केलेल्या भाजीबरोबर खाणे, तीळ आणि गूळ संक्रातीला खाणे हे शारीरिक बल वाढवण्यासाठी उपयोगी असते. पुढे येणाऱ्या उन्हाळ्यात शारीरिक झीज भरून निघावी यासाठीची योजना असते.
संक्रातीला पौराणिक महत्वही आहे.. मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांत देवीने संकरसुराचा नाश केला अशी कथा पुराणात आली आहे.
संक्रात येणे म्हणजे संकट येणे असाही वाक्यप्रचार मराठीमध्ये रूढ आहे. तर अशा पद्धतीने मकरसंक्रात हा हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा सण आहे.
अलीकडे मकरसंक्रातीला होणाऱ्या पंतगबाजीमुळे हा सण काही कुटुंबावर व पक्षांवर खऱ्या अर्थाने संकटांची संक्रात घेऊन येत आहे. त्याला जबाबदार बेजबाबदारपणे पतंग उडवणारे नागरिक किंवा मुलांना नॉयलॉन मांजा आणून देणारे पालक होय.

संक्रातील पतंग उडवण्याची पध्दत उत्तरभारतात दिसते... अनुकरणप्रिय महाराष्ट्रातील बहुतेक शहरी व काही प्रमाणात ग्रामीण जनतेने पतंग उडवण्याची पद्धत स्वीकारली आहे. यामुळे पतंगाची बाजारपेठ वाढली आहे. पण कोणत्याही चांगल्या गोष्टीला, सणाला समाज उपयोगी साजरे न करता त्याला विध्वंसक, त्रासदायकरीतीने कसे साजरे करायचे याचा उत्तम (अव)गुण आपल्याकडे आहेत.
नॉयलॉन मांज्यावर गांज्याप्रमाणे बंदी घालूनसुद्धा कोठेही अगदी सहजरित्या न तुटणार धागा मिळत आहे. चिनी मांजा, भारतीय नॉयलॉन मांजा, काच लावलेला मांजा असे वेगवेगळे मांजाचे प्रकार बंधी असूनही मिळतात तेव्हा शासकीय यंत्रणेचे अपयश व व्यवसायात कायद्याचा धाक नाही हेच निदर्शनास येते. मृत्यूदूत असणाऱ्या नॉयलॉन मांजाचा व्यवसाय करणारे जसे या समस्येला जबाबदार आहेत तसे विकत घेणारे बेजबाबदार ग्राहकही या समस्येला खतपाणी घालण्याचे काम करत आहेत.
असंख्य पक्षी जायबंधी किंवा मृत्यू होण्याचे कारण नॉयलॉन मांजा आहे. अनेक मोटरसायकल चालक व लहान मुलं नायलॉन मांजची शिकार झाली आहेत... मांजमुळे जखमी झालेल्या पक्षांना वाचवतानाही काहिजनांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे हसती खेळती घरे कोसळून पडली आहेत... त्यांची हानी कोणतेही मोल देऊन भरून निघणारी नाही. सण उत्सव हा समाजाच्या, व्यक्तींच्या जीवनात आनंद आणणारा क्षण असतो. तो तसाच आनंददायी रहावा म्हणून सर्व स्थरातून प्रयत्न करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मकरसंक्रांतीमुळे कोणाच्या आयुष्यात संक्रात येऊ नये हीच काय ती अपेक्षा करतो व थांबतो. मी लिहलेले वाचून एका व्यक्तीने जरी नॉयलॉन मांजा खरेदी न करण्याचा निर्णय घेतला तरी मला त्या गोष्टीचे समाधान असेल. त्या समाधानाच्या अपेक्षेनेच हा लेखप्रपंच....
( खाली काही लिंक दिल्या आहेत त्या नॉयलॉन मांजा संबधी उदाहरण म्हणून आहेत)

http://zeenews.india.com/marathi/maharashtra/owl-injured-due-to-nylon-manja-yeola-nasik/405714

Nayonbara Bazar Nylon Manja due to many ban | नंदुरबारात नॉयलॉन मांजामुळे अनेक जायबंदी | Lokmat.com - http://www.lokmat.com/

नायलॉन मांजाची सर्रास विक्री - nylon manja problem in city - Maharashtra Times - https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/nylon-manja-problem-in-city/articleshow/62285591.cms?utm_source=whtsapp&utm_campaign=ampmobile&utm_medium=referral&fb_ref=Default

https://www.loksatta.com/nagpur-news/permanently-ban-on-nylon-manja-1274797/

Thursday, 4 January 2018

संस्कृतीकडून विकृतीकडे.... भाग दोन. 20/12/17

संस्कृतीतून_विकृतीकडे... भाग दोन
शाळा कॉलेज मधील तरुण पिढीचे वर्तन कसे बदलत आहे या बद्दल मी संस्कृतीतून विकृतीकडे भाग एक मध्ये काही मुद्दे मांडले आहेत.
समाजातील अशाच काही असंवेदनशील इतर गोष्टीं घडत आहेत त्याही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वाढत्या वयाच्या पिढीवर आणि समाज मनावर परिणाम करतात...
त्यापैकी काही घटना पाहू....
काही दिवसांपूर्वी एक बातमी टीव्ही न्यूजला आली...व माध्यमातून यावर चर्चा झाली... सासू सुनेचे पटेना, व आईसाठी भाड्याने वेगळी खोली घ्यायची ऐपत नाही म्हणून नगरमध्ये पोटच्या मुलाने म्हाताऱ्या आईला जिवंतपणी स्मशानात सोडले, तर दुसरीकडे मुंबई मधील उच्चभ्रू वसाहतीत असणाऱ्या फ्लॅट मध्ये एक वृद्ध महिला इतके दिवस मरून पडलेली असते की जेव्हा तिचा मुलगा परदेशातून येतो तेव्हा फक्त तिचा सांगाडा शिल्लक राहिलेला असतो,,
दुसऱ्या एका उदाहरणात परदेशातून मुलगा येतो... आईवडिलांना गोड बोलून पुण्यात असणारं घर विकायला लावतो... सोबत न्यायचं कबूल करून विमातळावरच सोडून परदेशात पैशासह पोबारा करतो... खूप वेळ मुलगा येईना म्हणून वृद्ध जोडपं चौकशी कक्षात चौकशी करत तेव्हा मुलाचा प्रताप लक्षात येतो... गाठीला रुपायासुद्धा नसल्यामुळे ती म्हातारी आई हातातील सोन्याची बांगडी विमानतळावरील कर्मचाऱ्याला देऊ करते व परतीच्या प्रवासाला पैसे मागते... हा प्रसंग त्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.. तो कर्मचारी त्यांना ते सोने न घेता पैसे देऊन त्या वृद्ध दांपत्याची विचारपूस करतो... असा चित्रपटात शोभेल असा प्रसंग पुण्याच्या मातीतल्या दिवट्याच्या वागण्याने घडतो...,,
व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून दारूच्या नशेत स्वतःच्या आईचा खून करनारा व तिचे तुकडे करून काळीज काढुन कौर्याची परिसीमा करणारा विकृत कोल्हापूरच्या मातीत निपजतो,, तेव्हा छत्रपतींचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा हाच का तो महाराष्ट? असा प्रश्न पडतो.
अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली... आई सारखे प्रश्न विचारते म्हणून मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने आईचा खून केला व तिच्याच रक्ताने मेसेज लिहून ठेवतो.. मला पकडा आणि फाशी द्या!
नाशिकचा कुंभमेळा हा वृद्ध लोकांना एकाकी सोडून देण्याचे ठिकान झाले आहे, कुंभमेळ्याची पर्वणी साधतासाधता बरोबर आणलेल्या म्हाताऱ्या आई- वडिलांना किंवा दोहोंपैकी जे हयात आहेत त्यांना एकाकी सोडून पोटची मुलं निघून जातात... तेव्हा वृद्धांची "समृद्ध अडगळ" (?) मुलांना नकोशी असते का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
जमिनीच्या तुकड्यांनी भावभावनांचा "पाठबळ ते सख्ये भाऊ पक्के वैरी" इतपर्यंतचा प्रवास घडवला आहे. त्यांतून भावाभावांची हाणामारी, कोर्टकचेरी अगदी खून सुध्दा पडत आहेत. सासू सुनांची भांडणे, किरकोळ कारणावरून टोकाचे मतभेद- मनभेद होत आहेत. हुंड्यासाठीचा छळ जेव्हा जिवंत जाळून टाकण्यापर्यंत जातो तेव्हा जिजाऊ, सावित्रीबाई, राणी लक्ष्मीबाई याच मातीत घडल्या याचा विसर आपल्याला पडला का? असा प्रश्न पडतो. आणि समाज संस्कृतीतून विकृतीकडे चालला का? हाही प्रश्न निर्माण होतो.
लहान मुलीपासून वयस्कर महिलेवर बलात्काराच्या घटना रोज घडत आहेत, कोपर्डी बलात्कार असो की दिल्ली मधील निर्भया घटना, यासारख्या बलात्काराच्या घटनामध्ये सतत वाढ होऊन हा विषय खूप गंभीर व गुंतागुंतीचा बनत आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा झाली पण अशा इतर गुन्ह्यातील अजून असंख्य गुन्हेगार मोकाट आहेत, यात कायद्याच्या दृष्टीने बालगुन्हेगारांचे प्रमाण लक्षणीय आहे.
कौटूंबिक स्थरावर विचार करता विवाह पूर्व व विवाहबाह्य संबध यात काही कमीपणा वाटेनासा झाला आहे. यातून कुटुंबाच्या ठिकऱ्या होत आहेत. घटस्फोट वाढून मुलांना एकेरी पालकत्व वाट्याला येत आहे, समाजात त्यांना अपमानित जीवन जगावे लागते, त्यामुळे मुलांचे भावविश्व उध्वस्त होत आहे. यातून पुढे गुन्हेगार तयार होण्याची शक्यता असते.
लोकशाहीतील महत्वाच्या मतदान प्रक्रियेत मतासाठी दारू, मटण, पैसे वाटले जातात व लोकही ते घेतात व आपली किंमत ठरवतात. साम,दाम,दंड,भेद वापरून कशीही हवी पण सत्ता हवी यासाठी सर्वच राजकीय पक्ष पराकोटीचा प्रयत्न करताना दिसतात. निष्ठेच्या बाता मारणारे राजकीय नेते रोज निष्ठा बदलून कपडे बदलावीत तसे पक्ष बदलत आहेत, तर रस्त्यावरील लोकांना चिरडून पाळणारे अभिनेते गुन्हा करून निर्दोष सुटत आहेत. कायद्याचा खिस पाडण्यासाठी त्यांच्या दिमतीला खर्याचे खोटे व खोट्याचे खरे कऱण्यात पटाईत कायदेतज्ज्ञ आहेत. आणि असे लोक तरुणांचे आयडॉल आहेत. याला काय म्हणावे?
सरकारी नोकरदार भ्रष्टाचाराने लिडबडलेले आहेत, सरकारी कार्यालये लोकांच्या सेवेसाठी का गैरसोईसाठी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगलीत कायद्याचे रक्षक भक्षक बनले व आरोपी म्हणून ताब्यात असणाऱ्या तरुणाला अमानुष मारहाण करून अर्धवट जाळून फेकून देण्याचे धाडस त्यानी केले आहे. गुन्हेगारांना पोलीस व कायद्याचा वचक नाही, त्यांचे समांतर जग तयार झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर म्हणजे देव ही भूमिका बदलून डॉक्टर म्हणजे कसाई.. येईल त्याला पैशाला कापतो, गोरगरिबांनी उपचाराविना मरायचे अथवा सरकारी हॉस्पिटलमध्ये सडायचे.... अशी मानसिकता सर्वसामान्यांची झाली आहे. दिल्लीमध्ये एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये सात वर्षाच्या मुलीला अँडमिट केल्यानंतर दिवसाला लाखापेक्षा जास्त बिल आकारले जाते व ती शेवटी मृत होते पंधरा दिवसाचे बिल सतरा अठरा लाख होते व हा विषय केंद्रीय आरोग्यमंत्रालयापर्यंत जातो. तेव्हा हॉस्पिटल हे जीव वाचवण्यासाठी असतात. की यातून पैसे कमवणारीे,शोषण करणारी नवीन दुकानदारी सुरू झाली आहे का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
शिक्षणाचे बाजारीकरण व बालक- पालकांचे शोषण अशी नवीन शिक्षणव्यवस्था दिमाखात उभी राहिली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी ऐतिहासिक किल्ल्याचे नाव देऊन कोणीतरी विद्यापीठ खोलतो व तिथे विद्यार्थ्यांना पदव्यांची खिरापत वाटली जाते, या बाबतीत शिक्षणयंत्रणा यावर आजपर्यंत गप्प बसते... अशीही बातमी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून लोकांना समजते तेव्हा शिक्षणाने माणूस घडतो यावरचा विश्वास कमी होण्यातच हातभार लागतो.
जय जवान जय किसान हे नावाला राहिले आहेत... जवान सीमेवर आणि किसान शेतावर रोज मरतो आहे. लाखों शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे तरीही शेती व शेतकरी याबद्दल सरकार, उच्च शिक्षित नवश्रीमंत वर्ग गंबीर आहे असं वाटत नाही. खाजगी उद्योगात कामगारांचे शोषण अजूनही चालू आहे. जगाच्या श्रीमंतांच्या यादीत भारतीय लोकांची संख्या वाढत असताना भूकबळी व कुपोषणाने उद्याचा भारत मरत आहे. देशात गोरगरीब उपाशी व कर्जबुडवे उद्योगपती(?) तुपाशी अशी परिस्थिती आहे.
कुठे अपघात झाला तर मदत करणे बाजूला व हातातील मोबाइलवर शुटिंग चालू असा प्रकार बऱ्याच ठिकाणी दिसतोय, साध्या साध्या अफवेवर विश्वास ठेऊन गडबड गोंधळ उडत आहे. त्यात माणसं किड्यामुंग्याप्रमाणे चिरडून मरत आहेत. मुंबईतील अपघात त्याचे जिवंत उदाहरण आहे.
ऐकून घेण्याची सवय कमी झाली आहे. माझंच खरं ही प्रवृत्ती वाढून विरोधी विचारांना विचाराने विरोध न करता विरोधी विचार करणाऱ्यांचे खून पडत आहेत.
सार्वजनिक स्वच्छता याबद्दल तर काय बोलावे? कुठेही थुंकणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे लोक रस्त्यावर, बसमध्ये, रेल्वेमध्ये, सरकारी कार्यालयात, जिन्याच्या कोपऱ्यात थुंकण्यात धन्यता मानतात. सरकारी औद्योगिक क्षेत्रात व काही खाजगी औद्योगिक क्षेत्रात तर ज्या मशीनवर पोट चालते, जिथे काम करतो, त्या मशीनवर त्या जागेवर थुंकण्यात कसलाच कमीपणा न मानणारी, सार्वजनिक टॉयलेट मध्ये वापर झाल्यावर पाणी टाकायचे असते याचे भान हरवलेली बेभान माणसं पहिली की वाटतं ही लोकं घरातही असंच वागत असतील का?
पंचवीस, तीस वर्षांपूर्वी नदीचे पाणी भांड्यात भरून घ्यावे किंवा ओंजळीने प्यावे अशी परिस्थिती होती, आज  घरोघरी पाण्याचे फिल्टर आणि टीडीएस मिटर आणावे लागत आहे. जगाचा विचार करता उपलब्द सर्व जलस्त्रोत दूषित करण्यात आपण आघाडीवर आहोत. कोणतीही वस्तू खरेदी करताना घरातून मोकळ्या हाताने जाऊन येताना प्लॅस्टिक ब्याग हातात हलवत येण्यात काही कमीपणा वाटत नाही, उलट त्याला प्रतिष्ठा आली आहे. त्यातून प्लास्टिक समस्या निर्माण झाली आहे. घरातील कचरा हा रस्त्यावर टाकण्यासाठीच तयार झालेला असतो अशी काहीशी मानसिकता लोकांच्यात तयार झाली आहे.
श्रद्धेच्या विषयात तर एवढा विसंवाद आहे की त्यावरून दंगली घडत आहेत. भोंदू बाबांनी आपापली दुकानं थाटून कोट्यवधीची माया जमवून श्रध्देचा बाजार मांडला आहे, महिलांचे लैगिंक शोषण व बेकायदेशीर काम केल्यामुळे बऱ्याच जणांना जेलची हवा खायला मिळाली आहे. आणि तरीही त्यांचे भक्त त्यांना देव मानत आहेत. पैशाचा पाऊस, इच्छित गोष्ट मिळवण्यासाठी अंधश्रद्देतून नरबळी देण्याच्या घटनाही अधेमधे घडतात, तेव्हा समाज संस्कृतीतुन विकृतीकडे चालला का? हा प्रश्न अधिक गडद होतो आहे.
वरील नमूद केलेल्या घटना या हिमनगाचे टोक आहे.
या सर्व गोष्टी खूप प्रातिनिधीक आहेत अश्या असंख्य घटना घडल्यात व घडत आहेत. या सर्व गोष्टींचा कोणालाही ना खेद ना खंत! असे भीषण असणारे वास्तव  व व्यक्तिगत, सामाजिक हानी करणारे प्रसंग रोज कुठेना कुठे घडत आहेत. या सर्व परिस्तितीत चांगले अपवाद जरूर आहेत. पण विकृतांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे... याला अनेक गोष्टी जबाबदार आहेत.
देश स्वतंत्र होईपर्यंत लोकांना,तरुणांना एक निश्चित ध्येय होते.. देशाचे स्वातंत्र्य!! स्वातंत्र्य मिळाले, काळ पुढे जाईल तसा लोकांचे वागणे व व्यवहार बदलू लागला.
स्वातंत्र्या नंतर पहिली तीस पस्तीस वर्षे लोकांच्यात व राज्यकर्त्यामध्ये साधेपणा व सच्चेपणा होता अस अनेक नोंदीमधून समजते. काळ जाईल तसे लोक व राज्यकर्ते बदलत गेले, नीतीची जागा अनितीने घेतली, शिष्टाचाराची जागा भ्रष्टाचाराने घेतली, न्याय कमी व अन्याय जास्त, आदर कमी व अनादर वाढला, पोषण कमी व शोषण वाढले, सत्व स्वाभिमान गहाण ठेवून लाचारी वाढली, स्वातंत्र्याची जागा स्वयराचाराने घेतली. लोक देशाचा सोडून स्वतःचा विचार करायला लागले. याच दरम्यान टीव्ही आला व लोकांना नवीन करमणुकीचे साधन झाले. पुढे मोबाईल क्रांती झाली, जग जवळ येत असताना जवळची माणसं लांब गेली. करलो दुनिया मुठ्ठीमें म्हणता म्हणता कुटुंबातील एकोप्याची सुट्टी तर जाती-जातीत कधी कट्टी झाली हे समजले नाही.
ही परिस्थिती पालटायची असेल तर प्रत्येकाने आयुष्याचे भान व सामाजिक जाण ठेऊन वर्तन करायला हवे... ते घडत नसेल तर विज्ञान, तंत्रज्ञान, मंगळावरील वारी आणि चंद्रावरील स्वारी व्यर्थ आहे. आतून शरीर व्याधीने पोखरले असताना वरून नवीन कपड्याने सजवले तरी दुर्धर व्याधी बरी होत नाही... यावर मुळातूनच उपाय हवा. भौतिक विकासाचा वेग कमी असला तरी समाज विकृतीचा वेग कमालीचा वाढला आहे. या विकृतीच्या जंगलात माणूस नावाचा प्राणी हरवून जाईल....मग मात्र याचे लाभार्थी कोण??यापेक्षा यात हानी कोणाची झाली?? हा प्रश्न महत्वाचा व गंबीर असेल. ती हानी समाजाची, सर्वसामान्य जनतेची, कुटूंबव्यवस्थेची, चांगुलपणाची, न्याय, नीतीची, स्वाभिमानाची असेल व त्याची किंमतही मोठी असेल.
.....संदिप रामचंद्र चव्हाण.
(टीप:- वरील ब्लॉग माझ्या फेसबुक अकाऊंटला दि.1 डिसेंबर 2017 रोजी प्रसिद्ध केला होता)